कमी पाण्यात अधिक उत्पादनासाठी सूक्ष्म सिंचनावर भर :
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या अखिल भारतीय समन्वयित
सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भुवनेश्वर
येथील भारतीय जल व्यवस्थापन संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती
उपयोजनेअंतर्गत (SC Sub Plan) “बियाणे वाटप कार्यक्रम व
शेतकरी मेळावा” दिनांक १३ जून रोजी मौजे भोसा, ता. मानवत,
जि. परभणी येथे यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि होते. यावेळी मंचावर डॉ. हरीश आवारी (मुख्य शास्त्रज्ञ), श्री ऋषिकेश
औंढेकर आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, कृषि विद्यापीठात
विकसित होणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी तूर, सोयाबीन यांसारख्या पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे व स्वतःचा सर्वांगीण
विकास साधावा. त्यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करून उपलब्ध पाण्याचा
कार्यक्षम वापर करण्याचे महत्त्व पटवून दिले. कमी पाण्यात अधिक उत्पादन हे शाश्वत
शेतीचे सूत्र असल्याचेही ते म्हणाले.
प्रास्ताविक करताना डॉ. हरीश आवारी यांनी सांगितले की, विद्यापीठाने
विकसित केलेले विविध पिकांचे वाण आणि लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचवण्यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यांनी तुषार सिंचन व ठिबक
सिंचनाच्या वापरावर भर देत उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांनी ही तंत्रज्ञान आत्मसात
करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी माननीय कुलगुरू यांच्या शुभहस्ते अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) अंतर्गत भोसा
व लोहरा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन व
तूर वाणांची बियाणे वाटप करण्यात आली. तसेच विद्यापीठाची कृषि दैनंदिनी व
दिनदर्शिकेचेही वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात डॉ. हरीश आवारी व श्री ऋषिकेश औंढेकर यांनी उपस्थित
शेतकऱ्यांना सोयाबीन व तूर पिकांच्या आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचे सखोल मार्गदर्शन केले.
या उपक्रमामार्फत शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन व पाणी बचत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात
आले, ज्यामुळे अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी आधुनिक उपायांची
प्रभावी माहिती मिळाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रगतशील शेतकरी ॲड. राहुल झोडपे
यांनी केले. या कार्यक्रमाला भोसा परिसरातील अनेक शेतकरी बांधव आणि महिलांची
उपस्थिती लाभली आणि त्यांनी या उपक्रमाचा प्रत्यक्ष लाभ घेतला. कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी श्री विलास जाधव, कार्तिक गिराम, सुरेश शिंदे आणि प्रगतशील शेतकरी श्री बाबाराव जाधव यांचे विशेष योगदान
लाभले.