वैद्यकीय उपचारांची गरज टाळण्यासाठी, आरोग्याची काळजी महत्त्वाची ... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
योग हे भारताचे प्राचीन ज्ञान असून ते मानसिक शांतता, शारीरिक आरोग्य व एकाग्रता
वाढवते. योगामुळे तनावमुक्त जीवन, रोगप्रतिकारक
शक्ती वाढ, आणि संतुलित जीवनशैली मिळते. असे प्रतिपादन माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि केले. ते २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने
बोलत होते. हा कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण
अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत साजरा करण्यात आला. हा
भव्य कार्यक्रम कृषि महाविद्यालयासमोरील प्रांगणात भारत सरकारच्या आयुष
मंत्रालयाने निर्देशित केलेल्या २०२५ या वर्षासाठीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम
“एक पृथ्वी, एक आरोग्य” आणि
“समर्पण स्वयंसेवक कार्यक्रम” नूसार उत्सहात पार पडला.
पुढे बोलताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, या दिनाच्या माध्यमातून योगाचे
शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे विद्यार्थ्यांपर्यंत
तसेच कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. ऋषीमुनींनी दीर्घकाळ निरोगी जीवन
जगले, त्यामागे योगाचाच मोठा वाटा होता. आजच्या घडीला
आपल्याला स्वस्त आणि निरोगी जीवनासाठी योगाची नितांत गरज आहे. जीवनात वैद्यकीय
उपचारांची गरज टाळण्यासाठी, आरोग्याची काळजी घेणे अत्यंत
महत्त्वाचे आहे. निरोगी जीवनासाठी शुद्ध हवा, स्वच्छ पाणी
आणि संतुलित आहार यांचे महत्त्व अधोरेखित करत, पर्यावरणाचे
रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते स्वतः
दररोज ३० मिनिटे वेगाने चालणे, ३० मिनिटे व्यायाम आणि ३०
मिनिटे योगाभ्यास करतात, त्यामुळे त्यांना आजारी पडल्याचे
आठवत नाही. योगामुळे मानसिक ताण दूर होतो आणि मन प्रसन्न राहते. सर्वांनी हसतमुख,
आनंदी जीवन जगावे, हे अंतर्मनातून स्वीकारावे,
असे ते म्हणाले. शेवटी, योग हा केवळ एका
दिवसापुरता मर्यादित न ठेवता, तो नियमितपणे अंगीकारण्याचे
वचन सर्व उपस्थितांकडून घेतले.
यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी तसेच शिक्षण संचालक भगवान
आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, प्रभारी कुलसचिव डॉ. गजानन भालेराव,
सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर डॉ.
राहुल रामटेके, डॉ गजेंद्र लोंढे, डॉ. विश्वनाथ खंदारे,
विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ राजेश कदम आदीं मान्यवर आणि विद्यापीठातील सर्व विभाग
प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक
आदींनी मोठया संख्येने सहभागी होवून सामुदायिकरित्या विविध आसने, प्राणायाम यांचे प्रात्यक्षिके केली. यासाठी परभणी येथील निरामय योग प्रसार
संशोधन केंद्राचे योगशिक्षक डॉ. दीपक करजगीकर, वैभव गवळी आणि शिवकन्या रेंगे तसेच विद्यापीठाचे
डॉ डी. व्ही. सुर्वे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. दीपक करजगीकर यांनी मानवी जीवनासाठी
पृथ्वी प्रमाणेच आरोग्याचे महत्व सांगितले. शेवटी त्यांनी वंदना, शांतीपाठ घेतला.
प्रास्ताविकात विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम
यांनी अंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांमध्ये
विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यविषयक
जाणीवेत वाढ करण्याच्या उद्देशाने अनेक ‘On-Campus’ उपक्रम राबविण्यात
आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कॉमन योगा प्रोटोकॉल (CYP) प्रशिक्षण दिले, योगासाठी पार्कची उभारणी किंवा
आधीच्या पार्कचे नूतनीकरण करण्यात आली, तसेच पुढे योग व कला
यांचा समन्वय साधणारे फ्युजन कार्यक्रम (संगीत आणि नृत्य यांच्यासह) घेण्यात येणार
आहेत. याशिवाय माय गव्हर्नमेंट (MyGov) व्दारे आयोजित योग
विषयक स्पर्धांमध्ये सहभागास प्रोत्साहन तसेच सोशल मीडियावर दररोज योग संबंधी पोस्टद्वारे
आव्हान राबवले जातील, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून भित्तीचित्रे काढणे किंवा
योगसाधनेसाठी प्रतिबिंब मांडण्यासाठी खास जागा तयार करण्यात येईल, वृक्षारोपण,
निसर्गभ्रमंतीसह योग सत्रांचे आयोजन, नैसर्गिक सौंदर्यस्थळांवर
सूर्योदयाच्या वेळी योग सत्र, योग सत्रानंतर परिसर स्वच्छता मोहीम, योग व
आरोग्यातील परस्परसंबंधांवर आधारित संशोधन सादरीकरण याबरोबरच योगाचे शास्त्रीय फायदे यावर आधारित
शोधनिबंधांचे परीक्षण आणि प्रतिबंधात्मक वैद्यकीय दृष्टिकोनातून योगाचा अभ्यासास चालना
देण्यासाठी संशोधन हॅकाथॉन व तज्ज्ञ परिषदांचे आयोजन केले जाईल, असे सांगितले
योगसाधनेनंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठामध्ये विविध महाविद्यालयात योगा पार्कचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ डी एफ राठोड यांनी केले आणि श्री संघर्ष श्रंगारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.