Wednesday, June 18, 2025

खरीप हंगामासाठी विभागीय संशोधन व सल्लागार समितीची ७७ वी बैठक उत्साहात पार

 शेतकरी देवो भव” ही भावना साकारण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प येथे दिनांक १७ जून रोजी ‘७७ वी खरीप विभागीय कृषि विस्तार व सल्लागार समितीची बैठक’ उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या यांनी भूषवले.

या बैठकीस महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक माननीय श्री. रावसाहेब भागडे, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विभागीय कृषि सहसंचालक श्री. प्रकाश देशमुख (छ. संभाजीनगर) व श्री. साहेबराव दिवेकर (लातूर), तसेच विद्यापीठातील विविध कृषि महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, कृषि संशोधन केंद्रांचे प्रमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, जिल्हा वन अधिकारी, कृषि विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक आणि विस्तार कृषि विद्यावेत्ता उपस्थित होते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी “शेतकरी देवो भव:” ही संकल्पना मांडत, विद्यापीठाच्या संशोधन व तंत्रज्ञान विभागामार्फत विकसित करण्यात आलेली तंत्रज्ञान शिफारस थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, बदलत्या हवामानाशी सुसंगत तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन खर्चात कपात आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शास्त्रीय मार्गदर्शनाची आज नितांत आवश्यकता आहे. “मन प्रसन्न ठेवून कार्य केल्यास जीवनशैली आनंदी राहते आणि चिरतरुणतेची अनुभूती मिळते,” असेही त्यांनी नमूद केले. या बैठकीचे त्यांनी महाराष्ट्रातील शेती विकासाचा आदर्श ‘मॉडेल’ म्हणून गौरव केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीतून राज्यात विभागीय रचनेनुसार चार कृषि विद्यापीठांची स्थापना झाली. १९६० पासून निम्न कृषि शिक्षण सुरू झाले असून, त्यातून शाळा आणि संस्थांमधून कुशल मनुष्यबळ घडवण्याचे मोठे कार्य पार पडले, असेही त्यांनी स्पष्ट केले. माननीय कुलगुरूंनी सांगितले की, राज्यातील सर्व कृषि विद्यापीठे, पुणे येथील कृषि परिषद आणि विविध विभागांमार्फत (लाईन डिपार्टमेंट्स) आयोजित बैठकीद्वारे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची शिफारस सातत्याने केली जाते. हे तंत्रज्ञानप्रसाराचे एक आदर्श मॉडेल असून, अशा प्रकारचा दृष्टिकोन देशातील इतर राज्यांत फारसा दिसून येत नाही, असे ते म्हणाले. शेतीच्या सर्वांगीण समृद्धीसाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या संस्थेने चांगले कार्य केल्यास, इतर संस्थांनी त्याचा उपयोग करून आपले कार्य पुढे न्यावे, असे सांगत त्यांनी सहकार्याची भावना अधोरेखित केली. विद्यापीठ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने वसमत येथील संशोधन केंद्रात ऊस उत्पादनावर आधारित संशोधनाला चालना देणार आहे. तसेच, जमिनीच्या आरोग्य सुधारण्यासाठी भारत सरकारच्या ‘पीएम प्रणाम’ योजनेचा प्रभावी प्रसार केला जाणार असून, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला यामुळे बळकटी मिळेल, असे यावेळी सांगितले. विद्यापीठाने विविध संशोधन प्रकल्प शासनाकडे सादर केले असून, संशोधन प्रयोगशाळांसाठी दिलेल्या भरीव आर्थिक मदतीबद्दल महाराष्ट्र शासनाचे त्यांनी आभार मानले. शेतकरी देवो भव:’ ही भावना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विद्यापीठ व इतर सर्व विभागांनी आपली ताकद ओळखून, सहकार्यात्मक भावना, नवोपक्रमशीलता आणि व्यावसायिक दृष्टिकोन एकत्र साधावा,” असे त्यांनी नमूद केले. शेवटी, त्यांनी वनक्षेत्र वाढीसाठी वन विज्ञान केंद्र स्थापन करण्याची गरज अधोरेखित केली. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासोबतच शेतकऱ्यांच्या कल्याणालाही चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महासंचालक माननीय श्री. रावसाहेब भागडे  यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कृषि विद्यापीठांच्या शिफारसी उपयुक्त ठरत असून यासाठी संशोधन व नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात कापसाखालील क्षेत्र घटत चालले आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे मजुरांची टंचाई. या पार्श्वभूमीवर कापूस वेचण्यासाठी यांत्रिकीकरणावर आधारित तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची गरज आहे. कापूस हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे महत्त्वाचे नगदी पीक असून त्यासाठी विशेष संशोधनाची आवश्यकता आहे. त्यांनी सांगितले की, ऊस पिकासह कमी पाण्यावर येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन होणे आवश्यक आहे. आच्छादन, पाचटाचा योग्य वापर आणि उसापासून पोटॅशसारखी उपयुक्त उत्पादने तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. हळद आणि आद्रक यासारख्या नगदी पिकांवरही संशोधन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी अनेकदा पीक उत्पादनात अपयशी ठरतात, हे अपयश दूर करण्यासाठी विद्यापीठांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाचे कार्य हाती घ्यावे. बायोमिक्समध्ये  विद्यापीठांनी उल्लेखनीय कार्य केले असून त्याचे विकेंद्रीकरण करून ते मराठवाड्यातील इतर केंद्रांवर पोहोचविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. सेंद्रिय घटकांच्या आधारावर पीक शिफारशी करता याव्यात यासाठी विशिष्ट मानके तयार करावीत, तसेच कीटकनाशकांचा वापर पीकस्थितीच्या आधारेच करावा. यामुळे उरलेले अवशेष (residual effect) टाळता येतील. यासाठी शेतकरी व कृषि सेवा केंद्र चालकांना विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोसंबी फळगळीचे मूळ कारण शोधून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. मराठवाड्यात ज्वारीचा हुरडा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्याच्या साठवणूक क्षमतेसाठी शिफारशी तयार करून उत्पादन खर्चात बचत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर शेतीतील साधनसामुग्रीचा अतिरिक्त वापर टाळण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार यांनी केली. त्यांनी नमूद केले की, चारही कृषि विद्यापीठांच्या संयुक्त कृषि संशोधन परिषदेतील शिफारशी, तसेच विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचे कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत प्रभावी पोहोच सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विभागामार्फत शेतकऱ्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया संकलित केल्या जातात आणि त्यानुसार पुढील हंगामासाठी संशोधनाची दिशा ठरवली जाते. यासोबतच, पिकांसंबंधित अडचणी समजून घेऊन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठीही प्रयत्न केले जातात, असे त्यांनी सांगितले.

विभागीय कृषि सहसंचालक श्री. प्रकाश देशमुख (छ. संभाजीनगर) व श्री. साहेबराव दिवेकर (लातूर), यांनी मनोगत व्यक्त करताना शेतकऱ्यांचे प्रत्याभरणे (प्रत्यक्ष अनुभव) मांडले, तसेच विभागासाठी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक तंत्रज्ञानाची माहिती सादर केली. त्यांनी उपयुक्त व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने खजूर, ॲव्होकॅडो, राजमा, ड्रॅगन फ्रूट, देशी कापूस, फळबाग लागवडीसह विविध बाबींवर मार्गदर्शन व यावरील संशोधनाची आवश्यकता असल्याचे सांगितले.

या चर्चेदरम्यान विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली लगेचच संबंधित विषयांवर उत्तरे दिली. तसेच, भविष्यात यावर सखोल संशोधन करण्याचेही निश्चित करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा वनाधिकारी श्रीमती कीर्ती जमदाडे-कोकाटे यांनी ऍग्रो-फॉरेस्ट्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी विद्यापीठाने विशिष्ट प्रकारचे मॉडेल विकसित करावे, असेही त्यांनी सुचवले. या उपक्रमासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान खरीप हंगामासाठी विविध विभागीय योजनांची माहिती, तांत्रिक सल्ला, हवामान आधारित पीक नियोजन, कीड-रोग व्यवस्थापन, बियाणे उपलब्धता, खत वापराचे मार्गदर्शन, जलसंधारण व शाश्वत शेती यावर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीचे सूत्रसंचालन डॉ एस बी कदम यांनी केले तर आभार डॉ सी बी पाटील यांनी मानले. बैठक यशस्वीततेसाठी डॉ. डी एस मुटकुळे, डॉ ए बी बागडे, श्री रामेश्वर ठोंबरे आणि राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.