विकसित भारताचे स्वप्न साकार करताना कौशल्य विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल परिवर्तनामुळे करिअर विकास व शिक्षण
क्षेत्रात मूलभूत बदल झाले आहेत. त्यामुळे होणाऱ्या बदलांशी जुळवून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कौशल्य विकास आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालयात दि. ३१ मे रोजी ‘प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना’ व ‘कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालय जिमखाना विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेच्या अध्यक्षीय समारोपात माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि बोलत
होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्किल इंडियाचे समन्वयक श्री. सचिन नरंगळे यांनी केले. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. आपल्या भाषणात शिक्षक संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर अधिक भर देण्यात आल्याचे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल रामटेके यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच कौशल्य विकास मंत्रालयामार्फत नियुक्त सदस्य प्राचार्या सौ. रमाताई शेजावळे यांनी उपस्थितांना कौशल्ययुक्त शिक्षणाचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमात माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
हस्ते विद्यार्थ्यांना टी-शर्ट, बॅग (किट) चे वाटप करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेत कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचेही त्यांनी कौतुक केले.या कार्यक्रमास प्रा. अरुण शेजावळे तसेच महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ. हरीश आवारी, प्रा. विवेकानंद भोसले, डॉ. मधुकर मोरे, डॉ. सुमंत जाधव, डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. प्रमोदीनी मोरे, डॉ. संदीपान पायाळ, डॉ. ओंकार गुप्ता, डॉ. गजानन वसू, डॉ. शैलेजा देशविना, ¸श्री राजाराम
वाघ, श्री मंचक डोबो,श्री. प्रमोद राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आश्विनी गावंडे यांनी केले तर जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुभाष विखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
