सेंद्रिय शेतीतून शुद्ध आहार आणि शाश्वत शेतीचे भविष्य – कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ‘शेतकरी देवो भवः’ या
नाविन्यपूर्ण ऑनलाईन मालिकेत दिनांक ३ जून रोजी विद्यापीठाच्या स्टुडिओत माननीय
कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली कृषिभूषण श्री श्याम सोनटक्के
यांची यशोगाथा प्रसारित करण्यात आली. या कार्यक्रमात संशोधन संचालक डॉ. खिजर बेग
आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे
आयोजन सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन यांच्या
संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या भागात मौजे लोहारा (ता.उदगीर जि.लातूर) येथील कृषिभूषण
श्री श्याम सोनटक्के यांनी गो-अधारीत नैसर्गिक शेती व शेतमालाचे विक्री व्यवस्थापन
या विषयावर आपली प्रेरणादायी यशोगाथा मांडली.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी यावेळी बोलताना सांगितले की, शुद्ध हवा,
पाणी आणि अन्न यांची गरज आता अधिक तीव्रपणे जाणवते, आणि आजच्या यशोगाथांमधून हे स्पष्ट होते. आपल्या विचारांची घडण आपल्या
आहारावर अवलंबून असते, त्यामुळे शुद्ध आहारासाठी सेंद्रिय
शेतीचे महत्व अनन्यसाधारण आहे. सेंद्रिय खतांचा अधिक वापर केल्यास उत्पादन खर्चात
बचत तर होईलच, शिवाय पर्यावरणालाही फायदा होईल. ते पुढे
म्हणाले की, रासायनिक घटकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत
दिवसेंदिवस बिघडत गेला आहे. याउलट, सेंद्रिय घटकांचा वापर
वाढविल्यास जमिनीचा पोत हळूहळू सुधारू शकतो, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला. मात्र, यासाठी काहीसा वेळ लागेल,
हे ही त्यांनी स्पष्ट केले. माननीय कुलगुरूंनी शास्त्रज्ञांना
सेंद्रिय घटक तयार करण्यासाठी सुलभ उपाय आणि प्रक्रिया सुचविण्याचे आवाहन केले.
"पीएम-प्रणाम" योजना सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी उपयुक्त ठरेल,
असे सांगत त्यांनी आशा व्यक्त केली की, सेंद्रिय
शेतीतूनही भविष्यात भरघोस उत्पादन घेता येईल. विद्यापीठाने यासंदर्भात पिकानिहाय
माहिती संकलित करून त्या आधारे भविष्यकालीन संशोधनावर भर द्यावा, असेही त्यांनी सुचविले. हरितक्रांतीच्या काळात उत्पादन वाढविण्यासाठी
रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला, मात्र त्यावेळी
जमिनीच्या पोताकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी
झाले आहे. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीसाठी विद्यापीठ विविध सामाजिक संस्थांबरोबर
सामंजस्य करार करून संयुक्त संशोधनाचे प्रयत्न करत आहे.
या कार्यक्रमात त्यांनी नमूद केले की, 'पुणे ॲग्री हॅकेथॉन' या उपक्रमात केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना. श्री
शिवराजसिंह चौहान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री देवेंद्र फडणवीस
यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे परीक्षक
म्हणून सहभागी झाले होतो. यावेळी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्रातील
प्रयत्नांचे कौतुक करताना, शेतकऱ्यांना क्लीन प्लांट –
म्हणजेच रोगमुक्त व निरोगी फळबागांचे रोपे – उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प
राबविण्याची घोषणा केली.तसेच ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून विद्यापीठ कार्यरत
असून, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी
विद्यापीठ कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन माननीय कुलगुरूंनी
यावेळी केले.
मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे यांनी अलीकडेच कृषिभूषण पुरस्कारप्राप्त
प्रगतशील शेतकरी श्री. श्याम सोनटक्के यांची मुलाखत घेतली. या संवादादरम्यान
त्यांनी शेतकऱ्यांचे मुख्यतः तूर, कापूस, ऊस यांसारख्या नगदी पिकांवर
लक्ष केंद्रीत असल्याचे सांगितले. या पिकांवर मोठ्या प्रमाणात रासायनिक खते व कीटकनाशकांचा
वापर केला जात असल्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे, प्रदूषण
वाढत आहे आणि त्याचे परिणाम मानवी आरोग्यावरही गंभीर स्वरूपात दिसून येत आहेत.
त्यामुळे आजच्या घडीला रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळणे ही
काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी जैविक निविष्ठा (उदा. जीवामृत, दशपर्णी अर्क) तयार करण्याचे आणि वापरण्याचे कौशल्य आत्मसात करावे. तसेच, कीटकनाशक वापराबाबत स्वतःची जागरूकता वाढवावी. स्थानिक गावरान वाणांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती अधिक असते, त्यामुळे शक्यतो गावरान वाणांचेच बियाणे वापरावे.
श्री. सोनटक्के यांनी विक्री व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, आपल्या उत्पादनांची ब्रॅण्डिंग करून त्यांचे बाजारमूल्य वाढवावे. यासाठी सोन्याच्या, कपड्याच्या, तसेच विविध अवजारांच्या दुकानांमध्ये शेतकरी आपले नैसर्गिक उत्पादने विक्रीस ठेवून ग्राहकांना आकर्षित करू शकतात. याबरोबरच, समाजमाध्यमांचा प्रभावी वापर केल्यास आपल्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळतो, असे त्यांनी नमूद केले. ते नियमितपणे शेतकऱ्यांना आपल्या शेतावर बोलावून प्रत्यक्ष मार्गदर्शन करतात. अशा भेटींमध्ये ते नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ जेवणासाठी ठेवतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या गुणवत्तेचा अनुभव घेता येतो. मुलाखतीच्या शेवटी, श्री. श्याम सोनटक्के यांनी उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली आणि त्यांना सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा दिली.