वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांना महाराष्ट्रातील पर्जन्यावर अवलंबून शेती प्रणालींमध्ये शाश्वतता
(ताण सहन करण्याची क्षमता) वाढविण्यासाठी आयोजित राज्य पातळीवरील विविध क्षेत्रांतील
प्रतिनिधींसोबत विचारमंथनच्या उद्घाटनसत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित
करण्यात आले.
या दोन दिवसीय विचारमंथन सत्राला दिनांक २३ व २४ जून २०२५ रोजी मुंबई येथे
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी आयोजिन करण्यात आले. महाराष्ट्र
रिव्हायटलायझिंग रेनफेड अॅग्रीकल्चर (महा-आरआरए) नेटवर्क आणि रिव्हायटलायझिंग
रेनफेड अॅग्रीकल्चर नेटवर्क (आरआरएएन) यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे
आयोजन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्रआरआरए नेटवर्कचे समन्वयक श्री. साजल कुलकर्णी व श्री.
श्रिश जोशी, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे मृद विज्ञान तंत्रज्ञ श्री विजय
कोळेकर भोपाळ येथील यूएई, सीआयएईचे माजी प्रकल्प समन्वयक आणि
आरआरए नेटवर्कचे तांत्रिक सल्लागार डॉ. एम. दिन यांची प्रमुख उपस्थिती होती
या परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील शासकीय, स्वयंसेवी संस्था, शेतकरी प्रतिनिधी, कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञ
आणि धोरणकर्ते सहभागी होणार असून पर्जन्याधारित शेतीला अधिक सक्षम, शाश्वत आणि हवामान बदलास प्रतिरोधक बनवण्यासाठी विचारमंथन करण्यात येणार
आहे.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनातून असे नमूद
करण्यात आले की, राज्यातील विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये पर्जन्यावर आधारित स्थानिक
पशुपालन, मासेमारी आणि मेंढपाळ समुदायांच्या पारंपरिक
व्यवस्थापन पद्धती या पर्यावरणस्नेही असून हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे
जाण्यास सक्षम आहेत. देशी जनावरांच्या माध्यमातून जमिनीचा कस वाढवणे, नैसर्गिक शेतीला चालना देणे आणि निसर्ग पुनरुज्जीवन शक्य आहे. बैलांपासून
व स्थानिक अवजार निर्मितीमधून उद्योजकतेलाही चालना मिळत आहे. या पारंपरिक
व्यवस्थांना शाश्वत विकासाच्या योजनांमध्ये स्थान द्यावे, असे
आवाहन त्यांनी केले. यामुळे अन्न, उत्पन्न आणि पर्यावरणीय
सेवा यांना एकाच वेळी बळकटी देता येईल, असेही त्यांनी स्पष्ट
केले.
याबरोबरच ते म्हणाले की, महाराष्ट्र हे हवामान बदलाच्या परिणामांमध्ये
देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. विद्यापीठाने शाश्वत शेतीसाठी हवामान अनुकूल विविध
तंत्रज्ञान विकसित केली आहेत. यामध्ये ताण सहन करणाऱ्या वाणांची निर्मिती, बंधारे, विहिरी, कूपनलिका पुनर्भरण, मराठवाड्यासाठी
शेततळ्याचा योग्य आकार, हवामान बदलाशी सुसंगत तंत्रज्ञान,
जलसंधारण पद्धती यांसारख्या गोष्टींवर संशोधन केले आहे. कोरडवाहू
शेतीसाठी ‘रुंद सरी वरंबा’ पद्धतीसारखी तंत्रे तयार करून ती मराठवाड्यात
प्रभावीपणे प्रसारित केली आहेत. तसेच विद्यापीठाने विकसित केलेली सर्व बैलचलित
अवजारे अतिशय लाभदायक ठरली आहेत. विद्यापीठाचे हे कार्य महाराष्ट्र
रिव्हायटलायझिंग रेनफेड अॅग्रीकल्चर नेटवर्क (Maha-RRA) यांच्या
समन्वयाने मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या पर्जन्याधारीत
भागांमध्ये पोहोचविणे आवश्यक आहे. भविष्यात या नेटवर्कसोबत सामंजस्य करार करून ही
तंत्रे शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवली जातील, असेही
त्यांनी सांगितले.
या चर्चासत्रात अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प पशु संवर्धनाचे यंत्रिकीकरणचे संशोधन अभियंता डॉ. डी. डी.टेकाळे यांनीही सहभाग नोंदविला.