Thursday, June 5, 2025

"विकसित कृषि संकल्प अभियान" अंतर्गत मौजे वडाळी येथे मार्गदर्शन

 शाश्वत शेतीसाठी उत्पादन खर्च कमी करावा .... शिक्षण संचालक माननीय डॉ. भगवान आसेवार


कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या संकल्पनेतून "विकसित कृषि संकल्प अभियान" देशभर राबविण्यात येत आहे. मराठवाडा विभागासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे  माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठस्तरीय सूक्ष्म नियोजन केले आहे. या अभियानांतर्गत विद्यापीठ, परभणीचे कृषी विज्ञान केंद्र व विविध संबंधित संस्थांच्या सहकार्याने मौजे वडाळी, ता. जिंतूर येथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ५ जून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री. उत्तमराव कठाळु ढोले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नैसर्गिक शेती मिशन गटाचे अध्यक्ष श्री. गजानन गरड हे उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यापीठाचे शिक्षण संचालक माननीय डॉ. भगवान आसेवार, सहयोगी प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर अंबाडकर, नागपूर येथील केंद्रीय लिंबुवर्गीय संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. नरेश मेश्राम, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले आणि शास्त्रज्ञ श्री. अमित तुपे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

शिक्षण संचालक माननीय डॉ. भगवान आसेवार यांनी शाश्वत शेतीसाठी उत्पादन खर्च कमी करण्यासाठीचे विविध उपाय सुचविले. तसेच त्यांनी खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व तुर पिकांच्या सुधारित वाणांची निवड, पेरणी पद्धती, खत व्यवस्थापन आणि कोरडवाहू तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी बीज प्रक्रिया, किड-रोग व्यवस्थापन आणि बायोमिक्स वापरावर भर दिला.

डॉ. नरेश मेश्राम यांनी संत्रा लागवडीच्या तंत्रज्ञानाबरोबरच आदिवासी शेतकऱ्यांसाठीच्या विशेष योजनांची माहिती दिली. श्री. अमित तुपे यांनी कापूस पिकातील "दादा लाड" लागवड तंत्रज्ञानाचे फायदे, उत्पादन वाढीचे मार्ग आणि खर्च नियंत्रण याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. प्रशांत भोसले यांनी करताना सांगितले की, परभणी जिल्ह्यातील ९० गावांमध्ये कृषी विज्ञान केंद्रामार्फत शास्त्रज्ञांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन खरीप हंगामाची तयारी, नवीन तंत्रज्ञान व शासकीय योजनांचे प्रसार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या अभियानाद्वारे शेतकऱ्यांचा फीडबॅक घेऊन आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा केल्या जाणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार अ‍ॅपद्वारे हवामान अंदाज, पीक लागवड तंत्रज्ञान, बाजारभाव यासह विविध माहिती शेतकऱ्यांच्या हाती सहज उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी या अ‍ॅपचा उपयोग करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शरद ठमके यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. विकास खोबे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विज्ञान केंद्र, परभणीच्या शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.