भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि भारतीय कृषि
अनुसंधान परिषदेच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या "विकसित कृषि संकल्प अभियान" अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठ, परभणीच्या नेतृत्वाखाली महिला शेतकऱ्यांसाठी दिनांक
६ जून रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन मौजे जलालपूर (ता. व जि. परभणी) येथे करण्यात
आले.
कार्यक्रमाचे विद्यापीठस्तरीय सूक्ष्म नियोजन कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या
मार्गदर्शनात करण्यात आले. या अभियानात कृषी विज्ञान केंद्र, परभणी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक
विज्ञान महाविद्यालय, पशुवैद्यक महाविद्यालय, तसेच केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, नागपूर
यांचा सक्रिय सहभाग राहिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौजे जलालपूर येथील प्रगतशील
शेतकरी श्री. बाळासाहेब जटाळ उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. जया
बंगाळे,
डॉ. अमोल पाटील, डॉ. नरेश मेश्राम, डॉ. अरुणा खरवडे, आणि प्रा. ज्योती मुंडे यांची
उपस्थिती लाभली.
या प्रसंगी डॉ. जया बंगाळे यांनी महिला व बालविकास, वृक्ष लागवडीचे महत्त्व, आणि पर्यावरण संवर्धन या
विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. अमोल पाटील यांनी पावसाळ्यापूर्वी जनावरांची
घ्यावयाची काळजी यावर माहिती दिली. डॉ. व्यंकटरमण बनसोडे (केंद्रीय लिंबूवर्गीय फळ
संशोधन केंद्र, नागपूर) यांनी प्रक्रिया उद्योगाद्वारे महिला
व शेतकरी गटांचे सक्षमीकरण यावर सविस्तर माहिती दिली.
प्रा. ज्योती मुंडे यांनी महिला शेतकऱ्यांच्या श्रम सुलभीकरणासाठी
उपयोगी ठरणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अरुणा खरवडे यांनी केली. त्यांनी
सांगितले की, विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत परभणी
जिल्ह्यातील ९० गावांमध्ये खरीप हंगामपूर्व तयारी, नवीन
तंत्रज्ञान, तसेच शासकीय योजनांची माहिती शास्त्रज्ञांमार्फत
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे.
या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया व
अनुभवांचे संकलन करून, भविष्यातील तंत्रज्ञानविकास व
संशोधनासाठी उपयोग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मनीषा गिरी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विज्ञान केंद्र, परभणीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी जलालपूर
गावातील महिला शेतकरी आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून कार्यक्रमाला
उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.