वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि
महाविद्यालयातर्फे अंतर्गत ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) आणि कृषि
औद्योगिक संलग्नता उपक्रम (AIA) अंतर्गत रेशीम संशोधन योजना,
जिल्हा पशुवैद्यकीय विभाग, व जिल्हा परिषद,
परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे मंगरुळ, ता. मानवत, जि. परभणी येथे दिनांक २५ जून २०२५ रोजी फऱ्या
व घटसर्प रोग प्रतिबंधक लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात कृषि महाविद्यालय, परभणीच्या बी.एस्सी. (कृषि) ७व्या
सत्रातील विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. कार्यक्रमात जनावरांना फऱ्या व
घटसर्प रोगाविरोधातील प्रतिबंधक लसी टोचण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. जमीर पठाण (सरपंच) होते, तर उपसरपंच श्री.
प्रल्हादराव देशमाने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषि महाविद्यालयाचे
अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, रावे कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक तथा विभाग प्रमुख डॉ.
राजेश कदम, प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे, पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. आर. पाटील यांनी
उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
सरपंच श्री. जमीर पठाण यांनी जुन्या पारंपरिक शेती पद्धतीचे महत्त्व विषद
करताना सध्याच्या प्रदूषणयुक्त व दुषित अन्नामुळे मानवामध्ये विविध आजार वाढत
असल्याचे नमूद केले.
डॉ. सय्यद इस्माईल यांनी विद्यार्थ्यांनी खेड्यात जाऊन ‘ज्ञानदान’ करण्याचे आवाहन केले व शेतकऱ्यांकडून शेती उद्योग शिकण्याची प्रेरणा घ्यावी, असे सांगितले. डॉ. राजेश कदम (विभाग प्रमुख, तथा मुख्य समन्वयक, रावे कार्यक्रम यांनी सांगितले की, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये २५०० विद्यार्थी ‘कृषिदूत’ व ‘कृषिकन्या’ म्हणून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करत आहेत. डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी प्रास्ताविकात रेशीम उद्योगातील पशुधनाच्या भूमिकेचे महत्त्व सांगितले. त्यांनी ‘तुती लागवडीसोबत २ शेळ्या व १ गाय’ शेतकऱ्यांनी पाळाव्यात, असे सांगून, मंगरुळ गावातील २२ जणांनी माजी जिल्हाधिकारी मा. आंचल गोयल यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘सिल्क अॅण्ड मिल्क’ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमात पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. आर. पाटील यांनी दुषित अन्नामुळे वाढणाऱ्या कर्करोगाच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच जनावरांमध्ये फऱ्या व घटसर्प रोगांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली.
शेवटी अशा उपक्रमांमुळे जनावरांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि लसीकरण मोहीमा नियमितपणे राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या कार्यक्रमात वेदांत वरखडे, सिध्दी शिंदे, उन्नती शहाणे, गौरी शिंदे, धीरज शिंदे व इतर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन शितल वाघमारे या विद्यार्थिनीने केले, तर आभार प्रदर्शन रोहित चव्हाण यांनी केले.