कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि भारतीय कृषि अनुसंधान
परिषद यांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण देशभर "विकसित कृषि संकल्प अभियान"
राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक
मार्गदर्शन, आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे प्रसारण आणि
शास्त्रज्ञांच्या प्रत्यक्ष भेटीद्वारे संवाद साधला जात आहे. मराठवाडा विभागासाठी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांच्या मार्गदर्शनखाली विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठस्तरीय
सूक्ष्म नियोजन केले आहे.
या उपक्रमाअंतर्गत परभणी येथील कृषि विज्ञान केंद्र आणि कृषि विभाच्या वतीने
दिनांक ६ जून रोजी मौजे रुढी, तालुका मानवत, जिल्हा परभणी येथे
कृषी जागर व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी मौजे रुढीचे सरपंच मा. श्री. मुसा कुरेशी पठाण होते.
या कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे
मृदशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. एच. वैद्य, उपसंचालक संशोधन
डॉ. हरीहर कौसडीकर, केंद्रीय लिंबुवर्गीय फळबाग संशोधन
केंद्र, नागपूर येथील शास्त्रज्ञ डॉ. नरेश मेश्राम, तसेच कृषि विज्ञान केंद्र, परभणीचे शास्त्रज्ञ श्री.
अमित तुपे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
तांत्रिक सत्रात डॉ. पी. एच. वैद्य यांनी मृद परिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करताना, माती नमुना
घेण्याची योग्य पद्धत समजावली. फळबागेसाठी किमान ३ फुट खोल खड्डा करून नमुना
घ्यावा, तसेच ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण अधिक आहे, त्या जमिनीत लिंबुवर्गीय पिकांची लागवड करू नये, असे
त्यांनी सांगितले.
डॉ. हरीहर कौसडीकर यांनी नैसर्गिक शेतीतील जैविक खत निर्मिती, संत्रा पिकातील खत
व्यवस्थापन, मातीचे आरोग्य सुधारण्याचे उपाय, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व आणि 'बायोमिक्स'चा वापर याविषयी सविस्तर माहिती दिली.
डॉ. नरेश मेश्राम यांनी फळबाग लागवडीसाठी योग्य कलमे निवडणे, बहार व्यवस्थापन,
एकात्मिक किड-रोग व्यवस्थापन यावरील तांत्रिक बाबींचे सखोल
मार्गदर्शन केले. तसेच परभणी जिल्ह्यात संत्रा पिकांवरील रोग व्यवस्थापनासाठी
केंद्राकडून करण्यात आलेल्या उपाययोजना स्पष्ट केल्या.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. अमित तुपे यांनी सादर केली. त्यांनी
सांगितले की, कृषि विज्ञान केंद्र, परभणीमार्फत जिल्ह्यातील ९०
गावांमध्ये "विकसित कृषि संकल्प अभियान" राबवले जात असून, शास्त्रज्ञांच्या भेटीद्वारे खरीपपूर्व नियोजन, नविन
तंत्रज्ञान, शासकीय योजना यांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांचा फीडबॅक घेण्यात येतो,
ज्यातून भविष्यातील संशोधन व तंत्रज्ञान सुधारण्यासाठी दिशा मिळते.
तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित "महाविस्तार" ॲपद्वारे हवामान
अंदाज, पीक लागवड मार्गदर्शन, बाजारभाव आदींची अधिकृत
माहिती शेतकऱ्यांना मिळणार असून, त्यांनी हे ॲप डाउनलोड
करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विकास खोबे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.
तुकाराम धोपटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संबंधित अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.