Wednesday, July 3, 2024

वनामकृविच्या कृषि विज्ञान केंद्राचा १०० वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न

 कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान आत्मसात करुन शेतकऱ्यांनी  प्रगती साधावी.... मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीच्या छत्रपती संभाजीनगर येथील कृषि विज्ञान केंद्रामध्ये महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी कृषिदिन म्‍हणुन साजरी करण्‍यात आली तसेच केंद्राचा १०० वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी (भाप्रसे), पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विकास मीना (भाप्रसे), श्री.ब्रिजेश मिश्रा (आयपीएस), विभागीय कृषि सह संचालक डॉ.तुकाराम मोटे, माजी जि.प.अध्यक्ष श्री. पाथ्रीकर, हे होते. तसेच व्यासपीठावर आत्माचे प्रकल्प संचालक श्री. बालासाहेब तौर, शास्त्रज्ञ डॉ. भगवानराव कापसे, विद्यापीठाचे डॉ. गिरधारी वाघमारे, डॉ.सूर्यकांत पवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री प्रकाश देशमुख, कृषी विकास अधिकारी श्री. प्रकाश पाटील, इफकोचे श्री.सुनील कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन करण्यात आली. कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करुन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात बोलताना मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी शेतकरी देव भव! हे उद्गार वापरुन शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त करून शेतकऱ्यांचा सन्मान केला. ते पुढे म्हणाले की, कृषि विद्यापिठाने विकसित केलेले तंत्रज्ञान आत्मसात करुन शेतकरी बंधु ‍भगिनींनी आपली प्रगती साधावी आणि उत्पन्न वाढवावे तसेच हे ज्ञान आपल्यापुरते मर्यादित न ठेवता इतरांना द्यावे, यातुन सामाजिक प्रगती होईल. शेतकरी बांधवांनी रासायनिक खताचा वापर शिफारशीनुसारच करावा, याबरोबरच मृद संधारण व जल संधारण करण्यास सहभाग घ्यावा आणि वृक्ष लागवडीच्या माध्यमातून जमिनीची धुप रोखण्यासाठी प्रयत्न करावे यातूनच जमिनेचे आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल राखता येईल. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विद्यापिठाच्या स्तरावर विभागीय एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करुन शेतकऱ्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठीचे  विभागीय प्रशिक्षणाचे आयोजन भविष्यात करण्यात येईल असे नमूद केले.

कार्यक्रमात जिल्हाधिकारी मा. दिलीप स्वामी म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रातील कृषि विकासासाठी अद्वितीय कार्य केले. कृषि विद्यापिठाच्या माध्यमातून होणारे संशोधन मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहे. कृषि विद्यापिठातील संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले तरच शेतकरी समृद्ध होईल. शेतीला आधुनिकेतेची जोड मिळाल्याने कृषि उत्पादन वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले पारंपरिक ज्ञान आणि अनुभवाला नव तंत्राज्ञाची जोड देणे आवश्यक आहे,  असे त्यांनी प्रतिपादन केले.

यावेळी जिल्ह्यातील ११० शेतकरी (DFI) आणि १४ महाराष्ट्र शासनाकडुन कृषि पुरस्कार प्राप्त बंधू भगिनींचा सन्मान करण्यात आला. तसेच कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ निर्मित पौष्टिक भाजिपाला बियाणे किट आणि कृषि उद्योजक श्री व सौ लोलगे निर्मित नैसर्गिक किट (गाडुंळ खत, गाडुंळ पाणी व फुले भाजिपाला) किट विमोचन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये एकुण ३६२ अशा मोठ्या संख्येने शेतकरी बंधू भगिनी सहकुटुंब उपस्थित होते.