Monday, July 29, 2024

ताबडतोब करा कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन.....

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला 


बऱ्याच ठिकाणी झालेल्या पाऊसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला “आकस्मिक मर” असे म्हणतात. कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण  पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशावेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते. आकस्मिक मरचा प्रादुर्भाव दिसताच पुढील प्रमाणे व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ  डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत, आणि श्री.एम.बी. मांडगे यांनी केले आहे.

जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा, वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी, तसेच लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया+ १०० ग्रॅम पांढरा पोटॅश (००:००:५० खत ) + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली याप्रमाणे आळवणी करावी. किंवा  १ किलो १३:००:४५ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी. या प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी.

या सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल. असे आवाहन विद्यापीठाच्‍या वतीने करण्‍यात आले असुन अधिक माहितीसाठी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा विद्यापीठाचा व्हाट्सॲप क्रमांक ८३२९४३२०९७ यावर संपर्क करावा.







संदेश क्रमांक: ०३/२०२४  (२९ जुलै २०२४)