Sunday, September 1, 2024

कृषी आणि संलग्न अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत केंद्रनिहाय (जागेवरील) प्रवेश फेरीची प्रक्रिया दिनांक ५ सप्टेंबर पर्यंत

 कृषी शिक्षणात उज्वल भविष्यासाठी अनेक संधी.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

कृषी आणि संलग्न अभ्यासक्रमाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीभूत केंद्रनिहाय (जागेवरील प्रवेश) प्रवेश फेरीची प्रक्रिया सुरू असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया केंद्रास विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी दिनांक १ सप्टेंबर रोजी भेट दिली व प्रवेश प्रक्रियेचे अवलोकन केले. या वेळी सहयोगी अधिष्ठाता तथा प्रवेश प्रक्रिया समिती अध्यक्ष डॉ. सय्यद इस्माईल, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, प्रवेश प्रक्रिया समितीचे सदस्य सचिव डॉ. डी.के. झाटे आदींची  उपस्थिती होती.    

यावेळी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ देशातील आणि महाराष्ट्रातील नामांकित विद्यापीठ असून विद्यापीठाने अनेक क्षेत्रात भरारी घेतलेली असून विद्यापीठाद्वारे कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, सामुदायिक विज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन या कृषी आणि कृषी संलग्न शाखेमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवीचे शिक्षण दिले जाते. त्यांनी या अभ्यासक्रमाच्या महत्त्वाबद्दल आणि संधींबद्दल माहिती देताना, कृषी हे एक प्रमुख क्षेत्र आहे जे भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कृषी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना कृषी तंत्रज्ञान, शेती व्यवस्थापन, पशुपालन, फळबागा, मत्स्यपालन इत्यादी विषयांवर सखोल ज्ञान प्राप्त होते. हे शिक्षण ग्रामीण विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात मदत करते. तसेच कृषी शिक्षणातून विद्यार्थ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळते, ज्यामुळे ते अधिक उत्पादनक्षम आणि पर्यावरणपूरक पद्धतीने शेती करू शकतात आणि उत्तम पद्धतींची माहिती मिळाल्याने त्याचा वापर करून शेतीची उत्पादन क्षमताही वाढते. तसेच कृषी शिक्षणामुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. यातून ग्रामीण भागातील लोकसंख्येचे जीवनमान उंचावण्यास मदत करते.

याबरोबरच कृषी शिक्षणात उज्वल भविष्यासाठी अनेक संधी आहेत. विद्यार्थी शेतीतील संशोधनात करिअर करू शकतात, ज्यातून नवे तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी मिळते. कृषी आणि संलग्न शाखेतील सर्व आभ्यासक्रमास व्यवसायिक आभ्यासक्रम म्हणून मान्यता आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना अन्न प्रक्रिया, जैविक शेती, कृषी व्यापार, यंत्र निर्मिती, सेवा व शेती तांत्रिक सल्लागार, आहार तज्ञ, वस्त्र उद्योग, समुपदेशक, अशा विविध प्रकारच्या क्षेत्रांत व्यवसायिक संधी आहेत. यामध्ये शासकीय सेवेमध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या विविध संस्था, कृषी आणि पशुसंवर्धन विभाग, कृषि विद्यापीठे, या क्षेत्रात तांत्रिक शासकीय नोकऱ्या तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या व इतर स्पर्धात्मक परीक्षेमध्ये भव्य यश मिळण्यासाठी मोठ्या संधी आहेत. आजपर्यंत या विद्यापीठाचे विद्यार्थ्यां महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेत महत्वाच्या पदावर आपल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. यातून विद्यार्थ्यांना सामाजिक योगदान देण्याचीही संधी मिळते. असे हे कृषी आणि संलग्न शिक्षण आपल्या विभागाच्या आणि एकूणच देशाच्या समग्र विकासासाठी आणि शाश्वत कृषी विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणून प्रवेशासाठी आलेल्या तसेच अंतिम यादीतील सर्व  पात्र विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना कृषी व संलग्न अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी केले. 

या सर्व अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया दिनांक ३० ऑगस्ट पासून सुरू असून केंद्रीभूत केंद्रनिहाय (जागेवरील प्रवेश) प्रवेश फेरीचा प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा द्वारे शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ मध्ये कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रमासाठी प्रकाशित अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आपले नाव असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी विद्यापीठाचे पदवी प्रवेश केंद्र कृषी महाविद्यालय परभणी येथे परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील तर कृषी महाविद्यालय लातूर येथे लातूर, बीड व धाराशिव या जिल्ह्यातील तसेच कृषी महाविद्यालय बदनापूर येथे जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व घटक व विनाअनुदानित महाविद्यालयांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश फेरी राबविली जात आहे. याकरिता दिनांक ३ सप्टेंबर रोजी  ३५  व त्यापेक्षा अधिक पर्सेंटाइल  (इतर अधिभारासह) तर दिनांक ४ सप्टेंबर रोजी सर्व पात्र उमेदवार आणि दिनांक ५ सप्टेंबर रोजी सर्व पात्र उमेदवार (जागांच्या रूपांतरासह) यांना बोलावले आहे. उमेदवारांनी https://agri2024.mahacet.org या संकेतस्थळावर भेट देऊन शाखानिहाय व महाविद्यालयनिहाय रिक्त जागांचा तपशील पहावा आणि संबंधित महाविद्यालयाच्या जिल्ह्याच्या केंद्रामध्ये दिनांक ३, ४ आणि ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे व आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन पुनश्च एकदा विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी केले.