Sunday, September 1, 2024

वनामकृवि मराठवाड्यात अपारंपरिक फळबागांचा विकास आणि आधुनिक फळ शेतीसाठी प्रयत्नशील

 शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठ आणि कृषि विभाग एकत्र... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभाग आणि राज्य शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्रात दिनांक ३१ ऑगस्ट रोजी अपारंपरिक आणि महत्त्वाची उद्यान पिके व्यवस्थापनावर विचारमंथन कार्यशाळा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे होते. या सत्रासाठी प्रमुख अथिती केंद्रीय फलोत्पादन आयुक्त डॉ. प्रभात कुमार हे होते तर विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांची विशेष उपस्थिती होती. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, प्रभारी अधिकारी डॉ. जी एम वाघमारे, केंद्रीय प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पाटील आदींची उपस्थिती होती.      

अध्यक्षीय भाषणात बोलताना कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी सांगितले की, मराठवाड्यात  कोरडवाहू शेती क्षेत्र हे अधिकचे असून, येथील फळबागांची लागवड एक आव्हानात्मक कार्य आहे. मराठवाड्यातील पारंपरिक फळबागा शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, कमी पाण्यावर येणाऱ्या देशातील इतर राज्यांमध्ये आणि जगभरात होत असलेल्या आधुनिक फळ पिकांना तसेच सीताफळ, पेरू यांसारख्या फळझाडांची लागवड वाढवून मराठवाड्यात पारंपरिक फळ बागांचा विकास आणि आधुनिक फळ शेतीसाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. मराठवाड्यातील फळबागांसाठी नव्या संधी आहेत. मराठवाडा ही संतांची भूमी असून या भूमीत आधुनिक फळ शेती आणण्यासाठी शेतकरी,  कृषि विद्यापीठ आणि राज्याचा कृषि विभाग एकत्रितपणे कार्य करत आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आधुनिक फळ शेतीच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. विद्यापीठास प्राप्त मुख्यमंत्री निधीतून अंबाजोगाई येथे सीताफळावर प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल असे त्यांनी प्रतिपादन केले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्रीय फलोत्पादन आयुक्त डॉ. प्रभात कुमार यांनी शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या अपारंपारिक फळझाडांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांचा योजनांमध्ये समावेश केला जाईल अशी महत्त्वाची घोषणा विचारमंथन कार्यक्रमात केली. महाराष्ट्र राज्य विविध फळांच्या लागवडीसाठी ओळखले जाते. येथील शेतकरी उपक्रमशील असून, त्यांनी अपारंपारिक फळझाडांची लागवड केली आहे. डॉ. कुमार यांनी शेतकऱ्यांच्या या नावीन्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले आणि ते योजनेत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी पुढे सांगितले की, भारतातील फळशेतीत विविधता आहे. देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे घेतली जातात, ज्यामुळे आपल्या देशात फळांची मोठी विविधता निर्माण झाली आहे. तसेच, देशातील दळणवळण व्यवस्थेमुळे एका भागातील फळे दुसऱ्या भागात सहजपणे उपलब्ध होतात. त्यांनी सांगितले की, दरवर्षी फळबागांच्या क्षेत्रात वाढ होत असून, या क्षेत्रातून शेतकरी नक्कीच समृद्ध होणार आहेत.

प्रास्तविकात संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी, मराठवाड्यातील फळबागांचे क्षेत्र वाढविण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ते क्षेत्र टिकवून ठेवण्यासाठी कार्य सुरू आहे. जमिनीच्या गुणधर्मानुसार फळझाडांची लागवड केली तर भविष्यातील समस्या टाळता येतील, असे नमूद केले.

विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेती उत्तम असल्याचे सांगितले. विविध पिकांसोबत फळझाडेही बहरत असल्याचे त्यांनी नमूद केले. परंतु, नाविन्यपूर्ण फळझाडांची रोपे महागडी असल्याने शेतकऱ्यांना केंद्रीय स्तरावरून पाठबळ देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

उद्घाटन सत्रानंतर दिवसभर राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी ड्रॅगन फ्रूट, अवोकॅडो , खजूर, अंबा लागवड, व्यवस्थापन आणि प्रक्रिया व विक्री या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच काढणीपश्चात नुकसान कमी करण्यासाठी आणि मूल्यवर्धित उत्पादनांची वाढ करण्यासाठी समुदाय किंवा क्लस्टर प्रक्रिया युनिट्स स्थापन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले गेले. संरक्षित शेती आणि उर्ध्वगामी शेती यासारख्या संकल्पनांवर डॉ. मुरतुझा हसन यांनी चर्चा केली, तर अपेडा मुंबईच्या डॉ. नागपाल लोहकरे यांनी चांगल्या विपणनासाठी, ब्रँडिंग, थेट ग्राहकांना विक्री, आणि हॉर्टनेट प्लॅटफॉर्मद्वारे निर्यातीसाठी शेतनोंदणीसारख्या बाबी विशद केल्या तसेच डॉ. अनंत जावळे यांनी खजूर लागवड आणि डॉ दिनेशकुमार यांनी फळ पिकांचे मूल्यवर्धन याबाबत माहिती  सांगितली.

परिषदेचा समारोप डॉ. मधुकर पोतदार, डॉ. पी.के. सिंह, डॉ. प्रकाश त्रिपाठी, आणि डॉ. डी.एम. पंचभाई यांनी मराठवाड्यातील फलोत्पादन क्षेत्राला बळकटी देणे, शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणे, आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या उपजीविकेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने महत्वपूर्ण शिफारशी देवून करण्यात आला.

सूत्रसंचालन डॉ. सुरेखा कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सेवा निवृत्त कृषि शास्त्रज्ञ डॉ मोहन पाटील आणि विद्यापीठातील कृषि शास्त्रज्ञ डॉ राकेश अहिरे, डॉ सूर्यकांत पवार डॉ दीपक पाटील डॉ किरण जाधव डॉ पंडित मुंडे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, उद्यान विद्या बिभागाचे सर्व शास्त्रज्ञ, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य विद्यार्थी तर कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, सुभाष आघाव, व्यंकट ठक्के, ज्ञानेश्वर तारगे, बाळराजे मुळीक आदी उपस्थित होते. तसेच शेतकरी बांधवांत छत्रपती सभजीनगर  आणि जालना जिल्ह्यातील निवडक फळ शेती करणारे शेतकरी यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. रवी नैनवाड, डॉ. विजय सावंत आणि श्री सुरडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.