Friday, September 6, 2024

खरा शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतः समान बनवतो... कुलगुरू मा. डॉ इन्द्र मणि

 शिक्षक दिनानिमित्त वनामकृवित नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनावर व्याख्यानमालेची सुरवात


शिक्षक दिनाचे औचित्य साधून भारतीय मृदविज्ञान संस्था नवी दिल्लीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील शाखेच्या वतीने नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन शाश्वत शेतीसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान या विषया अंतर्गत व्याख्यानमालयाचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. व्याख्यानाचे पहिले पुष्प राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शाश्वत शेतीसाठी स्मार्ट तंत्रज्ञानासाठी संशोधन पद्धती शिकवणे; या विषयी माननीय कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाने शिक्षक दिन साजरा केला. याप्रसंगी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ.भगवान असेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी भविष्यातील नाविन्यपूर्ण संशोधनाचा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे उपयोग करता येईल यावर विवेचन केले. विज्ञानातील प्रत्येक सिद्धांत व्यक्तीच्या जीवनाशी निगडित कसा आहे याबाबतचे उदाहरणासहित स्पष्टीकरण देवून शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना कसे अवगत करता येईल हे नमूद केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्य उल्लेखाचा गौरव करीत त्यांच्या सहज आणि सरळ वृत्तीने शिक्षकांचा मोलाचा वाटा विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यामध्ये कसा असतो यावर भाष्य केले. परीस लोखंडाला सोने बनवतो पण खरा शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतः समान बनवतो. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करणारा हा खरा शिक्षक आहे असे सांगून त्यांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, एम एस स्वामीनाथन, नेल्सन मंडेला, अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या तत्त्वज्ञानाची व शैक्षणिक कार्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही शिक्षणामध्ये शास्त्र, कला शिक्षणासोबतच उच्च दर्जेचे शिक्षण घेऊन योग्य प्रकारे जीवनात व सामाजिक उन्नतीसाठी उपयोगात आणावे. विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास साधावा व कार्यमग्न राहावे. शिक्षणाने ज्ञान, ज्ञानातून विनयशीलता, विनयशीलतेतून पात्रता, पत्रातेतून धन  आणि धनातून शक्ती प्राप्त होते. ज्ञान, धन आणि शक्ती अनेकांना मिळते परंतु याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. ज्ञान वाटावे, धन दान करावे, आणि शक्ती चांगल्या कार्यासाठी वापरावी. नवीन शैक्षणिक धोरणाबाबत म्हणाले की, हे कौशल्य आधारित शिक्षणावर भर देणारे शिक्षण पद्धती असून यामध्ये दुहेरी संवादास महत्त्व दिलेआहे. यात भरपूर प्रमाणात लवचिकता ठेवलेली आहे. याबरोबरच आपण ज्या संस्थेत कार्य करतो त्यास पूर्ण समर्पित भाव ठेवून कार्य करावे व त्या संस्थेचे हित जपावे आणि आपल्या दैनंदिन कार्याचा तसेच जीवनाचा आनंद घ्यावा असा सल्ला देवून विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी  आणि विद्यार्थी यांना आशीर्वादरुपी शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकात विभाग प्रमुख यांनी डॉ. प्रवीण वैद्य व्याख्यानमालेच्या आयोजनाचे महत्त्व आणि या उपक्रमाचे सर्वकष माहिती दिली तर डॉ.रामप्रसाद खंदारे यांनी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांचा कार्याचा परिचय करून दिला.

सूत्रसंचालन डॉ. पपीता गोरखेडे तर आभार डॉ. सुदाम शिराळे यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माननीय कुलगुरू यांचे तंत्र अधिकारी डॉ. प्रवीण कापसे, श्री इंगळे, डॉ. संतोष फुलारी डॉ.अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. गजभिये, डॉ झाडे डॉ.चिक्षे डॉ. पिल्लेवाड, डॉ. सिलेवंत, श्री भानुदास इंगोले श्री मदन रणेर श्री आनंद नंदनवरे आणि विभागातील विद्यार्थी यांनीपरिश्रम घेतले.