Saturday, September 21, 2024

तीन दिवसीय शिवारफेरीचे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते उद्घाटन

हवामानातील बदलामुळे शेतीतील नियोजनात बदल करावे लागतील.... कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि

देशाच्या विकासात शेतीचा प्रमुख वाटा आहे. शेती आणि शेतकऱ्यानां वगळून कोणताच विकास साधता येत नाही. शेती पुढे हवामान बदलासारखी मोठी आव्हाने उभे टाकत आहेत. ते पेलण्यासाठी शेतीत आवश्यक बदल करावे लागतील. शेतीमध्ये ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञाचा वापर, यांत्रिकीकरणावर भर देवून आव्हाने पेलण्यासाठी शेतकऱ्यात क्षमता निर्माण करावी लागेल. शेतकऱ्यांत आर्थिक सुबकता व स्थैर्य आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यासाठी महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठे कार्य करत आहेत, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांनी केले

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शुक्रवार त रविवार अशा तीन दिवशी शिवार फेरीचे शुक्रवारी दिनांक २० सप्टेंबर रोजी त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते शेतकऱ्यांसह कृषी शास्त्रज्ञांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ.  संगिता अढाऊ, आमदार मा श्री. अमोल मिटकरी, आमदार मा  श्री. किरण सरनाईक, पंदेकृविचे कुलगुरू मा. डॉ. शरद गडाख,  महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक मा श्री.  रावसाहेब बागडे (IAS), भारत सरकारच्या निती आयोगाचे माजी सदस्य डॉ. व्ही ही. सदामते, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री योगेश कुंभेजकर, विभागीय कृषी सहसंचालक श्री किसन मुळे (अमरावती) श्री. शंकर तोटावर (नागपूर) डॉ. हरिहर कौसडीकर यांच्यासह विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य व विद्यापीठाचे संचालक, प्राचार्य आणि विविध विभागाचे प्रमुख यांचे उपस्थिती होती. 

कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि पुढे म्हणाले की, हवामानातील बदलामुळे शेतीतील नियोजनात बदल करावे लागतील, नवीन तंत्रज्ञानासह स्वयंचलित शेती करून शेती मधला खर्च कमी करावा लागेल. कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाचे संशोधने तसेच त्याचा वापर करण्याची गरजही त्यांनी विशद केली.

यावेळी मा. सौ.  संगिता अढाऊ, आमदार मा श्री. अमोल मिटकरी, आमदार मा  श्री. किरण सरनाईक, पंदेकृविचे कुलगुरू मा. डॉ. शरद गडाख यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त दरवर्षी शिवार फेरीचे आयोजन केले जाते. यामध्ये जवळपास २० एकर प्रक्षेत्रावर विविध पिकांचे जिवंत पीक प्रात्यक्षिके दाखवण्यात येतात. याशिवाय कृषी विद्यापीठाचे निर्मित शेतीविषयक तंत्रज्ञान तसेच विविध वाणाचे शेतकऱ्यांना प्रदर्शन आयोजित केले जाते. यातून शेतकरी आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करतात. शिवारफेरीत पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने विविध जिल्ह्यातून शेतकरी सहभागी झाले होते यामुळे विद्यापीठात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.