Friday, October 18, 2024

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या रावे विद्यार्थ्यांनी ग्रामीण कुटुंबियांमध्ये केला तंत्रज्ञानाचा प्रसार

 पालकांनी बालकांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष द्यावे.... डॉ. जया बंगाळे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी 'रावे' (ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम) उपक्रमांतर्गत रायपूर (ता. परभणी) येथे शेतकरी कुटुंबांसाठी विविध उपक्रम राबवले. दिनांक ३ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शेतकरी कुटुंबांची कौशल्यवृद्धी करत, त्यांना सामुदायिक विज्ञान तंत्रज्ञान अवगत करून दिले. या तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागातील कुटुंबांना आत्मनिर्भर बनवण्याचा उद्देश होता.

दिनांक १८ ऑक्टोबर रोजी रायपूर येथे या उपक्रमाचा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. दत्ता गिरी आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. भीमराव सूर्यतळ उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. जया बंगाळे यांनी रावे उपक्रमात सहभाग घेतलेल्या ग्रामकन्या आणि ग्रामदूत विद्यार्थ्यांनी ग्रामीण कुटुंबांपर्यंत सामुदायिक विज्ञानाचे तंत्रज्ञान पोहोचविल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी ग्रामीण भागातील शाळांमधील शैक्षणिक प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढले आणि पालकांना बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक लक्ष देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, तसेच नैतिक मूल्यांच्या जपणुकीचे महत्त्व पटवून दिले. तसेच यानिमित्ताने स्कूल कनेक्ट उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत कृषी शिक्षणाचे शास्त्रोक्त धडे देखील गिरवावे लागणार असल्याने बालपनापासूनच ते कृषि क्षेत्राकडे आकर्षित होतील असे त्यांनी विशद केले. तसेच कृषि क्षेत्रात उच्च शिक्षण घेतल्याने त्यांना अनेक नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध राहणार असल्याने त्यांनी कृषि विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन केले.

प्रास्तविकात कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी रावे उपक्रमाची माहिती दिली. यावेळी संपर्क कुटुंबातील सदस्य ममता मस्के यांनी ग्रामदूत व ग्रामकन्या यांच्या मार्गदर्शनामुळे कुटुंबांना सामुदायिक विज्ञान तंत्रज्ञान आणि कौशल्यविकास साध्य झाल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. शालेय विद्यार्थिनी वैष्णवी बालशंकर हिनेही या उपक्रमातून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी आणि रावेच्या ग्रामदूत व ग्रामकन्या यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे रावे परीक्षक डॉ. अश्विनी बिडवे, डॉ. अश्विनी बेद्रे, प्रा. ज्योती मुंडे, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आकांक्षा थोरात यांनी केले.