Thursday, October 3, 2024

वनामकृवितील कृषि महाविद्यालयात स्वच्छता मोहीम उत्साहात साजरी

 


परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या परभणीमध्ये राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेऊन स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता आणि स्वच्छ भारत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले, ज्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमात, माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी दूरभाष्य प्रणालीद्वारे स्वच्छता अभियानात सहभागी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी गांधीजींच्या विचारांची आठवण करून देत, स्वच्छता हे एक दिवसाचे कार्य न ठरवता, नेहमीच ते पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यांनी स्वच्छ परिसर, स्वच्छ मन आणि स्वच्छ पर्यावरण याचे महत्त्व अधोरेखित केले.

स्वच्छता अभियानात महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांनीही सहभाग घेतला. त्यांनी स्वच्छतेचे संदेश देत विद्यार्थ्यांना आणि स्वयंसेवकांना प्रेरित केले. या अभियानात महाविद्यालयातील १०० राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी श्रमदान केले.

स्वच्छता मोहिमेनंतर महाविद्यालयाच्या सभागृहात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी "स्वच्छ भारत का इरादा" या नाटिकेची सादरीकरण केले, ज्यात शुभांगी राऊत, श्रुती येरावाड, श्वेता दुधाटे, वैष्णवी पाटील, अर्पिता जाधव आणि दीक्षा त्रिभुवन यांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विविध गांधीवादी विचारांवर भाषण सादर केली, ज्यात कृष्णकांत पोरडत, दिनेश काळे, सिद्धी शिंदे, तृप्ती कुमारी, तनुश्री, आणि ऐश्वर्या पवार यांनी महत्त्वाचे विचार मांडले. वर्षा महानंदीया यांनी "एकला चलो रे" हे बंगाली गीत सादर करून उपस्थितांना गांधीजींच्या विचारांनी प्रेरित केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भाग्यरेषा गजभिये आणि प्रा. संजय पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.