Tuesday, October 1, 2024

वनामकृविच्या नांदेड येथील कृषि महाविद्यालयाचा दीक्षारंभ समारंभ संपन्न

 शिस्तप्रिय आणि चारित्र्यवान होवून जीवनात उत्कर्ष साधावा...कुलगुरु मा.डॉ.इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात भरीव योगदान दिलेले असून सक्षम मनुष्यबळ विकास साधला आहे, असे प्रतिपादन कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि यांनी केले. ते दिनांक ३० सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या नांदेड येथील कृषि महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ मध्ये बी. एससी. (कृषी) या पदवी अभ्यासक्रमास प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित दीक्षारंभ समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महारष्ट्राच्या प्रशासनात विविध महत्त्वाच्या पदांवर या विद्यापीठातील विद्यार्थी यशस्वी सेवा बजावत आहेत. विद्यार्थ्यांनी शिस्तप्रिय आणि चारित्र्यवान होवून जीवनात उत्कर्ष साधावा आणि आदर्श नागरिक बनावे. याद्वारे विद्यार्थ्यांनी स्वतःचा आणि आपल्या कुटुंबियांचा विकास साधावा असे नमूद केले.

कार्यक्रमासाठी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड येथील वन विभागाचे, उप वन संरक्षक अधिकारी श्री केशव वाबळे (आयएफएस) हे होते. व्यासपीठावर कुलसचिव श्री संतोष वेणीकर, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य श्री भागवत देवसरकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, माजी  संशोधन संचालक (बियाणे) डॉ. देवराव देवसरकर आदींची उपस्थिती होती.

या प्रसंगी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी नवीन शैक्षणिक धोरण या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात आवलंबिले जात असून यामध्ये शिक्षण जास्तीतजास्त व्यवसायाभिमुख व कौशल्याधारित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:चे शिक्षण पूर्ण करत असतांना आपल्या विविध कला-गुणांना वाव देवून आनंददायी करण्यावर भर देण्यात आला आहे, असे प्रतिपादन केले.

उप वन संरक्षक अधिकारी श्री केशव वाबळे यांनी, सध्या स्पर्धेचा काळ असल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःला सतत कार्यमग्न ठेवणे आवश्यक आहे. अभासाक्रमाच्या पहिल्या सत्रापासूनच आपले ध्येय निश्चित करावे व यश मिळवावे असे नमूद केले.

प्रास्तविकात  सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणि दीक्षारंभ कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक शैक्षणिक कार्यात तसेच क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.

यावेळी डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. सुजाता धूतराज, डॉ. विजय चिंचाने, डॉ. पवन ढोके, डॉ. संजय देवकुळे, डॉ. नरेशकुमार जायेवार, उज्वला सुरेवाड, प्रकाश सिंगरवाड, संतोष राठोड, जी पी इढोले, वर्षा ताटेकुंडलवार, श्रीकृष्ण वारकड आदीसह नवीन  प्रवेशित सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.