Tuesday, July 22, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” साजरा

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली संकरीत गो पैदास प्रकल्पाचा पुढाकार


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत संकरीत गो पैदास प्रकल्पाची स्थापना सन १९७५ मध्ये करण्यात आली. या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश म्हणजे देशी जातीच्या गाईंचे संकरीकरण करून दुग्धोत्पादन वाढवणे आणि त्याचबरोबर देशी गोवंशाचे संवर्धन करणे हा आहे. मराठवाड्यातील प्रसिद्ध देवणी जातीची जनावरे ही दुहेरी उपयोगिता (दुग्धोत्पादन व शेतीकाम) यासाठी ओळखली जातात.

सद्यःस्थितीत प्रकल्पात होलस्टीन फ्रिजियन (होलदेव) व देवणी गोवंशाचे एकूण १७० जनावरे आहेत, त्यापैकी ९० जनावरे ही देवणी गोवंशाची आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या दिनांक १३ जून २०२५ च्या आदेशानुसार राज्यात दरवर्षी २२ जुलै रोजी “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

देशी गायीच्या दुधाची पौष्टिकता, तसेच शेण व गोमुत्राच्या उपयोगामुळे गायीस "कामधेनू" असे मानले जाते. राज्यातील विविध भागांत विविध देशी गायींच्या जाती आढळतात. उदा. मराठवाड्यात देवणी, लालकंधारी; पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार; उत्तर महाराष्ट्रात डांगी; तर विदर्भात गवळाऊ. मात्र, देशी गायींची संख्या दिवसेंदिवस घटत चालल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी शासनाने २० सप्टेंबर रोजीच्या निर्णयान्वये देशी गायीस “राज्यमाता गोमाता” म्हणून घोषित केले आहे.

या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत संकरीत गो पैदास प्रकल्प येथे दिनांक २२ जुलै २०२५ रोजी “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांच्या पुढाकाराने, तसेच प्रकल्प प्रमुख व विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रातिनिधिक स्वरूपात देवणी गायीची पूजा करून करण्यात आली. प्रारंभी विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांनी देशी गोवंशातील विविधतेचे महत्त्व, वैदिक काळापासून चालत आलेली संवर्धन परंपरा, तसेच सेंद्रिय शेतीतील गोवंशाचे योगदान विषद केले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी पशुपालनाचा पर्याय आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचेही नमूद केले.

पशुविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. देशमुख यांनी प्रकल्पात १९७५ पासून देवणी गोवंशाचे संवर्धन आणि अभ्यास करण्यात येत असल्याची माहिती दिली. सहयोगी प्राध्यापक डॉ. डी. व्ही. बैनवाड यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. पी. व्ही. पडघान आणि शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र कांबळे यांनीही देशी गोवंशाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला.

पदव्युत्तर विद्यार्थी श्री. सार्थक वाजे व कु. सृष्टी भिंगारडे यांनी संकरीत गो पैदास प्रकल्पातील गोवंश संवर्धन व व्यवस्थापनासंबंधीचे आपले अनुभव शेअर केले. वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. जी. पी. भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. रवि काळे, कंत्राटी पशुधन पर्यवेक्षक श्री. महेंद्र कचरे, कंत्राटी गुत्तेदार श्री. माणिक शिंदे, तसेच पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी, प्रकल्पातील कामगार व भगिनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कापूस उत्पादकता व मूल्य साखळी रूपांतरण विषयक राष्ट्रीय परिषदेत वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे सखोल मार्गदर्शन

 

भारतीय अन्न व कृषी परिषद (ICFA) यांच्या वतीने "कापूस उत्पादकता व मूल्य साखळी रूपांतरण" या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन २२ जुलै २०२५ रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे करण्यात आले.

या परिषदेत “भारतामध्ये कापसाच्या वाढीसाठी धोरणात्मक व नियामक पाठबळ" या विषयास अनुसरून उद्घाटन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कापूस उत्पादकतेत वाढ घडवण्यासाठी धोरणात्मक आणि नियामक पाठबळ अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून संपूर्ण मूल्य साखळीत सुधारणा केल्यास कापूस क्षेत्राला अधिक स्थैर्य व आर्थिक लाभ मिळू शकतो, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले. पुढे त्यांनी कापसाच्या उत्पादनात होत असलेल्या घटीची प्रमुख कारणे स्पष्ट केली. हवामानातील अनियमितता, कीड व्यवस्थापन, उत्पादनाला मिळणारे बाजारमूल्य, तसेच संशोधन व विस्तार सेवांमधील अंतर ही त्यामागची महत्त्वाची कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कापसाच्या मूल्य साखळीतील सुधारणेसाठी त्यांनी "उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विपणन आणि निर्यात" या सर्व टप्प्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्व सांगितले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सूतगिरण्या, वस्त्र उद्योग व निर्यातदारांशी थेट जोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक लाभदायक दर मिळवून देता येतील. याशिवाय, कीडप्रतिरोधक वाणांचा वापर, सूक्ष्म सिंचन पद्धती, हवामान आधारित सल्ला व डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर यावर त्यांनी विशेष भर दिला.

या वेळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या नांदेड ४४’ या वाणाची माहिती त्यांनी दिली. यासोबतच विद्यापीठाने कापूस पिकावर केलेल्या संशोधनाचा आढावा घेत एनएच २२०३७ बीटी बीजी २’ आणि एनएच २२०३८ बीटी बीजी २’ हे बीटी बीजी-२ प्रकारातील सरळ वाण सादर केले असल्याची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.

या परिषदेच्या उदघाटन समारंभास कर्नाटक राज्य कृषी किंमत आयोगाचे अध्यक्ष व पंतप्रधान शेतकरी उत्पन्न दुप्पट योजना टास्क फोर्सचे माजी अध्यक्ष श्री अशोक दलवाई (निवृत्त आयएएस), इंडियन टेक्स्टाइल्स इंडस्ट्री फेडरेशनच्या महासचिव श्रीमती चंद्रिमा चॅटर्जी, वस्त्रोद्योग मंत्रालयाचे संचालक श्री पुर्णेश गुरु राणी (IRS), भारतीय अन्न व कृषी परिषदेचे महासंचालक डॉ. तरुण श्रीधर आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली व आपले विचार मांडले. कार्यक्रमात कपाशी उत्पादनातील आव्हाने, प्रक्रिया उद्योगाची क्षमता, जागतिक निर्यात संधी, तंत्रज्ञानाचा वापर व शाश्वत शेती या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

परिषदेत देशभरातील कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, उद्योजक आणि शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Sunday, July 20, 2025

कृषि विज्ञान केंद्रांची ८वी वार्षिक कार्यशाळा भुज, कच्छ (गुजरात) येथे सुरू

 वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि कार्यशाळेचे मुख्य अतिथी

महाराष्ट्रगुजरात आणि गोवा राज्यांतील कृषि विज्ञान केंद्रांची (KVKs) ८वी वार्षिक विभागीय कार्यशाळा दिनांक २० ते २२ जुलै २०२५ या कालावधीत भुज, कच्छ (गुजरात) येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे आयोजन भारतीय कृषि अनुसंधान परिषद - कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग अनुसंधान संस्था (ICAR-ATARI), विभाग क्रमांक VIII, पुणे यांच्या वतीने करण्यात आले असून कच्छ I, कच्छ II, मेहसाणा व पाटण येथील कृषि विज्ञान केंद्रांचे सहकार्य लाभले आहे.

या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी विशेष भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी ‘महाविस्तार ॲप’चे महत्त्व सांगून कृषि विस्ताराच्या नव्या दिशा, संशोधनाचे महत्त्व आणि ते शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची आवश्यकता यावर भर दिला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रभावी विस्तार कार्य कसे करता येईल, याबाबत विविध विस्तार साधनांच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ "शेतकरी देवो भव:" या भावनेतून कार्य करत असून, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारे माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ आणि ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद’ हे देशातील आगळे-वेगळे मॉडेल्स शास्त्रज्ञांसमोर मांडले. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अशा प्रभावी विस्तार मॉडेल्सचा अवलंब सर्व कृषि विज्ञान केंद्रांनी करून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याबरोबरच, कृषि विज्ञान केंद्रे संशोधन केंद्रांच्या स्वरूपात पुढे यावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी नवी दिल्ली येथील भाकृअपचे कृषि विस्तार विभागाचे माजी उपमहासंचालक डॉ. पी. दास, सबौर येथील बीएयूचे माजी कुलगुरू डॉ. ए. के. सिंह, मोहनपूर येथील बीसीकेव्हीचे माजी कुलगुरू व आटारी, झोन-VIII, पुणे येथील साइट सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष डॉ. एम. एम. अधिकारी, तसेच सदाऊ (मुंद्रा) येथील आरएआरडीएसचे ट्रस्टी श्री. रजनीकांत पटवा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

नवी दिल्ली येथील भाकृअपचे कृषि विस्तार विभागाचे सहायक महासंचालक डॉ. आर. रॉय बर्मन यांनी ऑनलाइन माध्यमातून आपले विचार मांडले. कार्यक्रमात आटारी, पुणे संस्थेच्या कार्याचा आढावा सादर करताना संचालक डॉ. एस. के. रॉय यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच, आयएफएफसीओचे मुख्य कृषि अधिकारी डॉ. तरनिंदर सिंग यांनी आयएफएफसीओच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेत विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश अहिरे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व कृषि विज्ञान केंद्रांच्या कार्यक्रम समन्वयकानीं सहभाग नोंदविला घेतला आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी, आटारी-पुणे येथील प्राचार्य वैज्ञानिक डॉ. शाकिर अली सय्यद यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या कार्यशाळेत तीनही राज्यांतील कृषि विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ, तज्ज्ञ व अधिकारी सहभागी होत असून, विविध कृषि तंत्रज्ञान, विस्तार कार्यपद्धती, संशोधन प्रगती, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाणारे नवकल्पनांवरील चर्चासत्रे व आढावा सादरीकरणे आयोजित करण्यात येत आहेत.

या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे कृषि विज्ञान केंद्रांच्या कार्यक्षमतेत वाढ करून शेतकऱ्यांपर्यंत नावीन्यपूर्ण व शाश्वत तंत्रज्ञान पोहोचवणे आणि तिन्ही राज्यांमधील कृषि विज्ञान केंद्रांची मधील अनुभवांची देवाणघेवाण करणे हा आहे.




Saturday, July 19, 2025

वनामकृविच्या विद्यार्थ्याचे २२ वा अखिल भारतीय आंतर-कृषि विद्यापीठीय क्रीडा महोत्सवात यश

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले विद्यार्थ्याचे अभिनंदन


कुमारगंज (अयोध्या) येथील आचार्य नरेंद्र देव कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठात २२ वा अखिल भारतीय आंतर-कृषि विद्यापीठीय क्रीडा महोत्सव २०२४-२५” नुकताच संपन्न झाला. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील विविध कृषि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या क्रीडा संघांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला. या संघांना रवाना करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विशेष मार्गदर्शन व यशासाठी शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेत विद्यापीठाच्या गोळेगाव येथील कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी श्री. ओम पोले यांनी ८०० मीटर शर्यतीत तिसरे स्थान (Bronze Medal) पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या यशामुळे विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावर नाव उज्ज्वल झाले आहे.

विद्यार्थी ओम पोले यांच्या यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, प्रशिक्षक प्रा. डी. एफ. राठोड व प्रा. शिनगारे यांची उपस्थिती होती.






शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, हिंगोली जिल्ह्यात ‘पिक लागवड खर्च काढण्याची योजना’अंतर्गत मान्यवर शास्त्रज्ञांचा दौरा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिन मोरे आणि नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय अन्नधोरण संशोधन संस्था (IFPRI) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अंजनी कुमार यांनी हिंगोली जिल्ह्यातील पिक लागवड खर्च काढण्याची योजना’अंतर्गत निवडलेल्या क्लस्टर गावांना दिनांक १९ जुलै रोजी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून किमान आधारभूत किंमत (MSP) संदर्भातील अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले.

संवादादरम्यान शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीतील अडचणी मांडल्या. त्यात मुख्यत्वे अलाभकारक दर, बाजारातील अनिश्चितता, अनियमित पर्जन्यमान, वाढते उत्पादन खर्च आणि हमीभावाचा अभाव अशा समस्या होत्या. या पार्श्वभूमीवर डॉ. अंजनी कुमार यांनी नमूद केले की, सध्या अनेक शेतकरी पारंपरिक शेतीऐवजी हळदसारख्या नगदी पिकांकडे वळत आहेत. या पिकांना चांगला दर मिळतो, धोका तुलनेने कमी असतो, तसेच देशांतर्गत व निर्यात बाजारात याला वाढती मागणी आहे.

या प्रसंगी सहयोगी प्राध्यापक डॉ. रणजित चव्हाण, कनिष्ठ संशोधन सहायक श्री शहाजी ढोले, श्री अजयराव राठोड, श्री प्रशांत मडावी व श्री बी. बी. कानडे हेही उपस्थित होते.

हा दौरा शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाय सुचविणारा ठरला असून, शेतीतील नव्या पर्यायांकडे वळण्यास शेतकऱ्यांना नवी दिशा देणारा झाला आहे.



वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कांदा-लसूण संशोधन संचालनालय यांच्यात सामंजस्य करार

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कांदा आणि लसूण उत्पादनासाठी मोठा फायदा होईल....माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुणे येथील कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय यांच्यात दिनांक १८ जुलै २०२५ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या प्रसंगी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि अध्यक्षस्थानी होते.

या करारावर कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. विजय महाजन आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या सामंजस्य करारामुळे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयातील आधुनिक प्रयोगशाळांमध्ये संशोधनाची संधी मिळणार आहे. याशिवाय, दोन्ही संस्थांमध्ये संयुक्त संशोधन कार्यास गती मिळणार असून, विद्यापीठातील भाजीपाला संशोधन केंद्रामार्फत नविन संशोधन प्रकल्प हाती घेता येणार आहेत.

या माध्यमातून विकसित होणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कांदा आणि लसूण उत्पादनासाठी मोठा फायदा होईल, असा विश्वास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी डॉ. भगवान आसेवार संचालक शिक्षण, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. विश्वनाथ खंदारे, संशोधन संपादक डॉ. मदन पेंडके, तसेच कांदा आणि लसुण संशोधन संचालनालयाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजिव काळे आणि डॉ. भुषण बिबवे उपस्थित होते.




भारस्वाडा-उमरी (ता.जि. परभणी) येथे रावे अंतर्गत कृषि मेळावा संपन्न.

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील कृषि महाविद्यालया परभणी अंतर्गत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) आणि कृषि औद्योगीक संलग्नता उपक्रम (AIA) व कोरडवाहू शेती संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील शेतकऱ्यांसाठी पिक मार्गदर्शन व चर्चासत्र कार्यक्रम (कृषि मेळावा) भारस्वाडा येथे आयोजन करण्यात आले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारस्वाडा गावचे सरपंच श्री. व्यंकटी शिंदे, तर प्रमुख अतिथी म्हणून सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून  विभाग प्रमुख डॉ. पि. एस. नेहरकर, शास्त्रज्ञ डॉ. अनिल गोरे, डॉ. राजेंद्र जाधव व डॉ. प्रशांत जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. मकरंद भोगांवकर व प्रा. वैशाली बास्टेवाड, कृषि सहाय्यक श्री. कच्छवे तसेच प्रगतशील शेतकरी श्री. प्रमोद शेळके, श्री. नागोराव मंदिलवार, श्री. ज्ञानेश्वर भोसले, श्री. हनुमंतराव जुमरे व श्री. देविदास भालेराव आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी उत्तरे देऊन चर्चात्मक मार्गदर्शन करण्यात आले. कृषि महाविद्यालयाच्या वतीने निरनिराळ्या रोगांवर तयार केलेल्या विशेष प्रकारची कीटकनाशकांचे प्रदर्शन ज्यामध्ये  बायोमिक्स, ट्रायकोडर्मा, स्टिकी स्ट्रॅप, फेरोमन ट्रॅप, फ्रुटफ्लाय ट्रॅप, तुर व सोयाबीनचे विविध वाण मांडण्यात आले होते.

भारस्वाडा-उमरी या गावांमध्ये कृषि महाविद्यालयाचे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाच्या कृषि कन्या आणि कृषि दुतानी कार्यक्रमाचे आयोजन करून योग्यरित्या कार्यक्रम पार पाडला. या कृषि मेळाव्याला भारस्वाडा-उमरी येथील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.


Friday, July 18, 2025

वनामकृवित कृषि तंत्रज्ञान आणि विकास कार्यक्रमाच्या परिणाम मूल्यांकनावर कार्यशाळा संपन्न

 परिणाम मूल्यांकन हे सुधारणा व धोरणनिर्मितीसाठी अमूल्य साधन – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
आयएफपीआरआयचे (IFPRI
वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अंजनी कुमार 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि विस्तार शिक्षण आणि कृषि अर्थ शास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने “कृषि तंत्रज्ञान व विकास कार्यक्रमाच्या परिणाम मूल्यांकन: एक दृष्टिकोन” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन १८ जुलै २०२५ रोजी करण्यात आले. ही कार्यशाळा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमधील सिंपोजियम हॉल येथे संपन्न झाली.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते तर नवी दिल्ली येथील आयएफपीआरआयचे (IFPRI) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अंजनी कुमार हे मुख्य अतिथी व प्रमुख वक्ते तसेच सीआयएफइचे अधिष्ठाता डॉ. स्वदेश तिवारी प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम  आणि डॉ. सचिन मोरे आदींची उपस्थिती होती.

या वेळी अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि तंत्रज्ञान व विकास कार्यक्रमाच्या परिणाम मूल्यांकनामुळे केवळ कार्यक्रमाचे यशच मोजले जात नाही, तर भविष्यातील सुधारणा, धोरणनिर्मिती व शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी ते एक अमूल्य साधन ठरते असे सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी शास्त्रज्ञानी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे. तसेच  शेतकऱ्यांसोबत सामंजस्य करार करून ज्ञानाचे परस्पर आदान-प्रदान होणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी भोसी (ता. भोकर) येथील शेतकरी श्री. नंदकिशोर गायकवाड यांच्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली आणि नमूद केले की अनेक शेतकरी उत्कृष्ट कार्य करत असून, त्यांचे कार्य राष्ट्रीय पातळीवर गाजत आहे. माननीय कुलगुरूंनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांनी उद्योगशील राहणे आवश्यक आहे. केवळ इच्छा असून उपयोग नाही, प्रत्यक्ष कृती आणि नवकल्पनांतूनच यश मिळते. विद्यापीठ सध्या मर्यादित मनुष्यबळाचा कार्यक्षमतेने वापर करून उच्च दर्जाचे काम करत आहे. विद्यापीठाकडे विपुल प्रमाणात जमीन, पाणी यासारखी साधनसंपत्ती उपलब्ध आहे आणि तिचा योग्य वापर केला जात आहे. शेतकऱ्यांना मिळणारा नफा, उत्पादन खर्च, जमा-खर्च, मानसिक व सामाजिक बदल यांचे प्रात्यक्षिक मूल्यांकन करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तंत्रज्ञानाच्या प्रभावाचे विश्लेषण करता येईल. हे कार्य शास्त्रीय पद्धतीने, विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून केले पाहिजे. त्यासाठी कृषि विस्तार शिक्षण व कृषि अर्थशास्त्र या सामाजिक शास्त्रातील विभागांतून उच्च दर्जाचे विश्लेषणात्मक तंत्रज्ञान व पद्धती (tools) विकसित करणे गरजेचे आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन प्रकल्प उभारण्याचे त्यांनी सुचविले. जर तंत्रज्ञान किंवा यांत्रिकीकरणातून अर्थकारण वगळले तर त्याचे मूल्य शून्य ठरते; त्यामुळे प्रत्येक तंत्रज्ञानाचा आर्थिक लाभ किती झाला, हे जाणून घेणे अनिवार्य आहे. सध्या हवामानातील बदलांमुळे शेती व्यवसाय अधिक धोकादायक बनला आहे. तरीही विद्यापीठाने विकसित केलेला 'गोदावरी' तुर वाण शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न देत आहे, हे देखील अचूक व शास्त्रीय मूल्यांकनातूनच समोर आले आहे.

कृषि तंत्रज्ञान व विकास कार्यक्रमाच्या परिणाम मूल्यांकन या बाबत वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अंजनी कुमार यांनी मुख्य मार्गदर्शन करताना मूल्यांकन प्रश्नांचे प्रकार, परिणाम मूल्यांकन का करावे? निरीक्षण, मूल्यमापन व परिणाम मूल्यांकन यामधील फरक, मूल्यांकन दृष्टिकोन, परिणाम मूल्यांकन केव्हा करावे?, परिणाम मूल्यांकनाचे दृष्टिकोन, सामान्य परिमाणात्मक पद्धती, परिणाम मूल्यांकनाचा रोड मॅप याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, परिणाम मूल्यांकनासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन, आकडेवारी आधारित विश्लेषण आणि स्थळभेटी या त्रिसूत्रीचा वापर केल्यास अधिक प्रभावी निष्कर्ष प्राप्त करता येतात.

कार्यशाळेत शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार,  सीआयएफइचे अधिष्ठाता डॉ. स्वदेश तिवारी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम यांनी कृषि विस्तार शिक्षण आणि डॉ. सचिन मोरे यांनी कृषि अर्थशास्त्र विभागात परिणाम मूल्यांकनाचे महत्व विशद केले. तसेच त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन उत्कृष्टरीत्या केले.

कार्यशाळेत कृषि विद्यापीठाचे सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विविध विभागप्रमुख, संशोधक, शास्त्रज्ञ व विद्यार्थी असे २०० हून अधिक संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. सूत्रसंचालन डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. धीरज पाथ्रीकर यांनी मानले.








Thursday, July 17, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची नांदेड येथील कृषि महाविद्यालयास भेट; विद्यार्थ्यांशी संवाद व बांधकाम प्रगतीचा आढावा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या नांदेड येथील शासकीय कृषि  महाविद्यालय येथे सुरू असलेल्या विविध बांधकाम प्रकल्पांचा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १६ जुलै रोजी प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी कामाची पाहणी केली तसेच संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना आवश्यक सूचना दिल्या.

या पाहणीवेळी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य श्री. भागवतराव देवसरकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, उप विद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, विभाग प्रमुख व नोडल अधिकारी डॉ. राजेश कदम, डॉ. नरेशकुमार जायेवार तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

माननीय कुलगुरू महोदयांनी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांबाबत समाधान व्यक्त केले असून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदारास दिल्या. यानंतर, माननीय  कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनही केले. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी ही भेट अत्यंत फलदायी ठरली असल्याचे डॉ. राजेश कदम यांनी नमूद केले.




‘शेतकरी देवो भव:’चा संदेश देत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन

भोसी (ता. भोकर) येथील सृष्टी फळ रोपवाटिकेत भव्य फळझाड लागवड कार्यक्रम संपन्न


शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जर शेतकरी नसेल, तर कृषि विद्यापीठाचंही अस्तित्व अर्थहीन ठरेल. अन्नदाता शेतकरी विविध अन्नधान्य पिकवून संपूर्ण समाजाला अन्न पुरवतो. म्हणूनच ‘शेतकरी देवो भव:’असे म्हणावे लागेल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते भोसी (ता. भोकर) येथील शेतकरी श्री. नंदकिशोर गायकवाड यांच्या सृष्टी फळ रोपवाटिका येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात अध्यक्षस्थानी बोलत होते.

हा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून काळ्या मातीशी निष्ठा राखत ही धरती सदैव हिरवीगार राहावी, या हेतूने पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम भोसी (ता. भोकर, जि. नांदेड) येथील सृष्टी फळ रोपवाटिका  येथे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत १६ जुलै २०२५ रोजी घेण्यात आला. यावेळी भव्य फळझाड लागवड कार्यक्रम देखील करण्यात आला.

यावेळी जिल्हा कृषि अधीक्षक श्री. दत्तकुमार कळसाईत, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. राजकुमार रणवीर, उपविभागीय अधिकारी श्री. विठ्ठल गित्ते, तसेच प्रगतिशील शेतकरी श्री. रत्नाकर पाटील सायाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात पुढे बोलताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात केवळ ५ मिलियन टन अन्नधान्य उत्पादन होत होते. आज शेतकऱ्यांच्या अथक कष्टामुळे आपण ३५० मिलियन टन अन्नधान्य उत्पादनाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आता आपला देश संपूर्ण जगाला अन्न पुरवठा करण्यास सक्षम आहे.

कार्यक्रमानंतर माननीय कुलगुरूंनी शिवार फेरी करून नंदकिशोर गायकवाड यांच्या फळबागेतील अंतरपीक व्यवस्थापनाची पाहणी केली. तसेच वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक शेतीचा संदेश दिला. यावेळी नंदकिशोर गायकवाड यांनी या वर्षी शेतात ५,००० वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केल्याची माहिती दिली.

माननीय कुलगुरूंच्या भेटीनंतर गावात तब्बल एक तास जोरदार पाऊस झाला, यामुळे संपूर्ण गावकरी अत्यंत आनंदित झाले. या मार्गदर्शन कार्यक्रमास परिसरातील १०० हून अधिक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.












Wednesday, July 16, 2025

पावसाच्या खंड काळात खरीप पिके वाचविण्यासाठी घ्यावयाची काळजी

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली वनामकृविच्या शास्त्रज्ञांकडून उपाययोजना बाबत सल्ला


जून महिन्यात मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये खरीप पिकांची पेरणी करण्यात आली असून, यात मुख्यत्वे सोयाबीन, कापूस, तुर, मूग, उडीद व ज्वारी यांचा समावेश आहे. तथापि, पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रासह काही भागांमध्ये पावसाचा खंड १५ दिवसांपेक्षा अधिक काळ झाला आहे. त्यामुळे उगवणी झाल्यानंतर खरीप पिकांवर तीव्र पाण्याचा ताण निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्रावर नुकतीच उगवणी झालेल्या सोयाबीन पिकांचे दीर्घ पावसाळी खंडामुळे होणाऱ्या ताणापासून संरक्षण करण्यासाठी, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोनद्वारे पाण्याची फवारणी करण्यात आली.

यावेळी माननीय कुलगुरू महोदयांनी विद्यापीठातील सर्व प्रक्षेत्र प्रमुखांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी तात्काळ बचावात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या उपाययोजनांमध्ये ड्रोन, बूम स्प्रेयर व नॅपसॅक स्प्रेयरद्वारे पाण्याची फवारणी करणे, तसेच ३० ते ३५ दिवसांच्या दरम्यान १.०% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करणे यांचा समावेश आहे. तसेच, जमिनीत तडे पडू नयेत आणि जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन टाळता यावे यासाठी वारंवार कोळपणी करावी, असेही त्यांनी सुचविले आहे.

या उपाययोजना शेतकरी बांधवांनी देखील अमलात आणाव्यात, असे आवाहन माननीय कुलगुरूंनी केले आहे. 'शेतकरी देवो भव:' या भावनेतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळावे यासाठी त्यांनी मराठवाड्यात समाधानकारक पावसासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना केली आहे.

यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता  डॉ. राहुल रामटेके, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, नाहेपचे डॉ. गोपाल शिंदे, उपविद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे आणि इतर शास्त्रज्ञ उपस्थित होते.

शास्त्रज्ञांनी सुचविल्या विविध उपाययोजना

याबरोबरच माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे सिंचन पाणी व्यवस्थापन योजनेचे शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. मदन पेंडके यांनी खरीप पिके वाचविण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना सुचविल्या आहेत.

१.     उभ्या पिकांत हलकी कोळपणी करावी.

कोळप्याच्या सहाय्याने हलकी कोळपणी केल्यास जमिनीत भेगा पडणार नाही, तसेच जमिनीत असलेला ओलावा टिकुन राहिल.

२.     आच्छादनाचा वापर

दोन पिकाच्या ओळीत उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करुन आच्छादन करावे जसे मागील वर्षाचा सोयाबीन किंवा तुरीचा भुसा किंवा निदंणी झाल्यानंतरचे वाळलेले गवत यांचे आच्छादन करावे जेणे करुन जमिनीत ओलावा टिकुन राहील.

३.     पिकावर पोटॅशियम नायट्रेटची फवारणी

सोयाबीन, कापुस यासारख्या पिकांवर पोटॅशियम नायट्रेटची (Potassium Nitriate - KNO3 ) १ टक्का द्रावणाची  फवारणी करावी (१०० लिटर पाण्यामध्ये १ ग्रॅम) जेणेकरुन पिकांमधुन होणारे बाष्पोउत्सर्जन कमी होईल व पिके वाचविणे शक्य होईल.

४.     तुषार सिंचन पध्दतीचा वापर

ज्या शेतकरी बांधवांकडे पाण्याची सोय आहे जसे कुपनलिका, विहीरी किंवा  शेततळयात पाणी उपलब्ध असल्यास तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करुन 5 से.मी. खेालीचे सिंचन द्यावे म्हणजेच जमिनीचे प्रकारानुसार एका वेळेस ३ ते ४ तास तुषार संच एका जागेवर चालवावा. जेणे करुन पिकांना आवश्यक तेवढे पाणी पिक वाढीच्या काळात देता येईल.

५.     पाण्याचा फवारा करणे

ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर सोबत बुम स्पेअर पंप आहे अशा शेतकऱ्यांनी पाण्याचा फवारा पिकांवर खंड काळात चार दिवसाच्या अंतराने दयावा जेणे करुन उभी पिके वाचविता येईल.

६.     भविष्य काळात उभ्या पिकात सऱ्या काढणे

भविष्य काळात पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचे संधारण करण्यासाठी सोयाबीन पिकात पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी बळीराम नांगराच्या साहाय्याने किंवा रिजरने सोयाबीन पीकात प्रत्येक 4 ओळीनंतर तसेच कापुस पिकात प्रत्येक 2 ओळीनंतर सऱ्या काढाव्यात. जेणेकरुन या स­यांमध्ये पावसाचे पाणी मुरुन ओलावा दिर्घकाळ टिकेल.

७.     रेनगन सिंचन पध्दत

ज्या शेतकऱ्यांकडे  रेनगन सिंचन पध्दत किंवा रेन पाईप आहेत अश्या शेतकरी बांधवांनी त्याचा वापर करावा. साधारणपणे 3-4 तास पाण्याचा फवारा एका ठिकाणी जमिनीच्या प्रकारानुसार ठेवल्यास पिके वाचविणे शक्य होईल व पिकाची वाढ सुध्दा थांबणार नाही.

८.     कालव्याव्दारे सिंचन

ज्या क्षेत्रात पाटबंधारे विभागाचे कालव्याचे जाळे आहे अश्या क्षेत्रात पाण्याची उपलब्धता  असल्यास विविध सिंचन पध्दतीचा वापर करुन पिकास पाणी द्यावे.

९.     शेततळयात पाण्याची साठवणुक

कालव्याव्दारे पाणी उपलब्ध झाल्यास पाटबंधारे विभागाची मान्यता घेऊन शेततळयात पाण्याची साठवणुक करावी. तसेच नदीनाला किंवा ओढा यांचे वाहुन जाणारे पाणी जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा त्या पाण्याची शेततळयात साठवणुक करावी व गरजेनुरुप पिकासाठी सिंचन करावे.

या उपाययोजना सुचविल्या