Wednesday, July 30, 2025

सेंद्रीय शेतीद्वारे जमिनीचे आरोग्य संवर्धन : वनामकृविद्वारा 'शेतकरी देवो भव:' उपक्रमांतर्गत ऑनलाईन संवाद सत्र संपन्न

सेंद्रीय शेतीला चालना देणाऱ्या उपक्रमांवर विद्यापीठाचा भर – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'शेतकरी देवो भव:' या उपक्रमांतर्गत 'सेंद्रीय शेतीद्वारे जमिनीचे आरोग्य संवर्धन' या विषयावर एक विशेष ऑनलाईन कार्यक्रम दिनांक २९ जुलै रोजी आयोजित करण्यात आला."

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे मा. कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. प्रमुख उपस्थिती संशोधन संचालक डॉ. खिजर बेग,  विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांची होती. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी सौ. उज्ज्वला व श्री. बाबासाहेब रनेर (बाभळगाव, ता. पाथरी, जि. परभणी) यांनी आपल्या सेंद्रीय शेतीतील अनुभव व यशोगाथा मांडल्या.

कार्यक्रमात  मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनाचे विशेष कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, राज्यातील शेती व्यवसायात महिलांचा मोठा सहभाग असून, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार महिला शेतकऱ्यांनी प्राप्त केले आहेत.

यावेळी बोलताना त्यांनी बाभळगाव (ता. पाथरी) येथील प्रगतशील रनेर दाम्पत्याचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी सेंद्रीय शेतीतून उल्लेखनीय कामगिरी केली असून, हे दाम्पत्य राज्यातील महिलांच्या यशस्वी वाटचालीचे प्रतीक आहे, असे माननीय कुलगुरूंनी नमूद केले.

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिलांसह सर्व शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीच्या दिशेने प्रवृत्त करणे हा असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, नुकत्याच पार पडलेल्या कुलगुरूंच्या बैठकीत विद्यापीठात नैसर्गिक व सेंद्रीय शेतीसंदर्भातील पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. देशातील इतर संस्थांप्रमाणेच येथेही हे अभ्यासक्रम सुरू व्हावेत, यासाठी विद्यापीठ पावले उचलत आहे. या दृष्टीने सेंद्रीय शेतीचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांना अभ्यासक्रमाची रूपरेषा निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शेतकरी देवो भव:” या उपक्रमांतर्गत विद्यापीठाने आजवर सेंद्रीय शेतीविषयी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व शेतकरी संवाद सत्र आयोजित केली आहेत. अशा संवादातून अनेक नवकल्पना व शेतकऱ्यांचे अनुभव समोर येतात, जे संशोधनासाठी उपयुक्त ठरतात, असे माननीय कुलगुरूंनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमांमधून शेतकऱ्यांना किती प्रत्यक्ष लाभ झाला याचा अभ्यास करणे आवश्यक असून, त्यावर आधारित माहिती प्रकाशित करावी. ही माहिती जनसामान्यांसाठी उपयुक्त ठरेल आणि सेंद्रीय शेती सर्वांसाठी सुलभ होईल. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे आहे. प्रयत्नांना वेळ लागू शकतो, पण त्यात सातत्य आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे यांनी प्रगतशील शेतकरी रनेर दाम्पत्याचे विशेष मुलाखत घेतली. यावेळी रनेर दाम्पत्यानी सांगितले की, सेंद्रीय शेतीतून रासायनिक खते, कीटकनाशके टाळून शेणखत, कंपोस्ट, जीवामृत, दशपर्णी अर्क यांचा वापर केल्याने जमिनीतील सूक्ष्मजीव आणि पोषकतत्त्वांचे प्रमाण वाढते. पीक फेरपालट आणि आंतरपीक वापरून जमिनीवर आलेला ताण टाळता येतो व तिचे जैविक संतुलन टिकवता येते. सेंद्रीय पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य विषमुक्त व आरोग्यवर्धक असते. ही पद्धत पर्यावरणपूरक असून नद्यांतील व भूजलातील प्रदूषणही कमी करते. तसेच सेंद्रीय साधन सामुग्री शेतातच तयार केल्याने खर्च कमी होतो. सेंद्रीय उत्पादने ही प्रमाणपत्र मिळाल्यास चांगल्या दरात विकली जातात. सेंद्रीय शेतीद्वारे नुसतेच उत्पादन वाढवले जात नाही तर राष्ट्रीय स्तरावर सन्मान देखील प्राप्त होतो. असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी या कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीबाबत विचारलेल्या प्रश्नांचे समाधान केले. कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह सोलापूर, बुलढाणा, येथून ७० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून संवादात सक्रिय सहभाग घेतला.




Tuesday, July 29, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने “विद्यापीठ आपल्या दारी – तंत्रज्ञान शेतावरती” उपक्रमाचे आयोजन

 कार्यकारी परिषदेचे माननीय सदस्य श्री. भागवत देवसरकर यांचा पुढाकार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाद्वारे माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली ‘शेतकरी देवो भवः’ या भावनेतून कृषि विस्ताराचे कार्य अविरत सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. श्री. भागवत देवसरकर यांच्या पुढाकारातून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली “विद्यापीठ आपल्या दारी – तंत्रज्ञान शेतावरती” हा विशेष उपक्रम नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात राबविण्यात येत आहे.

दिनांक ०१ व ०२ ऑगस्ट २०२५ रोजी हदगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये तण, कीड व रोग व्यवस्थापन याविषयक थेट शेतशिवार प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे कीड व रोग नियंत्रणाच्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असून, त्याद्वारे त्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे.

कपाशी, हरभरा, सोयाबीन, तूर व ऊस या पिकांवरील वाढत्या कीड व रोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाच्या विविध विभागांतील तज्ज्ञ व शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एकूण पीक व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण याविषयी सखोल मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमात विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल रामटेके, केळी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. शिवाजीराव शिंदे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. भेदे, कृषि विस्तार विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. माणिक कल्याणकर आणि तालुका कृषि अधिकारी श्री. सदाशिव पाटील हे मान्यवर सहभागी होणार आहेत.

तज्ज्ञ अधिकारी व शास्त्रज्ञ हळद, कापूस, सोयाबीन, तूर व ऊस या पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनासोबतच संपूर्ण पीक व्यवस्थापनावरही मार्गदर्शन करणार आहेत.

दिनांक ०१ ऑगस्ट रोजी वडगाव बुद्रुक, कोळगाव, कंजारा, शिवणी, वाळकी बाजार, धानोरा टाकळा आणि वाळकी बुद्रुक मोठी या गावांना भेटी दिल्या जाणार आहेत. तर ०२ ऑगस्ट रोजी उमरी जहागीर, वायफना बुद्रुक, येवली, पिंपळगाव, राजवाडी, गवतवाडी/तळ्याचीवाडी, घोगरी, चिकाळा आणि ब्रम्हवाडी या गावांमध्ये थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत.

शेतकरी बांधवांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन तज्ज्ञ शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांकडून आपल्या पिकांवरील कीड, रोग व उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन कार्यकारी परिषद सदस्य मा. श्री. भागवत देवसरकर आणि विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Monday, July 28, 2025

ताबडतोब करा कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन.....!

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ञांचा सल्‍ला  

मराठवाडा विभागात मोठ्या खंडानंतर झालेल्या पावसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात. कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण  पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशावेळी सिंचन दिल्यास अथवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर 36-48 तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते.  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे तज्ञ डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत व श्री.एम.बी.मांडगे यांनी पुढील प्रमाणे आकस्मिक मर व्यवस्थापन करण्‍याचा सल्‍ला दिला आहे.

आकस्मिक मर व्यवस्थापन :

शेतातील अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी.

लवकरात लवकर 200 ग्रॅम युरिया अधिक 100 ग्रॅम पांढरा पोटॅश (00:00:50 खत) अधिक 25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली याप्रमाणे आळवणी करावी.

किंवा

एक किलो 13:00:45 अधिक 2 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड अधिक 250 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड 200 लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली आळवणी करावी.

वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी. वरील सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे 24 ते 48 तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.


वनामकृवि संदेश क्रमांक- 02/2025( 27 जुलै 2025)

अधिक माहितीसाठी संपर्क करा : कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

दुरध्‍वनी क्रमांक 02452-229000, व्हाटस्अप हेल्पलाईन- 8329432097

Sunday, July 27, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे ॲग्रीव्हीजन २०२५ राष्ट्रीय अधिवेशनात मुख्य मार्गदर्शन : लघु भूधारक शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरणाच्या नवकल्पनांचा वापरास प्रोत्साहन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ९ व्या ॲग्रीव्हीजन २०२५ (AGRIVISION-2025) राष्ट्रीय अधिवेशनात लघु भूधारक शेतकऱ्यांसाठी शेतकी यंत्रसामग्रीतील प्रगती” या विषयावर दिनांक २६ जुलै रोजी विचारप्रवर्तक व्याख्यान दिले. हे अधिवेशन भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR) आणि विद्यार्थी कल्याण न्यास, भोपाळ यांच्या संयुक्त विद्यमाने २५-२६ जुलै २०२५ रोजी नवी दिल्ली येथील भारतरत्न सी. सुब्रमणियम सभागृह, नॅशनल ॲग्रिकल्चर सायन्स कॉम्प्लेक्स (NASC) येथे पार पडले.

सशक्त युवा – समृद्ध शेती : कौशल्य, नवोन्मेष आणि उद्योजकताया संकल्पनेवर आधारित या दोन दिवसीय अधिवेशनात देशभरातील कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञ, अभ्यासक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या व्याख्यानात लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विभागनिहाय यांत्रिकीकरणाची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी उर्जासक्षम अवजारे, डिजिटल नवकल्पना आणि हवामानसहकाऱ्यांनुसार यंत्रसंगणक आधारित उपाययोजना या क्षेत्रातील महत्त्वाच्या गरजा स्पष्ट केल्या.

शाश्वत आणि परिवर्तनशील तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण जीवनमान उंचावण्याची आणि शेतीला युवक केंद्रित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या पार्श्वभूमीवर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या यांत्रिकीकरणाच्या उपाययोजना आणि प्रशिक्षण-आधारित उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.

तसेच, केंद्र शासनाच्या धोरणानुसार यंत्रवापराचे मापदंड आणि मानके ठरविण्यासाठी शास्त्रज्ञांचा सहभाग असावा, यानुसार त्यांनी ड्रोन वापराच्या मापदंड ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा आणि भविष्यातील शक्यता यांचा व्यापक आढावा घेता आला. कार्यक्रमास विविध कृषि विद्यापीठांतील कुलगुरू, संशोधक, विद्यार्थी आणि कृषि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Saturday, July 26, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यांची नवी दिल्ली व गुरुग्राम येथे अभ्यासभेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या कार्यकारी परिषद सदस्यांसाठी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण घेण्यासाठी दिनांक २२ व २३ जुलै २०२५ रोजी भारतीय कृषि संशोधन संस्था (IARI), नवी दिल्ली तसेच ड्रोन उत्पादक आयोटेक वर्ल्ड (गुरुग्राम, हरियाणा) येथे अभ्यासभेट आयोजित करण्यात आली. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली ही अभ्यासभेट संपन्न झाली.

या अभ्यासदौऱ्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य मा.आ. अॅड. श्री. सतीश चव्हाण, मा. श्री. दिलीप देशमुख, मा. श्री. भागवत देवसरकर, मा. श्री. सूरज जगताप, संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार आणि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके सहभागी झाले होते.

भारतीय कृषि संशोधन संस्थेच्या प्रा. एम. एस. स्वामीनाथन ग्रंथालय सभागृहात संशोधन सहसंचालक डॉ. सी. विश्वनाथन यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून संस्थेच्या संशोधन कार्याची माहिती दिली. यानंतर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठातील चालू योजनांची व प्रकल्पांची सविस्तर माहिती सादर केली.

भेटीदरम्यान कृषि अभियांत्रिकी विभागातील डॉ. पी. के. साहू यांनी रोबोटिक्स आधारित आधुनिक यंत्रणा – फवारणी यंत्र व भात लागवड यंत्र यांची माहिती दिली. डॉ. डी. के. सिंह यांनी एग्री फोटोवोल्टाइक सेंटर ऑफ एक्सलन्स संदर्भात माहिती सादर केली, तर डॉ. पी. एस. ब्रह्मानंद यांनी संरक्षित शेतीतील वर्टिकल फार्मिंग, हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स व पोषक तत्त्व व्यवस्थापनावर सविस्तर मार्गदर्शन केले.

ड्रोन टेक्नोलॉजी सेंटरमध्ये डॉ. आर. एन. साहू व डॉ. एन. सुभाष पिल्लई यांनी विविध प्रकारच्या ड्रोन आणि त्यांच्या कृषि उपयोगांविषयी माहिती दिली. यावेळी मा. आ. अॅड. श्री. सतीश चव्हाण यांनी संशोधकांशी सखोल संवाद साधला.

दुसऱ्या दिवशी हरियाणामधील गुरुग्राम येथील आयोटेक वर्ल्ड या नामवंत ड्रोन उत्पादक कंपनीला भेट देण्यात आली. यावेळी ड्रोनच्या डिझाईनपासून उत्पादन प्रक्रिया व त्यांच्या विविध कृषि उपयोगांचा अभ्यास करण्यात आला. या वेळी माननीय कुलगुरूंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर माननीय श्री. भागवत देवसरकर यांनी कंपनी प्रतिनिधींशी चर्चा केली.

ही अभ्यासभेट कार्यकारी सदस्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली असून, विद्यापीठात नव्या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी प्रेरणादायी ठरली आहे.





Friday, July 25, 2025

‘शेतकरी देवो भवः’ या तत्त्वाशी बांधिल राहून – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण

विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या कार्यकाळातील तीन वर्षे आज दिनांक २५ जुलै रोजी पूर्ण केली. “शेतकरी देवो भव:” या तत्त्वाशी बांधिल राहून त्यांनी शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थी-केंद्रीत शिक्षणासाठी, नाविन्यपूर्ण संशोधनासाठी तसेच कर्मचारी-केंद्रित प्रशासनाच्या कार्यपद्धतीद्वारे विद्यापीठाचा सर्वांगीण विकास घडवून आणला. या निमित्ताने विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी विद्यार्थी कल्याण कार्यालयाच्या वतीने एक विशेष बैठक कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे स्वतः होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांची उपस्थिती होती.

यावेळी विद्यापीठाच्या सर्व संचालनालये, महाविद्यालये आणि संशोधन केंद्रांच्या वतीने माननीय कुलगुरू यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, सर्व अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना, हे माझ्या कर्तव्याचेच प्रतिबिंब आहे. यावेळी त्यांनी 'कुलगुरू' या पदाच्या भूमिकेचे मार्मिक स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे आठ जिल्ह्यांमध्ये विस्तारलेले आहे. या संपूर्ण यंत्रणेचा कारभार म्हणजेच ‘कूल’ आहे आणि त्यास योग्य पद्धतीने चालवण्याचे कार्य ‘गुरू’चे आहे. म्हणूनच 'कुलगुरू' ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

ते पुढे म्हणाले की, जीवनात जबाबदारी ही खूप महत्त्वाची असते. माझ्या वडिलांनी नेहमीच जबाबदारीचे भान शिकवले. प्रत्येकाने आपला स्वभाव चांगला बनवावा. कार्य करत असताना लोक आपल्यावर प्रेम करतात, पण आपण त्या पदावरून गेल्यानंतर लोकांनी अधिक प्रेम करावे, असे व्यक्तिमत्त्व आपण घडवले पाहिजे. त्यासाठी पदाच्या जबाबदाऱ्या समजून घेत प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. ते म्हणाले, संकटे येत राहणारच, पण त्यावर मात करत आपली दिशा योग्य ठेवावी. संधी आल्यावर ती ओळखून तिचे सोनं करावे. आपण ध्येयवेडे होऊन काम केले पाहिजे. याच कार्यपद्धतीची फलश्रुती म्हणजे विद्यापीठाला भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीद्वारा प्रतिष्ठेचे ‘ए ग्रेड’ मानांकनासह अधिस्‍वीकृती तसेच राष्ट्रीय पातळीवर रु ६५ कोटींच्या संशोधन प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे. याशिवायही अनेक प्रकल्प व उपक्रम विद्यापीठात राबवले जात असून, त्यातून सातत्याने यश मिळत आहे. विद्यापीठातील यश हे सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे. त्यामुळेच विद्यापीठाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

परभणीत कार्य करत असताना मला येथे अपार प्रेम आणि आपुलकी मिळाली, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे, असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. त्यांना शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी कार्य करण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेतील चार भिंतींच्या आतल्या नोकरीच्या अनेक संधी नाकारल्या. शेतकरी देवो भव:’ या भावनेने प्रेरित होऊन विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासनाच्या माध्यमातून कार्यरत आहे. या कार्यपद्धतीला अजून उंच पातळीवर नेण्याची माझी तीव्र इच्छा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व माननीय राजकीय नेत्यांचे, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच विद्यापीठातील सर्व संचालक व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

आपल्याला सर्वसाधारण व्यक्तींपासून विशेष बनवण्याचे कार्य विद्यापीठ करते. त्यामुळे विद्यापीठाला योग्य स्थान व महत्त्व दिले पाहिजे, असे ते म्हणाले. शेवटी त्यांनी सर्वांना आवाहन केले की, आपण एकमेकांबद्दल सहकार्याची आणि आपुलकीची भावना ठेवावी, द्वेष आणि मत्सर बाजूला ठेवावा, नैतिक मूल्ये जपावीत आणि आपले व्यक्तिमत्त्व उत्तम बनवावे.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वगुणांचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे अनेक अधिकारी उत्तम नेतृत्वक्षम व्यक्ती म्हणून घडले असून विद्यापीठाची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे. ॲग्रीटेलसारख्या संस्थेच्या रँकिंगमध्ये विद्यापीठ देशात पहिल्या दहामध्ये तर इतर अनेक रँकिंगमध्ये पहिल्या ३० क्रमांकात स्थान मिळवले आहे.

डॉ. आसेवार यांनी पुढे सांगितले की, भविष्यात माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वात विद्यापीठात मोठे प्रकल्प उभारण्यात येऊन विद्यापीठ देशातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये स्थान मिळवेल, असा आत्मविश्वास व्यक्त करण्यात येतो.

माननीय कुलगुरूंच्या कार्यकाळात विद्यापीठाने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. ते नेहमीच सर्वांसाठी वेळ देवून प्रोत्साहन व प्रेरणा देतात. जरी त्यांचा कार्यकाळ दीड वर्षांचा राहिला असला, तरी त्यांच्या प्रभावी नेतृत्वात अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस परिश्रम घेत असून तीन वर्षांचे कार्य पूर्ण होईल, अशी ठाम आशा व्यक्त करण्यात आली.

कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांनी सांगितले की, प्रशासकीय कार्यामध्ये माननीय कुलगुरू यांचे अनमोल मार्गदर्शन मिळत असून, त्यांच्या कार्यकाळात अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना लाभ देणारी अनेक महत्त्वपूर्ण कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी नमूद केले की, माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वाने रु. ६५ कोटींच्या संशोधन प्रकल्पांना मंजुरी मिळवून दिली असून, विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना मान्यता मिळाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय, त्यांनी २५०० एकर जमीन वहीतीखाली आणण्यात यश मिळवले असून, बीज उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून अनेक प्रकल्प या विद्यापीठाला प्राधान्याने मंजूर होत आहेत.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी नमूद की, माननीय कुलगुरूंनी सर्वांच्या मानसिकतेत सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. डॉ. प्रवीण वैद्य यांनी आदरणीय कुलगुरू कामाला प्राधान्य देतात व यशाची अपेक्षा न करता ते ईश्वरावर सोडतात, असे सांगितले.

विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी नमूद केले की, माननीय कुलगुरूंनी पदभार स्वीकारल्यापासून विद्यापीठाचा चेहरा-मोहरा बदललेला आहे. त्यांनी आजपर्यंतच्या सुमारे एक हजार दिवसांच्या कार्यकाळात ५०० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक ज्येष्ठ नेते आणि वरिष्ठ अधिकारी विद्यापीठाला भेट देण्यासाठी आले. विद्यापीठातील आम्ही काही प्रमाणात त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो, याचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यात आम्ही शंभर टक्के समर्पण भावनेने कार्य करत त्यांचे स्वप्न साकार करण्याचे आश्वासन देतो. सर्व अधिकार्‍यांना प्रोत्साहित करून त्यांच्याकडून पूर्ण क्षमतेने कार्य करून घेणे हे त्यांच्याकडे असलेले नेतृत्वकौशल्यच आहे.

विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे, शास्त्रज्ञ डॉ. गोपाळ शिंदे डॉ. गोदावरी पवार आणि डॉ. अनंत लाड, यांनीही आदरणीय कुलगुरूंच्या कार्याची आदरपूर्वक माहिती दिली.

विद्यार्थिनी उन्नती चव्हाण यांनी मनोगतात सांगितले की, माननीय कुलगुरू सर्वच कार्यक्रमात सक्रीय सहभागी होतात. त्यांच्याकडून आम्हाला नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळते आणि सतत प्रोत्साहन मिळते. त्यांच्याशी संपर्क करताना कधीही दडपण जाणवत नाही. तर दुसऱ्या एका विद्यार्थ्याने माननीय कुलगुरूंचा ठाम निर्धार, साधेपणा आणि हसतमुख, प्रभावी नेतृत्व हे एक आदर्श असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ. रणजीत चव्हाण यांनी मानले. या संवाद सत्राला विद्यापीठातील सर्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ अधिकारीकर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.










वनामकृविचे माननीय कुलगुरू म्‍हणुन डॉ इन्‍द्र मणि यांना तीन वर्ष पुर्ण

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वात विद्यापीठाचे उल्‍लेखनीय कार्य : 

तीन वर्षांची यशस्वी कारकीर्द - नेतृत्व, नवोन्मेष आणि प्रगती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू म्‍हणुन मा डॉ इन्‍द्र मणि यांनी २५ जुलै २०२३ रोजी पदाची सुत्रे स्‍वीकारलीयास तीन वर्ष पुर्ण होत आहेत. देश व राज्‍याच्‍या विकासातील शेती व शेतकरी हेच आधारस्‍तंभ असुन विद्यापीठाने ‘शेतकरी देवो भव:’ भावनेने कार्य करण्‍याचा संकल्‍प त्‍यांनी आपल्‍या पहिल्‍याच भाषणात व्‍यक्‍त केला. कृषि संशोधन व शिक्षण क्षेत्रात देशातील अग्रगण्‍य संस्था नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन संस्‍थेत त्‍यांनी ३० वर्षापेक्षा जास्‍त काळ सेवा केली. राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील गाढा अनुभव त्‍यांना आहे. परभणी विद्यापीठासमोर अनेक समस्‍या समोर असतांना उपलब्‍ध मनुष्‍यबळ आणि साधनसामुग्रीचा कार्यक्षम वापर कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वाखाली कृषि शिक्षणसंशोधन आणि विस्‍तार शिक्षण या तिन्‍ही क्षेत्रात विद्यापीठाची घोडदौड सुरू आहे. गेल्‍या तीन वर्षातील महत्‍वपुर्ण बाबींचा थोडक्‍यात आढावा.

विद्यापीठास ‘ए ग्रेड’ मानांकनासह आयसीएआर द्वारा पाच वर्षांसाठी अधिस्वीकृती :

विद्यापीठास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीद्वारा प्रतिष्ठेचे ‘ए ग्रेड’ मानांकनासह अधिस्‍वीकृती प्राप्त झाली. विद्यापीठास १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२८ या कालावधीसाठी अधिस्वीकृती प्रदान करण्यात आली असून या मूल्यांकनात विद्यापीठास उच्चांकी ‘३.२१’ गुण प्राप्त झाले. ही अधिस्वीकृती विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनातील सातत्य व विस्तार सेवांतील कार्यक्षमतेची अधिकृत पावती आहे. माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व प्रभावी मार्गदर्शनामुळे हे श्रेणी मानांकनासह अधिस्‍वीकृती प्राप्त झाली. या अधिस्वीकृतीमुळे विद्यापीठाची शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठा अधिक उंचावली असून, मराठवाड्यातील कृषी शिक्षणाला नवसंजीवनी लाभली आहे. ही अधिस्वीकृती विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक विश्वासार्हतेला बळकटी देणारी असूनविद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण कृषि शिक्षणाच्या नव्या संधी खुल्या करणारी ठरणार आहे. तसेच विद्यापीठानी भारतीय शैक्षणिक संस्था मूल्यांकन प्रणाली (आयआयआरएफ – IIRF) २०२५ च्या कृषी व उद्यानविद्या विद्यापीठांच्या गटात राष्ट्रीय स्तरावर ३३ वा आणि राज्यात दुसरा क्रमांक मिळवून एक मानाचा ठसा उमटवला आहे.

राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अमंलबजावणी : राज्‍यातील कृषि विद्यापीठ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राबविण्‍यास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्‍ये सुरूवात झाली असुन सदर धोरण कृषि विद्यापीठात प्रभावीपणे राबविण्‍याकरिता माननीय कुलगुरू यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध पातळीवर कार्य चालु आहे.

विद्यापीठ बीजोत्‍पादन वाढ  : विविध पिकांच्‍या विद्यापीठ विकसित वाणाच्‍या दर्जेदार बियाणास शेतकरी बांधवामध्‍ये मोठी मागणी आहेयात सोयाबीनतुरज्‍वारी आदीच्‍या वाणास शेतकरी बांधवाची विशेष पसंती लक्षात घेता बीजोत्‍पादन वाढ करणे आवश्‍यक होते. विद्यापीठातील मध्‍यवर्ती प्रक्षेत्र विभागाकडे स्‍थापनेपासुन मोठया प्रमाणावर जमिनीचे क्षेत्र उपलब्‍ध आहे. या क्षेत्रावर १९७२ ते २००१ दरम्‍यान बीजोत्‍पादन घेतले जात होतेपरंतु गेल्‍या काही वर्षापासुन निधी व मनुष्‍यबळ अभावी यातील बहुतांश क्षेत्र लागवडीखाली आणण्‍यात अडचणी निर्माण झाल्‍या. गेल्‍या तीन वर्षात विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी विद्यापीठाचे बीजोत्‍पादन वाढ करण्‍याच्‍या उद्देश्‍याने मध्‍यवर्ती प्रक्षेत्र विकासाकडे विशेष लक्ष दिले. विद्यापीठाची इंचनइंच जमीन वापराखाली आणण्‍याचा मानस माननीय कुलगुरू यांनी व्‍यक्‍त केला आहे.  पडित जमीन लागवडीखाली आणण्‍यातील प्रमुख अडसर ठरणा-या क्षेत्रावरील काटेरी झाडेझुडपे काढुण जमिनीची नागंरणी, मोगडणी, चा-या काढणे इत्‍यादी मशागतीचे कामे करण्‍यात आली. याकरिता विद्यापीठातील विविध प्रकल्‍प व योजनातील ट्रॅक्‍टर्सआवश्‍यक औजारेजेसीबी यांचा वापर करण्‍यात आला. मध्‍यवर्ती प्रक्षेत्रावरील जवळपास २५०० एकर जमिन क्षेत्र या पैदासकार बीजोत्‍पादन हाती घेण्‍यात आले आहे. विद्यापीठ परिसरात नवीन चार मोठया क्षमतेची शेततळी निर्माण करण्‍यात आली असुन जुन्या मोठ्या शेततळयाची दुरूस्‍ती करण्‍यात आली आहेया माध्‍यमातुन ८ – ९ कोटी लिटर पाण्‍याची साठवण क्षमता शक्‍य होत आहे. यामुळे बीजोत्‍पादनाकरिता संरक्षित सिंचन देणे शक्य होत आहे. गेल्‍या वर्षी खरीप व रबी हंगामामध्‍ये विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पटीने वाढी झाली. यामुळे विद्यापीठ विकसित वाणांचे जास्‍तीत जास्‍त बियाणे शेतकरी बांधवाना उपलब्‍ध होणार आहे. तसेच बीजोत्‍पादनाकरिता २५० पेक्षा जास्‍त शेतकरी उत्‍पादक कंपन्‍यासोबत करार करण्‍यात आले आहेत.

देश-विदेशातील विविध नामांकित संस्‍थासोबत सामंजस्‍य करार : राष्‍ट्रीय व जागतिक स्‍तरावरील कृषि क्षेत्रातील संशोधन व ज्ञानाची माहिती विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व विद्यार्थ्‍यांना अवगत असणे आवश्‍यक आहे. शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदु असुन शेती विकास व शेतकरी कल्‍याणाकरिता सर्व शासकीय व अशासकीय संस्‍थांनी एकत्रित कार्य करण्‍यावर माननीय कुलगुरू यांचा भर असुन त्‍यांच्‍या कार्यकाळात देश – विदेशातील संस्‍थासोबत आजपर्यंत ४० सामंजस्‍य करार करण्‍यात आले आहेत. यात जगातील अग्रगण्‍य विद्यापीठे अमेरिकेतील कन्‍सस स्‍टेट युनिवर्सिटी, फ्लोरिडा युनिवर्सिटी, वेस्टर्न सिडनी विद्यापीठ यांच्‍या सोबत कृषि शिक्षण व संशोधन करिता करार करण्‍यात आला असुन यामुळे आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील कृषि तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी यांच्‍यात कौशल्‍य विकास शक्‍य होणार आहे. गत तीन वर्षात देश-विदेशातील अद्ययावत कृषि संशोधन आणि तंत्रज्ञानाची ज्ञान अवगत करण्‍यात करिता नाहेप प्रकल्‍पांतर्गत विद्यापीठातील ५१ विद्यार्थी आणि २४ प्राध्‍यापक / संशोधक यांनी अमेरिका, स्पेन, हंगेरी, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, ब्राझिल, थायलंडकॅनडाजपान आदी देशातील अग्रगण्‍य विद्यापीठांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेहे विद्यापीठासाठी एक ऐतिहासिक बाब आहे. तसेचदेशातील विद्यापीठाने आयआयटी आणि इतर अग्रणी कृषी संशोधन संस्थांमध्ये ७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आणि प्राध्‍यापकांनी प्रशिक्षण पुर्ण केले. यामुळेविद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधन मानकांमध्ये सुधार होण्यास मदत होणार आहे.

डिजिटल शेती व ड्रोन तंत्रज्ञानाचा कृषि क्षेत्रात वापर : डिजिटल शेती संशोधनास प्रोत्‍साहनाकरिता विद्यापीठात जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परिषदनवी दिल्‍ली पुरस्‍कृत राष्‍ट्रीय उच्‍च शिक्षण प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन कृषी ड्रोनयंत्र मानव आणि स्‍वयंचलित तंत्रज्ञान विकासावर भर देण्‍यात येत आहे. येणा-या काळात ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीत फवारणी करिता आणि किड व रोगांचे निरीक्षण आदी करिता वापर वाढणार आहे. शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाच्‍या वापराबाबत मार्गदर्शक तत्‍वे निश्चित करण्‍यात करिता राष्‍ट्रीय पातळी कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पाच समित्‍या गठीत करण्‍यात आल्‍या होत्‍याया समित्‍यांनी विविध पिकांत किटकनाशकेअन्‍नद्रव्‍य व खते देण्‍याकरिता ड्रोनचा वापराबाबत मार्गदर्शक तत्‍वे निश्‍चित केले आहेत. ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकरी बांधवांना व्‍हावा याकरिता विद्यापीठाने वॉव गो ग्रीन कृषि विमान संस्‍थेसोबत सामंजस्‍य करार केला असुन या माध्‍यमातुन विविध गावात ड्रोन फवारणीचे प्रात्‍यक्षिके दाखविण्‍यात आली. या माध्‍यमातुन शेतकरी बांधवाना फवारणी करिता ड्रोन भाडे तत्‍वावर उपलब्‍ध होणार आहे. तसेच सेरेब्रोस्‍पार्क इन्‍नोव्‍हेशन कंपनीसोबत सहा महिन्‍याचा अॅग्रीड्रोन व्‍यावसायिक अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यात आला असुन आजपर्यंत २६ युवकांनी अभ्‍यासक्रम पुर्ण केला असुन सर्वांना स्‍वयंरोजगार व रोजगार प्राप्‍त झाला आहे. लवकरच ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था (RPTO) स्थापित करण्‍यात येणार आहे.

विद्यापीठास विविध संशोधन व प्रशिक्षण प्रकल्‍प : सीएनएच न्‍यु हांलड कंपनी द्वारा कोर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) निधीच्‍या माध्‍यमातुन १५०० तरूण शेतकरी बांधवांना आधुनिक कृषि अवजारे यांचा उपयोगदुरूस्‍ती आणि देखरेख विषयोंवर प्रशिक्षीत करण्‍यात आले आहे. जे फार्म कंपनीच्‍या कोपॉरेट सामाजिक जबाबदारी निधीच्‍या माध्‍यमातुन महाराष्‍ट्र यात्रिकीकरण प्रशिक्षण केंद्राची सुविधा उपलब्‍ध करण्‍यात आली आहे. माननीय कुलगुरू हे राष्‍ट्रीय पातळीवरील अनेक संशोधन निधी देणा-या संस्‍थेवर सदस्‍य म्‍हणुन कार्य करतातयाचा लाभ विद्यापीठास झाला. विद्यापीठास गत तीन वर्षात अनेक संशोधन प्रकल्‍प मंजुर झाले असुन यात भारत सरकारच्‍या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे (DST) एक प्रकल्पराष्‍ट्रीय कृषि विज्ञान निधीचे (NASF) चे एक प्रकल्पमुख्‍यमंत्री सहय्यता निधीतुन आठ प्रकल्पेराष्‍ट्रीय कृषि विकास योजनेतुन पाच प्रकल्पराजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे दहा प्रकल्पआणि इफ्कोचा एक नेटवर्क प्रकल्पाचे संशोधन कार्यास सुरवात झाली आहे. तसेच जर्मनीच्‍या संस्थेव्‍दारे अॅग्रीपीव्‍ही प्रकल्‍प आणि अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठाव्‍दारे संशोधन प्रकल्पाचे कार्य प्रगतीपथावर आहे. कॉर्पोरेट क्षेत्राकडुन व्‍यावसाईक सामाजिक जबाबदारी निधी संशोधन व प्रशिक्षण करिता उपलब्‍ध होत आहे. शेतकरी बांधवा मध्‍ये विद्यापीठाच्‍या जैविक खते आणि बायोमिक्‍सची मागणी पाहता राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेतुन प्रत्‍येक जिल्‍हयात ही उत्‍पादने उपलब्‍ध होत आहेत.

नाविण्‍यपुर्ण संशोधन : कृ‍षी क्षेत्रात अॅग्री फोटोव्‍होल्‍टेइक तंत्रज्ञानाच्‍या वापराकरिता वनामकृविचा जर्मनीच्‍या जीआयझेड सोबतचे संशोधन कार्य प्रगतीपथावर आहे. अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन सौर ऊर्जेतुन वीज निर्मितीसोबत विविध पिकांची लागवड केल्‍यास शेतकरी बांधवाना दुहेरी उत्‍पन्‍न मिळण्‍याचे साधन प्राप्‍त होऊ शकते. हे तंत्रज्ञान भारताकरिता नवीन असुन या तंत्रज्ञानाची मराठवाडयातील पिक पध्‍दतीत कितपत उपयुक्‍त ठरू शकतेयाकरिता संशोधनात परभणी कृषि विद्यापीठाने राज्‍यात पुढाकार घेतला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेचे (इस्रोअहमदाबाद येथील अंतराळ उपयोग केंद्र आणि विद्यापीठ सामंजस्य करार करण्‍यात आला असुन अचुक हवामान अंदाज व त्‍या आधारे ठोस कृषी सल्‍ला तालुकानिहाय शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता मदत होत आहे.

नवीन वाण निर्मिती : विद्यापीठ विकसित वाण व तंत्रज्ञान केवळ मराठवाडा किंवा राज्‍यापुरते उपयुक्‍त नसुन देशातील अनेक राज्‍यातील शेतकरी बांधवाकरीता उपयुक्‍त आहे. केंद्रीय बियाणे अधिनियम१९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्‍या शिफारसीनुसार २०२३ मध्‍ये  वनामकृवि विकसित करडई पिकांच्‍या पीबीएनएस १८४देशी कापसाच्‍या पीए ८३७खरीप ज्‍वारीच्‍या परभणी शक्‍तीतुरीचा वाण बीडीएन-२०१३-२ (रेणुका), सोयाबीनचे एमएयुएस-७२५ आणि करडई पिकाचे पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णाया वाणांचा समावेश केला आहे. यामुळे या वाणांचा प्रचार व प्रसार मोठया प्रमाणावर होण्‍यास मदत होणार आहे. २०२४ मध्‍ये राहुरी ये‍थील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास बैठकीत विद्यापीठ विकसित सहा वाण३ तीन कृषी औजारे सह ३६ विविध तंत्रज्ञान शिफारशींना मान्‍यता प्राप्‍त झाली आहे. तसेच २०२४ मध्‍ये अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास बैठकीत विद्यापीठ विकसित भेंडीचा परभणी सुपर क्रांती (पीबीएन ओकरा -१) आणि केळीचा वनामकृवि - एम ३ या नवीन वाणाची आणि पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित तसेच पोषण आहारपशुविज्ञान आणि कृषि संलग्न इतर शाखेतील तंत्रज्ञानाच्या ४८ शिफारशींना मान्यता प्राप्‍त झाली आहे.  विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आलेला तुरीचा बीडिएनपीएच १८ - ५ या संकरित वाणास लागवडीकरिता मान्यता प्राप्‍त झाल असून या वाणाची शिफारस महाराष्ट्रासह भारताच्या मध्य विभागासाठी करण्यात आलेली आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील कृषि विद्यापिठाद्वारे शिफारस करण्यात आलेला हा पहिलाच तुरीचा संकरित वाण आहे. यावर्षी परभणी येथे झालेल्‍या ५३ व्‍या बैठकीत विद्यापीठ विकसित नवे चार वाणदोन यंत्रे आणि ५३ तंत्रज्ञान शिफारशींना मान्‍यता मिळाली. यात ज्वारीचा परभणी परभणी सुपर दगडी (एसपीव्ही  २७३५) या धान्य व कडब्याच्या अधिक उत्पादन देणार वाणास मान्‍यता मिळाली तर परभणी पद्मा (सिपीबी २२०१) या चवळी पिकाचा अधिक उत्पादन देणारालवकर पक्व होणारापिवळा केवडा या रोगास प्रतिकारक्षम वाण मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या विभागाकरिता खरिप हंगामात लागवड करण्याची शिफारस मान्‍य करण्‍यात आली. तिळाचा टीएलटी ७ हा पांढरा व टपोरा दाण्याचा अधिक बियांचे व तेलाचे उत्पादन देणारा रोग व कीडीस सहनशील असणा­या वाणाची  राज्यात उन्हाळी हंगामात लागवडीसाठी शिफारस मान्‍य केली गेली तर तिळाचा टीएलटी १० हा वाण तेलंगणा राज्यासाठी खरीप व रब्बी / उन्हाळी हंगामासाठी प्रसारित करण्यात आली.

विद्यापीठ विकसित मनुष्य चलित रोपवाटीका भाजीपाला टोकन यंत्राची रोपवाटीके मध्ये मिरची, वांगे, टोमॅटो, कांदे, कोबी व कोथींबीर या पिकाची रोप तयार करण्यासाठी वापर करणासाठी प्रसारीत करण्‍यात आले तर विद्यापीठ विकसीत विविध धान्यापासून लाहया व खरमूरे बनविण्याच्या लघुउद्योगासाठीएलपीजी चलित (उच्च तापमान कमी वेळ आधारीत)अर्धस्वयंचलित पफिंग व पॉपिंग संयंत्र प्रसारीत करण्यात आले.

कापुस पिकातील बीटी सरळ वाणास केंद्रीय वाण निवड समितीची मान्‍यता : विद्यापीठ विकसित तीन अमेरिकन बीटी सरळ वाण व देशी कपाशीच्या एका सरळ वाणाची केंद्रीय वाण निवड समितीद्वारे लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे विनियंत्रीत बीटी (क्राय १ एसी जनुक) तंत्रज्ञानयुक्त वाणांची पैदास करण्याचे कार्य सुरू असुन याद्वारे निर्मीत एनएच १९०१ बीटी (NH 1901), एनएच १९०२ (NH 1902) बीटी व एनएच १९०४ (NH 1904) बीटी ही तीन अमेरीकन सरळ वाण अखिल भारतीय समन्वयित कापूस सुधार प्रकल्पाच्या केंद्रीय वाण निवड समितीने मध्य भारत (महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशविभागाकरिता प्रसारीत करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. विद्यापीठांतर्गत परभणी स्थित कापूस संशोधन केंद्र, महेबूब बाग या केंद्राद्वारे निर्मीत देशी कापूस सरळ वाण पीए ८३३ (PA 833) हा वाण देखिल समितीद्वारे दक्षिण भारत विभागाकरिता (आंध्र प्रदेश, कर्नाटक व तामिळनाडू) प्रसारणासाठी शिफारस करण्यात आला आहे. परभणी कृषि विद्यापीठ विकसित कापुसाच्‍या सरळ वाणात बीटीचा अंतर्भाव केल्‍यामुळे शेतकरी बांधवाचा बियाणांवर होणारा खर्च कमी होण्‍यास मदत होणार असुन कोरडवाहू लागवडीमध्ये उत्‍पादनात सातत्‍य देणारे वाण आहेत. सार्वजनिक क्षेत्रामध्ये बीटी कापूस सरळ वाण प्रसारीत करणारे परभणी कृषि विद्यापीठ हे राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. सरळ वाणांचे बियाणे उपलब्ध झाल्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या शेतामध्ये मागील वर्षाच्या लागवडीतून उत्पादीत कपाशीपासून सरकी वेगळी करून तीच सरकी पुढील तीन वर्षांपर्यंत बियाणे म्हणून वापरता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दरवर्षी नवीन बियाणे बाजारातून खरेदी करण्याची आवश्‍यकता पडणार नाही आणि पर्यायाने बियाण्यावरील खर्च कमी होईल. जुन २०२५ मध्‍ये विद्यापीठ विकसित करण्यात आलेल्या एनएच २२०३७ बीटी बीजी २ व एनएच २२०३८ बीटी बीजी २ या दोन बीजी २ सरळ वाणांना केंद्रीय वाण निवड समितीने मध्य भारत विभागातील महाराष्ट्रगुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सघन लागवडीकरिता कोरडवाहू क्षेत्रासाठी शिफारस करण्यात आली आहे.

माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत उपक्रम : कृषि तंत्रज्ञान शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता विद्यापीठाव्‍दारे विविध उपक्रम राबविण्‍यात येतातचपरंतु याची व्‍याप्‍ती व गती वाढविण्‍याकरिता प्रयत्‍न केला जात आहे. सप्‍टेंबर २०२२ मध्ये महाराष्‍ट्र शासनाच्‍या मार्गदर्शनानुसार “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” उपक्रमातंर्गत मराठवाडा विभागातील विविध गावात राबविण्‍यात आलायात विद्यापीठ शास्त्रज्ञाच्या पथकांनी गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांच्या शेती विषयक समस्या समजुन घेतल्या व पीक लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केलेहा उपक्रम विद्यापीठाच्‍या वतीने प्रत्‍येक महिन्याच्‍या दुस-या बुधवारी राबविण्‍याचे ठरविले. गेल्‍या अडीच वर्षात आजपर्यंत ३०० पेक्षा जास्‍त गावात उपक्रम राबविण्‍यात आला. यामुळे शेतकरी बांधवाशी विद्यापीठाची नाळ अधिक मजबूत होण्‍यास मदत होत आहे. 

ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद : विद्यापीठाच्‍या वतीने गेल्‍या दोन वर्षापासुन ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम दर मंगळवारी व शुक्रवारी सायंकाळी ७ ते ८.३० दरम्‍यान राबविण्‍यात येत आहे. यास मोठया प्रमाणात शेतकरी बांधवा सहभागी होऊन आपले प्रश्‍न विचारतात तर विद्यापीठ शास्‍त्रज्ञ त्‍याच्‍या समस्‍याचे समाधान यशस्‍वीरित्‍या करतात.  

विकसित कृषी संकल्प अभियानाची ५८४ गावांमध्ये अंमलबजावणी : भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत विकसित कृषी संकल्प अभियान दिनांक २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान देशभरात राबविण्यात आल. महाराष्ट्रामध्ये या अभियानाचा उदघाटन राज्‍याचे माननीय मुख्‍यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परभणी येथे करण्यात आले. सदर उपक्रमाव्दारे विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि विज्ञान केंद्राच्‍या वतीने ५८४ गावांमध्‍ये राबविण्‍यात येऊन एक लाख पेक्षा जास्‍त शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्‍यात आले.

चार शासन अनुदानित व दोन संशोधन केंद्रास मान्‍यता : महाराष्‍ट्र शासनाच्‍या मान्‍यतेने नवीन चार शासन अनुदानित घटक महाविद्यालये स्‍थापना करण्‍यास आली आहेयात जिरेवाडी (परळीयेथे कृषि महाविद्यालय आणि कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन महाविद्यालय, नांदेड येथे कृषि महाविद्यालय तसेच सिल्‍लोड तालुक्‍यात कृषि महाविद्यालयास मान्‍यता प्राप्‍त झाली असुन गतवर्षी या महाविद्यालयात प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. धर्मापुरी (परळी) येथे सोयाबीन संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्र आणि सिल्‍लोड येथे मका संशोधन केंद्रास मान्‍यता मिळाली आहे. 

कृषि उद्योजकता विकासावर भर : अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयात नवी दिल्‍ली येथील केंद्रीय अन्‍न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्‍या प्रधानमंत्री सुक्ष्‍म अन्‍न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत सामाईक उष्मायन केंद्र (कॉमन इन्‍क्‍युबेशन सेंटरसुरवात करण्‍यात आली असुन यामुळे अन्‍न प्रक्रिया उद्योजक शेतकरी बांधवा लाभ होणार आहे. कौशल्‍य विकास उपक्रमांतर्गत ग्रामीण युवकांना तसेच पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यांना कृषी उद्योजकतेचे घडे दिले जात आहे. नुकतेच विद्यापीठाने आयएमसी (IMC) चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री मुंबई यांच्यासोबत मराठवाडा विभागातील कृषि, व्यापार व गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार दोन्ही संस्थामध्ये स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पीक निवडीत मार्गदर्शन, शेती पिकांपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे, बाजारपेठेची ओळख व मागणीनुसार उत्पादने सुधारित करणे, परभणी जिल्ह्यातील कृषि उत्पादनांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सादरीकरण, गुंतवणूकदार व खरेदीदारांना शास्त्रज्ञ व उत्पादकांशी थेट संपर्क साधण्यासाठी सुविधा, विद्यापीठातील तांत्रिक प्रगतींचे व्यावसायीकरण, विद्यार्थ्यांसाठी रोजगार व उद्योजकतेच्या संधी निर्माण करणे आदी क्षेत्रात परस्पर सहकार्य करणार आहेत.

सन्‍मान व पुरस्‍कार : प्रगतशील शेतकरीनन्‍मोषक कृषी उद्योजक, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ यांचा सन्‍मान - विद्यापीठाच्‍या वतीने आयोजित विविध पातळीवर शेतकरी, कृषि उद्योजक, कृषि शास्‍त्रज्ञ यांना सन्‍माननीत करण्‍यात येऊन त्‍यांना प्रोत्‍साहन देण्‍यात येत आहे. कोणताही मेळावा व कार्यशाळा असो शेतकरी बांधव व महिला प्रतिनिधीस सन्‍मानाने व्‍यासपीठावर स्‍थान दिले पाहिजेअसा आग्रह माननीय कुलगुरू यांचा असतो. नुकतेच  मोदीपुरम (मीरतउत्तर प्रदेश) येथे भारतीय शेती संशोधन संस्थेमध्ये आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय एकात्मिक शेती पद्धती परिषदेत परभणी येथून माननीय कुलगुरू सोबत प्रगतशील शेतकरीविद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसह १५ जणांचा चमू सहभागी झाले होते. तसेच इंदोर येथे संपन्‍न झालेल्‍या माननीय केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या कार्यशाळेत आपल्‍या भागातील शेतकरी बांधव सहभागी होऊन आपले अनुभव कथन केले.

विद्यापीठास तीन आंतरराष्‍ट्रीय आयएसओ मानांकने : वनामकृविस आयएसओ ५०००१आयएसओ १४००१आयएसओ २१००१ ही मानके प्राप्‍त झाली असुन यामुळे विद्यापीठाची राष्‍ट्रीय - आंतरराष्‍ट्रीय पातळीवर विशेष ओळख प्राप्‍त होणार आहे. आयएसओ ५०००१ हे मानक विद्यापीठातील ऊर्जा विनिमय आणि व्यवस्थापन दर्जेाच्‍या आधारे विद्यापीठास प्राप्‍त झाले आहे. पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील कार्याची दखल देऊन पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीचे आयएसओ १४००१ हे मानांक मिळाले आहे.  विद्यापीठांतर्गत असलेल्‍या घटक महाविद्यालयांच्या परिसरात ऊर्जा बचत आणि किफायतशीर विद्युत उपकरणे आणि उपकरणे उपलब्धताउर्जेच्या अपारंपरिक स्त्रोताच्या वापरास प्रोत्साहनविद्यापीठाच्या आर्थिक विकासासाठी ऊर्जा स्त्रोतांची बचत आदीकरिता आयएसओ १४००१ हे मानांक प्राप्‍त झाले आहे. आयएसओ २१००१ हे आंतरराष्‍ट्रीय मानक शैक्षणिक संस्था व्यवस्थापन प्रणाली करिता प्रदान केले जातेविद्यापीठ कृषि शिक्षणात करीत असलेल्‍या कार्यास हे मानक प्राप्‍त झाले असुन पदवीपदव्‍युत्‍तर आणि आचार्य पदवी अभ्‍यासक्रमाची तसेच डिजिटल तंत्रज्ञान प्रशिक्षण याबाबींची दखल घेण्‍यात आली आहे.

हरित विद्यापीठ - वृक्ष लागवडीची  विशेष मोहिम व विद्यापीठास हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३ : विद्यापीठ परिक्षेत्रावर २०० एकर वर नवीन फळबागे लागवडीचे कार्य चालु असुन यात फळपिकांच्‍या विविध जातीची लागवड करण्‍यात येणार आहे. तसेच विद्यापीठ परिसरात एक लक्ष वृक्षलागवडीस सुरूवात करण्‍यात आले आहे. गेल्‍या वर्षी पासुन वन विभागाच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठातील रेल्‍वे लाईनच्‍या लगत ४.५ किलोमीटर फळपिके व वनपिकांची लागवड करण्‍यात आली आहे.

 कृषि विद्यापीठास ग्रीन मेंटर्स संस्‍थेचा प्रतिष्ठित आंतरराष्‍ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३ न्‍युयॉर्क ये‍थे आयोजित ७ व्‍या एनवायसी ग्रीन स्कुल कॉन्‍फरन्‍समध्‍ये ७८ व्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशना प्रदान करण्‍यात आला. 

माननीय कुलगुरू यांना राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय पातळीवर गौरविण्‍यात आले : अमेरिकेतील फ्लोरिड विद्यापीठात मुख्‍यालय स्थित असलेल्‍या कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी या अग्रगण्‍य वैज्ञानिक संस्‍थेचे फेलो म्‍हणुन विद्यापीठाचे कुलगुरू मा  डॉ  इन्‍द्र  मणि यांची निवड  झालीजपान मधील क्‍योटो येथे आयोजित विसावी सीआयजीआर जागतिक परिषदेत त्‍यांना फेलो म्‍हणु अकादमीच्‍या वतीने सन्‍माननित करण्‍यात  आलेही विद्यापीठाकरिता अभिमानाची बाब आहे.  तसेच "उत्कृष्ट नेतृत्वासाठी वर्षातील कुलगुरू पुरस्कार" (व्हॉइस चान्सलर ऑफ द इयरया मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पुणे येथे झालेल्या ‘८ व्या हायर एज्युकेशन इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी समिट अँड अवॉर्ड्स २०२५’ या राष्ट्रीय परिषदेच्या दरम्यान प्रदान करण्यात आला. कृषि शिक्षणसंशोधन आणि विस्‍तार शिक्षण क्षेत्रात केलेल्‍या उल्‍लेखनीय योगदानाची दखल मा प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना “कै. वसंतराव नाईक कृषि उल्लेखनीय योगदान पुरस्कार – २०२५” हा प्रतिष्ठित पुरस्काराने सन्‍माननित करण्‍यात आले. तसेच गत वर्षी त्‍यांना देशातील प्रतिष्ठित इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स, इंडिया संस्‍थेने इमिनेंट इंजिनीयर पुरस्काराने सन्‍माननीत करण्‍यात आले.

विविध संशोधन केंद्रास पुरस्‍कार : विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील गळीतधान्ये संशोधन केंद्राच्‍या अखिल भारतीय समन्वीत संशोधन (सूर्यफुल) प्रकल्पकरडई संशोधन केद्रछत्रपती संभाजीनगर येथील बाजरा संशोधन प्रकल्‍पास उत्‍कृष्‍ट संशोधन केंद्र पुरस्‍कारबदनापुर येथील तुर संशोधन केंद्राला सर्वोत्‍कृष्‍ट मानांकन मिळाले आहे. नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रास अखिल भारतीय समन्वयीत कापूस संशोधन प्रकल्पातर्फे राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट संशोधन केंद्र’ या बहुमानाने गौरविण्यात आले असुन सेंद्रीय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास जैविक इंडिया पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे.

महत्‍वाचे कार्यक्रम व कार्यशाळेेेचे यशस्‍वी आयोजन :  विद्यापीठाचा २५ वा व २६ वा दीक्षांत समारंभाचे यशस्‍वी आयोजन करण्‍यात आलेयात स्नातकांना विविध पदवीने माननीय राज्‍यपालांच्‍या हस्‍ते अनुग्रहित करण्‍यात आले. विद्यापीठ आणि परभणी आत्‍माकृषि विभाग (महाराष्‍ट्र शासन) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृ‍षी तथा शेतकरी कल्‍याण मंत्रालय (भारत सरकार)नवी दिल्‍ली पुरस्‍कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे भव्‍य आयोजन करण्‍यात आले. यात देशातील सात राज्‍यातील कृषि तंत्रज्ञान पाहण्‍याची संधी शेतकरी बांधवाना मिळालीछत्रपती संभाजी नगर येथे बारावी राष्‍ट्रीय बियाणे परिषदेचे विद्यापीठाने यशस्‍वी आयोजन केलेयात देशातील बियाणे पैदासकारतज्ञशेतकरी व धोरणकर्ते यांनी सहभाग नोंदविला. तसेच कृषि संशोधनाची दिशा ठरविण्‍याकरिता केंद्र शासनाच्‍या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा कार्यशाळा घेण्‍यात आलीयातही देश पातळीवरील तज्ञांनी सहभाग नोदंविला. खरीप व रब्बी हंगामातील परिस्थितीनुसार वेळोवेळी कार्यशाळा घेण्‍यात आल्‍यायात मराठवाडयातील कृषि विभागातील अधिकारीविस्‍तार कार्यकर्तेशासन व शेतकरी सहभागी झाले. परिस्थितीनुसार शेतीत करावयाच्‍या उपाय योजना शेतकरी बांधवापर्यंत पोहविण्‍याकरिता प्रयत्‍न करण्‍यात आला. ५३ व्या संयुक्त कृषि संशोधन विकास समितीच्या बैठकीचे यशस्‍वीपणे आयोजन करण्‍यात आले,  या बैठकीचे उदघाटन माननीय मुख्‍यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या शुभहस्ते करण्‍यात आले. यात राज्‍यातील ३०० पेक्षा जास्‍त कृषि शास्‍त्रज्ञ, व धोरणकर्ते सहभागी झाले होते. विद्यापीठामध्ये प्रथमच तीन दिवसीय आंतरराष्‍ट्रीय परिसंवाद आणि भारतीय कृषि अभियंता संघटनेच्या ५८ व्या वार्षिक अधिवेशनाची यशस्वी आयोजन करण्‍यात आले होते, यात देश-विदेशातील ७५० मान्यवर प्रतिनिधींचा सहभाग नोदविला होता.

विद्यार्थ्‍यांचे कला क्षेत्रातील यश : विद्यार्थ्‍यांच्‍या गुणांना वाव देण्‍याकरिता वेळोवेळी सांस्कृतिक व्‍यासपीठ उपलब्‍ध करून देण्‍यात येत आहे. बंगलोर येथील जैन विद्यापीठात ३६ वा आंतर विद्यापीठ राष्‍ट्रीय युवा महोत्‍सव – जैन उत्‍सव २०२३ स्‍पर्धेत मेंदी कला प्रकारात विद्यापीठांतील लातुर येथील कृषि महाविद्यालयाची विद्यार्थींनी सिध्‍दी देसाई हिने कांस्‍य पदक पटकावले. तर आयसीएआर अॅग्री युनेफेस्‍ट मध्‍ये फाईन ऑर्ट मध्‍ये चॅपियन ट्रॉफी प्राप्‍त केली. एकविसाव्‍या अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ स्‍पर्धेत व्‍हॉलीबॉल मध्‍ये विद्यापीठ संघाने सुवर्ण पदक प्राप्‍त केले.

मुलभुत सोयी सुविधांचे बळकटीकरण : महाराष्ट्र शासनाने विद्यापीठातील अंतर्गत रस्ते मजबुतीकरणास आणि डांबरीकरणास करण्‍यात आले. विद्यापीठातील गेस्‍ट हाऊस सुविधाविद्यार्थी व विद्यार्थीनीनीं वसतीगृहाच्‍या चांगल्‍या सुविधा पुरविण्‍याकरिता माननीय कुलगुरू नेहमीच आग्रही असतात, विद्यापीठातील सभागृह, वसतीगृहांचे नुतनीकरणाचे काम करण्‍यात आले असुन गोळेगांवलातुरबदनापुर येथील वसतीगृहाचे नुतनीकरण केले गेले आहे. 

निवृत्‍त कर्मचारी यांच्‍या वेतनातील थकबाकीचा प्रश्‍न सोडविण्‍यात आला असुन शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचा-यांच्‍या पदोन्‍नत्‍या देण्‍यात आला आहे. संशोधन क्षेत्रात शेतकरी बांधवाकरिता उपयुक्‍त संशोधन करणे हा प्रमुख उद्देश्‍य विद्यापीठाचा असुन बदलत्‍या हवामानानुसार संशोधनास गती देण्‍याचे कार्य सुरू आहे. सद्यस्थितीत विद्यापीठात मनुष्‍यबळांचा विचार करता पन्‍नास टक्के पेक्षा जास्‍त पदे रिक्‍त असतांना विद्यापीठाचा दर्जा राष्‍ट्रीय पातळीवर उंचावण्‍याचे मोठे आव्‍हान विद्यापीठा समोर आहे. विद्यापीठाचे नामांकन उच्‍चांवण्‍याकरिता दर्जेदार संशोधनाची आवश्‍यकता असुन याकरिता देश पातळीवरील विविध संस्‍थेकडुन तसेच महाराष्‍ट्र शासनाकडुन निधी प्राप्‍त करण्‍याकरिता प्रयत्‍न चालुच आहेत. माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वात विद्यापीठ शेतकरी केंद्रीत विस्तार कार्यविद्याथी केंद्रीत शिक्षणनवाचार केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी केंद्रीत प्रशासन हा दृष्टीकोन ठेऊन कार्य करत आहे. येणा-या काळात माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वात परभणी कृषि विद्यापीठात आमुलाग्र बदल होऊन देशातील एक अग्रगण्‍य कृषि विद्यापीठ म्‍हणुन नावारूपाला येईल, हे निश्चित ।