वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि कार्यशाळेचे मुख्य अतिथी
महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यांतील कृषि विज्ञान केंद्रांची (KVKs) ८वी वार्षिक विभागीय कार्यशाळा दिनांक २० ते २२ जुलै २०२५ या कालावधीत भुज, कच्छ (गुजरात) येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे आयोजन भारतीय कृषि अनुसंधान परिषद - कृषि तंत्रज्ञान अनुप्रयोग अनुसंधान संस्था (ICAR-ATARI), विभाग क्रमांक VIII, पुणे यांच्या वतीने करण्यात आले असून कच्छ I, कच्छ II, मेहसाणा व पाटण येथील कृषि विज्ञान केंद्रांचे सहकार्य लाभले आहे.
या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे मुख्य अतिथी म्हणून
उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी विशेष भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी
‘महाविस्तार ॲप’चे महत्त्व सांगून कृषि विस्ताराच्या नव्या दिशा, संशोधनाचे महत्त्व
आणि ते शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची आवश्यकता यावर भर दिला. यावेळी
त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रभावी विस्तार कार्य कसे करता येईल, याबाबत विविध विस्तार साधनांच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ "शेतकरी देवो भव:"
या भावनेतून कार्य करत असून, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात
येणारे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ आणि ‘ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद’ हे देशातील आगळे-वेगळे मॉडेल्स
शास्त्रज्ञांसमोर मांडले. या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असल्याचे
त्यांनी नमूद केले.
अशा प्रभावी विस्तार मॉडेल्सचा अवलंब सर्व कृषि विज्ञान केंद्रांनी करून
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याबरोबरच, कृषि विज्ञान केंद्रे संशोधन केंद्रांच्या
स्वरूपात पुढे यावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी नवी दिल्ली येथील भाकृअपचे कृषि विस्तार विभागाचे माजी उपमहासंचालक
डॉ. पी. दास, सबौर येथील बीएयूचे माजी कुलगुरू डॉ. ए. के. सिंह, मोहनपूर
येथील बीसीकेव्हीचे माजी कुलगुरू व आटारी, झोन-VIII, पुणे येथील साइट सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष डॉ. एम. एम. अधिकारी, तसेच सदाऊ (मुंद्रा) येथील आरएआरडीएसचे ट्रस्टी श्री. रजनीकांत पटवा यांनी
उपस्थितांना मार्गदर्शन केले.
नवी दिल्ली येथील भाकृअपचे कृषि विस्तार विभागाचे सहायक महासंचालक डॉ. आर.
रॉय बर्मन यांनी ऑनलाइन माध्यमातून आपले विचार मांडले. कार्यक्रमात आटारी, पुणे संस्थेच्या
कार्याचा आढावा सादर करताना संचालक डॉ. एस. के. रॉय यांनी संस्थेच्या विविध
उपक्रमांची माहिती दिली. तसेच, आयएफएफसीओचे मुख्य कृषि
अधिकारी डॉ. तरनिंदर सिंग यांनी आयएफएफसीओच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती
दिली. या कार्यशाळेत विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश अहिरे यांच्यासह
मराठवाड्यातील सर्व कृषि विज्ञान केंद्रांच्या कार्यक्रम समन्वयकानीं सहभाग नोंदविला
घेतला आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी, आटारी-पुणे येथील प्राचार्य वैज्ञानिक डॉ. शाकिर अली सय्यद
यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या कार्यशाळेत तीनही राज्यांतील कृषि
विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ, तज्ज्ञ व अधिकारी सहभागी होत
असून, विविध कृषि तंत्रज्ञान, विस्तार
कार्यपद्धती, संशोधन प्रगती, शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचवले जाणारे नवकल्पनांवरील चर्चासत्रे व आढावा सादरीकरणे आयोजित करण्यात येत
आहेत.
या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे कृषि विज्ञान केंद्रांच्या कार्यक्षमतेत वाढ करून शेतकऱ्यांपर्यंत नावीन्यपूर्ण व शाश्वत तंत्रज्ञान पोहोचवणे आणि तिन्ही राज्यांमधील कृषि विज्ञान केंद्रांची मधील अनुभवांची देवाणघेवाण करणे हा आहे.