Thursday, April 16, 2026

वनामकृविच्या लातूर येथील गळीतधान्य संशोधन केंद्रात बीज प्रक्रिया केंद्र व विशेषीकृत शीतगृह प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

शीतगृह प्रकल्पामुळे कृषि उत्पादनांचे संरक्षण व शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास चालना : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील गळीतधान्य संशोधन केंद्रातील सूर्यफूल बियाणे योजने अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ‘बीज प्रक्रिया केंद्र’ व ‘विशेषीकृत शीतगृह संरचना’ या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे भूमिपूजन दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शीतगृह प्रकल्पामुळे कृषि उत्पादनांचे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येईल. आधुनिक साठवण सुविधांमुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य भाव मिळण्यास मदत होईल. अशा प्रकल्पांमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट होऊन कृषि क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या समारंभास विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, कृषि महाविद्यालय लातूरचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शेंडे, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चाकूरचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे, उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे, कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, गळितधान्ये विशेषज्ञ डॉ. मोहन धुप्पे तसेच कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य श्री. अशोक घोटमुकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. मोहन धुप्पे यांनी सांगितले की, हा प्रकल्प गळितधान्ये संशोधन केंद्राच्या प्रगतीप्रती असलेली बांधिलकी व शेतकऱ्यांप्रती असलेली निष्ठा दर्शवितो. भविष्यातील पिढ्यांसाठी उपयुक्त पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असून, सामूहिक मेहनत व संघभावनेचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. शिवशंकर पोले, श्री. रविकिरण मोरे, श्री. महेश फड, श्री. रोहित सिंदालकर, श्री. शंभू मिरकड व कु. आरती गायकवाड तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य श्री. अशोक घोटमुकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.