Thursday, August 29, 2024

रावे उपक्रमांतर्गत हट्टा येथे खरीप शेतकरी मेळावा आणि स्कूल कनेक्ट कार्याक्रम संपन्न

 संचालक मा. डॉ. भगवान आसेवार यांनी हवामान बदलानुसार शास्वत शेतीसाठी सुचविले तंत्रज्ञान


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय, गोळेगाव अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव जागरुकता कार्यक्रम (रावे) वसमत तालुक्यातील हट्टा येथे दि. २८ ऑगस्ट रोजी खरीप शेतकरी मेळावा आणि स्कूल कनेक्ट कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक विस्तार शिक्षण संचालक मा. डॉ. भगवान आसेवर हे होते तर अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव नारखेडे हे होते आणि सरपंच श्री दीपक हातागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी, सहाय्यक प्राध्यापक, डॉ. राहुल भालेराव आणि डॉ. प्रवीण राठोड, प्रा. संजय पवार, प्रभारी अधिकारी डॉ. डी. एच. सारंग, हट्टा येथील जिल्हा परिषद प्रशालेचे श्री मुंडीकसर, ग्रामपंचायत सदस्य श्री. गोविंद देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या उद्घाटनात  विस्तार शिक्षण संचालक मा. डॉ. भगवान आसेवर यांनी हवामान बदलानुसार शास्वत शेतीसाठी विविध तंत्रज्ञान सुचविले. तसेच त्यांनी शेतीमध्ये शक्यतो कमी खर्चाच्या आणि  घरच्या निविष्ठा वापरून शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याचा सल्ला दिला. यावेळी स्कूल कनेक्ट कार्याक्रमाची संकल्पना राबविताना जिल्हा परिषद प्रशालेचे विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला होता त्यांना कृषि आणि सलग्न शाखेतील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शेतीविकासातील महत्व मा. डॉ. भगवान आसेवर यांनी विशद केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. वासुदेव नारखेडे यांनी खरीप पिकातील सद्यस्थितील उपाययोजना आणि रावे उपक्रमातील विविध उपक्रमाची माहिती दिली. तांत्रिक मार्गदर्शनामध्ये कृषि विद्यावेता डॉ. गजानन गडदे यांनी कापूस, सोयाबीन आणि हळद पिकातील सद्यस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत आणि कापुस उत्पादन वाढीसाठी गळफांदी कापणे तसेच झाडाची अतीरीक्त वाढ रोखण्यासाठी वाढ प्रतिबंधक रसायनाची फवारणी बाबत मार्गदर्शन केले. यानंतर कीटक शास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी सोयाबीन पिकातील तंबाखुवरील पाने खाणारी अळीची ओळख आणि त्याचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण तसेच कापूस, सोयाबीन आणि हळद यावरील कीड आणि रोग नियंत्रणाची माहिती सांगितली व विविध लेबलक्लेम कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापराबाबत तसेच सोयाबीन मधील विषाणुजन्य पिवळा मोझॅकचे व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. याबरोबरच प्रा. संजय पवार यांनी शेती व्यवसायात सिंचन पद्धतीचे महत्व विशद केले आणि यांत्रिकीकरणावर भर द्यावा तसेच सोलार पंप वापरण्यासाठी प्रोत्साहित केले. प्रास्ताविकात  रावे कार्यक्रम कार्यक्रमांतर्गत विद्यर्थ्यांनी राबविलेल्या कार्यक्रमाची माहिती रावे समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषेद शाळेमध्ये रावेच्या विद्यार्थ्यांनी गावाचा संपूर्ण स्थिती दर्शविणारा नकाशाचे निरीक्षण मान्यवरांनी आणि शेतकऱ्यांनी तसेच शाळेतील शिक्षकासह सर्व विद्यार्थ्यांनी अवलोकन केले तसेच शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रांचालन रावेच्या कृषि कन्या वैष्णवी म्हस्के आणि कामिनी राजे यांनी केले तर आभार ऋतुजा महाळणर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषि दूत अदनान पठाण यांचासह हट्टा येथील रावेचे सर्व कृषि दूत आणि कृषि कन्यांनी उच्चपरिश्रम घेतले. कार्यक्रमामध्ये रावेचे लिंगी, तेलगाव, हट्टा येथील सर्व कृषि दूत आणि कृषि कन्या, गावातील शेतकरी तसेच शाळेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.