Wednesday, September 3, 2025

वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयात गणेशोत्सव निमित्त भव्य रक्तदान शिबिर

 ४० विद्यार्थ्यांनी रक्तदान करून "रक्तदान हेच महादान" या संदेशाला जाग दिली

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालयात सुरू असलेल्या गणेशोत्सव २०२५ निमित्त विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय, कृषि महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना आणि गणेशोत्सव आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. विशेष उपस्थितीमध्ये कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, तसेच शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांची उपस्थिती लाभली.

रक्तदान शिबिरात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. जिल्हा रुग्णालय, परभणी येथील डॉ. सुभाष सिशोदिया आणि त्यांच्या कुशल टीमने शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पाथ्रीकर आणि डॉ. मेघा जगताप यांचे तसेच विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राचे डॉ. श्रीपाद गायकवाड यांचे विशेष योगदान राहिले.

विद्यार्थ्यांमध्ये रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शिबिराच्या प्रारंभी मार्गदर्शनपर व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले. यामध्ये रक्तदानाचे वैज्ञानिक महत्त्व, आरोग्यदायी फायदे आणि सामाजिक जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला असून, यामध्ये एकूण ४० विद्यार्थ्यांनी रक्तदान करून "रक्तदान हेच महादान" या संदेशाला जाग दिली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव, परस्पर सहकार्याची भावना आणि मानवतेची कळकळ वृद्धिंगत झाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रक्तदान शिबिराने महाविद्यालयात समाजहिताचा आणि सेवाभावाचा संदेश दिला.


‘शेतकरी देवो भवः’ मालिकेत प्रगतशील शेतकरी श्री विजय जंगले यांची प्रेरणादायी यशोगाथा

 सहयोगातूनच समृद्धी आणि विकास साध्य... माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ‘शेतकरी देवो भवः’ या नाविन्यपूर्ण ऑनलाईन मालिकेत  दिनांक २ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या स्टुडिओत माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कृषि अर्थशास्त्र तज्ज्ञ डॉ. रणजीत चव्हाण आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या भागात पेडगांव (ता. जि. परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री. विजय जंगले यांनी सेंद्रीय शेतमालाचे विक्री व्यवस्थापन व आर्थिक उन्नती’ या विषयावर मार्गदर्शन करून आपली प्रेरणादायी यशोगाथा मांडली.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी यावेळी बोलताना सांगितले की, संपूर्ण देशभर सेंद्रिय शेती उत्पादनांना अधिक भाव मिळावा यासाठी चर्चा सुरू आहे. यासाठी विक्री व्यवस्थापनात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे आणि त्याबाबतची माहिती शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून यायला हवी, असेही त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्कृष्ट पद्धतीचा समन्वय असून कार्यापेक्षा समन्वय अधिक महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांमध्ये सांघिक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे, कारण एकमेकांच्या सहयोगातूनच समृद्धी आणि विकास साध्य होतो, यावर त्यांनी भर दिला. परभणी जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक गटांतील शेतकरी साधे राहणीमान व उच्च विचारांचे उदाहरण आहेत. त्यांच्या कार्यातील चांगल्या बाबींचा स्वीकार करून विद्यापीठाने संशोधन कार्य अधिक बळकट करावे, असेही माननीय कुलगुरूंनी सुचवले. याबरोबरच, पदव्युत्तर आणि आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना या संशोधनात सहभागी करून घेण्याच्या सूचना अर्थशास्त्र व कृषी विस्तार शिक्षण विभागास दिल्या. तसेच, या संशोधनातून उत्कृष्ट डॉक्युमेंटेशन तयार करण्याचेही निर्देश दिले. शेवटी, या प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी शेतकऱ्यांच्या भेटी आयोजित कराव्यात, अशी सूचनाही माननीय कुलगुरूंनी यावेळी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि अर्थशास्त्र तज्ज्ञ डॉ. रणजीत चव्हाण यांनी करत प्रगतशील शेतकरी श्री. विजय जंगले यांची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान श्री. जंगले यांनी सांगितले की, खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय शेती फायदेशीर ठरली आहे. यासाठी त्यांनी बायोगॅसचा वापर करून उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवले. त्यांनी स्पष्ट केले की, सेंद्रिय शेतीच्या पहिल्या वर्षी उत्पन्न तुलनेने कमी मिळते, परंतु दुसऱ्या व तिसऱ्या वर्षापासून उत्पादनात भरीव वाढ होते आणि शेती फायदेशीर ठरते. यामुळे पोषक आहार मिळतो, तसेच निसर्गाचे संतुलन राखले जाते आणि मानवी आरोग्य उत्तम राहते, असेही त्यांनी नमूद केले. याशिवाय त्यांनी भाजीपाला उत्पादक गटाच्या माध्यमातून करटुले लागवडसारखे अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांनी विद्यापीठात तयार होणाऱ्या बायोमिक्स आणि ट्रायकोडर्मा सारख्या तंत्रज्ञानाचा वापरही अत्यंत उपयुक्त ठरतो, असे सांगितले. तसेच विद्यापीठाचा सल्ला अनमोल आहे, म्हणून शेतकऱ्यांनी विद्यापीठाला किमान एक दिवस भेट देऊन माहिती घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्यांनी आर्थिक उन्नती साधली असून, त्यासाठी त्यांना भाजीपाला उत्पादक गटांचा विशेष लाभ झाला. यावेळी त्यांनी भाजीपाला उत्पादक गटाचे श्री. पंडितराव थोरात यांचा वारंवार उल्लेख करून त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याचे सांगितले. उत्पादने विक्रीसाठी त्यांनी ग्राहकांपर्यंत थेट विक्री व्यवस्थापनाची पद्धत अवलंबली, ज्यामुळे अधिक नफा मिळतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह अमरावती आणि सोलापूर येथून शेतकऱ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. प्रगतशील शेतकरी श्री. विजय जंगले यांना सेंद्रिय शेतीसंबंधी विविध प्रश्न विचारले, ज्यांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या मुलाखतीबाबत सहभागी शेतकऱ्यांनी विद्यापीठाचे आभार मानले.

Tuesday, September 2, 2025

वनामकृविच्या कृषि महाविद्यालयातील एनसीसी युनिटला ग्रुप कमांडर ब्रिगेडियर श्री अनुप बरबरे व कर्नल श्री दिलीप रेड्डी यांची भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालयातील एनसीसी युनिटला ग्रुप कमांडर ब्रिगेडियर श्री. अनुप बरबरे व कमांडिंग ऑफिसर कर्नल श्री. दिलीप रेड्डी यांनी दिनांक २ सप्टेंबर रोजी भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी सर्वप्रथम महाविद्यालयातील एनसीसी कार्यालयाची पाहणी करून उत्कृष्ट व्यवस्थापन, स्वच्छता व शिस्तबद्ध कामकाज याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच या कार्यालयाला बटालियनमधील सर्वोत्तम कार्यालय” म्हणून गौरविले.

दौऱ्यादरम्यान ब्रिगेडियर श्री. अनुप बरबरे व कर्नल श्री. दिलीप रेड्डी यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची औपचारिक भेट घेतली. या वेळी विविध शैक्षणिक, सामाजिक व व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली.

यानंतर त्यांनी एनसीसी कॅडेट्सशी संवाद साधत नेतृत्वगुणांचे महत्त्व स्पष्ट केले. कॅडेट्सना समाजसेवा, राष्ट्रसेवा व शिस्तीचे महत्त्व पटवून देत भविष्यात जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करण्याचे मार्गदर्शन केले.

या प्रसंगी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, कृषि महाविद्यालयाचे छात्रसेना अधिकारी लेफ्टनंट जयकुमार देशमुख तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.







सुपर केन नर्सरीद्वारे ऊस पिकाची लागवड करून उत्पादन वाढवणे शक्य : डॉ. गजानन गडदे

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित, सोंन्ना (ता. पूर्णा, जि. परभणी) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ सप्टेंबर रोजी ऊस पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

या परिसंवादात विस्तार कृषि विद्यावेत्ता तसेच व्यवस्थापक, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. गजानन गडदे यांनी सुपर केन नर्सरी, ऊस पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान, तसेच ऊस पिकातील एकात्मिक तण व अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच श्री. मधुकर मांडगे यांनी ऊस पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित चर्चासत्रात शेतकऱ्यांनी ऊस पिकांबाबत विचारलेल्या शंकांचे शास्त्रज्ञांनी समाधानकारक निरसन केले.

सदरील कार्यक्रमास श्री. शरद दराडे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पूर्णा, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादितचे चेअरमन श्री. बळीराम शंकरराव कदम, व्हाईस चेअरमन श्री. गणेश रंगनाथ कदम, सचिव श्री. पी. व्ही. चव्हाण, सोसायटीचे सर्व संचालक, पिंपळगाव (लिखा) गावचे सरपंच श्री. नागनाथ मोरे, गौर गावचे सरपंच श्री. अनंता पारवे तसेच सोन्ना गावातील एकूण १२८ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.