Monday, September 29, 2025

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या दीक्षारंभ कार्यक्रमाचा समारोप

 विद्यार्थ्यासाठी आम्ही आहोत – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रमाचा दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी समारोप करण्यात आला. अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे आणि विभाग प्रमुख डॉ वीणा भालेराव होत्या.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, “विद्यार्थ्यासाठी आम्ही आहोत” या भावनेतूनच विद्यापीठाचे कार्य चालते. त्यांनी गृह विज्ञान महाविद्यालयाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात झालेल्या परिवर्तनाचा इतिहास नमूद केला. पूर्वी या महाविद्यालयात केवळ मुलींनाच प्रवेश मिळत असे. मात्र भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने गृह विज्ञान या शाखेत बदल करून तिला सामुदायिक विज्ञान असे नाव दिले. यामध्ये समाजाशी निगडित समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असे उपयुक्त शिक्षण दिले जाते. शासनाने देखील गृह विज्ञान व सामुदायिक विज्ञान या पदव्यांना समान मान्यता दिली असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत आहे.

सामुदायिक विज्ञान ही कृषी संलग्न शाखा असून, यात आरोग्य, आहार, स्वच्छता, आनंदी जीवन, व्यक्तिमत्व विकास, उद्योजकता विकास अशा विविध अंगांनी विद्यार्थ्यांची जडणघडण केली जाते. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आत्मशक्ती वाढीस लागते. हे विद्यापीठ अनेक राष्ट्रीय मानांकनात वरच्या क्रमांकावर असून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे अ’ दर्जा प्राप्त विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील एकमेव सामुदायिक विज्ञान महाविद्यालय या विद्यापीठात आहे, याचा उल्लेख करून माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी त्यांनी विद्यापीठाची तुलना नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्थानाशी केली व त्याच दर्जाचे विद्यापीठ उभारण्याचा मानस व्यक्त केला. विद्यापीठात पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी विशेष प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी भविष्यात मुलींसाठी भव्य, आधुनिक व अद्ययावत वस्तीगृह उभारण्याची दृष्टी मांडली. विद्यापीठाच्या यशामागे साधेपणा आणि मेहनत हेच मुख्य घटक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

पूर्वी फक्त दीक्षांत समारंभ होत असत, मात्र नवीन शैक्षणिक धोरणानुसार दीक्षारंभ कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचे टप्पे समजावून सांगितले जातात. महाविद्यालयीन नियमावली, शैक्षणिक कार्यपद्धती, चांगल्या–वाईट सवयी, विद्यापीठ व पालकांच्या अपेक्षा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.

विद्यार्थ्यांना प्रेरित करताना माननीय कुलगुरूंनी पुढे सांगितले की, मेहनतीला आणि आनंदाला पर्याय नाही. प्रत्येकाने सरळ मार्गाने चालावे, आपले जीवन सुखी ठेवावे व कोणावरही राग धरणे टाळावे. शिक्षण हा केवळ ज्ञानप्राप्तीचा नव्हे तर चारित्र्य निर्माण करण्याचा भाग आहे. शिक्षणातून आपले जीवन घडते. प्रत्येकाने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे, भावनिक दृष्ट्या सक्षम राहिले पाहिजे. विनम्रता हीच खरी पात्रता असून पात्रतेतून धन मिळते, धनातून मदत करण्याची क्षमता निर्माण होते, त्यातून आनंद मिळतो व पुढे जीवन सुखमय होते.

त्यांनी पुढे सांगितले की, अहंभाव ठेवू नये. उत्कृष्ट नागरिक होण्यासाठी जीवनातील प्रत्येक आव्हान स्वीकारावे, एकमेकांना मदत करावी. यामध्येच खरा आनंद आहे. त्यांनी मानव आणि प्राणी यांच्या अवयवांच्या रचनेतील फरक समजावून देत विद्यार्थ्यांना आपले विचार नेहमी उंच ठेवण्याचा सल्ला दिला. कोणतीही द्वेषभावना न बाळगता क्षमाशील वृत्ती वाढवावी, यशस्वी जीवनाचे खरे मूल्य हेच आहे, असे सांगितले. शेवटी, कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा देत प्रार्थना केली.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणानुसार सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमांमध्ये अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. या अभ्यासक्रमात आहार, व्यक्तिमत्व विकास, उद्योजकता विकास व कौशल्य विकास यांना विशेष महत्त्व दिले गेले असून त्यातही उद्योजकता विकासास प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय, अनेक विषयांना दुरुस्त प्रणालीद्वारे अभ्यासक्रमाशी जोडण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाचे हे एकमेव महाविद्यालय महाराष्ट्रातील अ’ दर्जा प्राप्त विद्यापीठात कार्यरत आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवेश मिळणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे.

यशस्वी जीवनासाठी कौशल्याधारित शिक्षण फार महत्त्वाचे असून ते या महाविद्यालयात परिपूर्णरित्या उपलब्ध होणार आहे. यासाठी केवळ विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी. विद्यापीठाच्या मुख्यालयातच हे महाविद्यालय स्थापन असल्याने विद्यार्थ्यांना विद्यापीठातील सर्व अत्याधुनिक सुविधा मिळतात. या सुविधांचा योग्य लाभ घेत विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमामधून उत्कृष्ट नागरिक म्हणून घडावे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांनी केले. त्यांनी मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या दीक्षारंभ कार्यक्रमात आयोजित व्याख्याने व विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमात प्रथम वर्षातील विद्यार्थीनी श्रावणी डोके आणि विद्यार्थी गौरव नरताम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या प्रसंगी विभागप्रमुख डॉ. विजया पवार व डॉ. नीता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण प्रभारी डॉ. वीणा भालेऱाव आणि दीक्षारंभ समारोप समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी केले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.




















Saturday, September 27, 2025

आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून कृषि संशोधन व नवोपक्रमात पुढाकार घ्या – कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा विद्यार्थ्यांना संदेश

 वनामकृवित विद्यार्थ्यांसाठी डॉ. सय्यद इस्माईल यांचे विशेष व्याख्यान : संशोधन, नवोपक्रम व उद्योजकतेवर भर


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजित १७ व्या भारतीय कृषि विद्यापीठ संघाच्या राष्ट्रीय परिसंवाद निमित्त दिनांक २७  सप्टेंबर २०२५ रोजी विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी मुंबई येथील रेडियंट ॲम्बेडेड सोल्युशन्सचे संचालक डॉ. सय्यद इस्माईल यांचे विशेष मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. विशेष अतिथी म्हणून बंगलोर येथील कृषि विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ शिवरामू आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार हे होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करून संशोधन व नवोपक्रमाद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, कृषि उत्पादनक्षमता वाढवावी आणि देशाच्या कृषि समृद्धीत मोलाची भर घालावी, असा प्रभावी संदेश दिला.

डॉ. सय्यद इस्माईल यांनी विद्यार्थ्यांना कृषि विषयाचे सखोल ज्ञान आत्मसात करण्याचा सल्ला दिला. कृषि विद्यापीठातील विविध विद्या शाखा—कृषि अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, कृषि विद्या व उद्यानविद्या—यांनी एकत्रितपणे काम करून शेतकरी बांधवांच्या विविध समस्यांचे निराकरण करावे, असे त्यांनी नमूद केले.ते पुढे म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन आणि रोबोटिक्स यांचे मूलभूत सिद्धांत आत्मसात करून विद्यार्थ्यांनी कृषि विषयक समस्यांचे समाधान शोधले पाहिजे. त्यांनी शून्य मशागत, कृषि वानिकी, एकात्मिक कीड व्यवस्थापन, बांबू लागवड अशा नवनवीन व शाश्वत तंत्रज्ञानांचा सविस्तर उहापोह केला. शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले कृषि तज्ज्ञासह कृषि उद्योजक होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी केले. या वेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. प्रवीण वैद्य व विभाग प्रमुख डॉ. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राहुल रामटेके, डॉ. रणजित चव्हाण व डॉ. सचिन मोरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शास्त्रज्ञ डॉ. मदन पेंडके, डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. संदिपान पायाळ, डॉ. गजानन वसु, डॉ. अनिकेत वाईकर तसेच श्री. प्रमोद राठोड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे यांच्यात सामंजस्य करार

दोन विद्यापीठांमधील करारामुळे शैक्षणिक व संशोधन सहकार्याला नवी दिशा — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे (जिल्हा रायगड) यांच्यात शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता विकासासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हा करार परभणी येथे पार पडलेल्या "१७व्या राष्ट्रीय परिसंवाद" (17th National Symposium) या परिषदेदरम्यान दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाला.

या वेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्यासह शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, शास्त्रज्ञ डॉ. मदन पेंडके तसेच विद्यापीठांचे प्राध्यापक, अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या करारामुळे दोन्ही विद्यापीठांमधील संशोधन व शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ होईल तसेच विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नवनवीन संधी उपलब्ध होतील. त्यांनी असेही नमूद केले की, या सहकार्यामुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल.

या सामंजस्य करारानुसार दोन्ही विद्यापीठे एकत्र येऊन संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता विकास, तसेच विद्यार्थी व शिक्षक आदानप्रदान कार्यक्रम राबविणार आहेत. कृषि तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

करारानुसार संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणे, नवीन तंत्रज्ञान विकसित करणे, तसेच दोन्ही विद्यापीठांतील विद्यार्थी व शिक्षकांना कोर्स डिझाइन, अध्यापन, संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. याशिवाय प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे आणि इतर सुविधांचा परस्पर वापर करण्यात येईल.

उद्योजकता विकासाला चालना देण्यासाठी ‘आयडिया टू बिझनेस’ (Idea to Business) उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्टार्टअप्स उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. तसेच अभियांत्रिकी, कृषि डिजिटल तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक शास्त्र या क्षेत्रांमध्ये संयुक्त कार्यक्रम व प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यासाठी दोन्ही विद्यापीठे परस्पर सहकार्य करतील.



Friday, September 26, 2025

वनामकृवित १७ व्या भारतीय कृषि विद्यापीठ संघाच्या राष्ट्रीय परिसंवादाचा यशस्वी समारोप – लघु व सीमान्त शेतकऱ्यांसाठी शेती यांत्रिकीकरण आणि कृषि रोबोटिक्सवर सखोल चर्चा

परिसंवाद कृषि विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्यासाठी महत्त्वाचा ठरला... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि भारतीय कृषि विद्यापीठे संघ (इंडियन अॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज असोसिएशन – IAUA), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील एकूण ७४ कृषि विद्यापीठांच्या समन्वयाने आयोजित भारतीय कृषि विद्यापीठ संघाच्या दोन दिवसीय (२५ व २६ सप्टेंबर २०२५) १७ व्या राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी झाला. या परिसंवादाचा विषय होता – लघु व सीमान्त शेतकऱ्यांसाठी शेती यांत्रिकीकरण आणि कृषि रोबोटिक्स : आव्हाने आणि संधी’ (Farm Mechanization and Agricultural Robotics for Small and Marginal Farmers: Challenges and Opportunities).

परिसंवादामध्ये वेगवेगळ्या पाच सत्रात झालेल्या देशभरातील १५ कृषि विद्यापीठांचे सन्मानीय कुलगुरू आणि वरिष्ठ पातळीवरील शास्त्रज्ञांनी सहभागी होवून मेकेट्रॉनिक्स, कृषि रोबोटिक्स, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI-ML), बिग-डेटा, इंटरनेट ऑफ थिंकिंग (IoT), ऊर्जा कार्यक्षम शेती यंत्रसामग्री, स्मार्ट शेती पद्धती, अचूक शेती व्यवस्थापन तसेच नवीन उर्जेच्या तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सखोल चर्चा केली. तसेच नवीन शास्त्र व तंत्रज्ञान : शासन उपक्रम (महाविस्तार-AI, पोक्रा, स्मार्ट प्रोजेक्ट), शेती यंत्रीकरण : सेन्सर्स IoT व रोबोटिक्स (लहान शेतकऱ्यांसाठी यंत्रसामग्री, स्मार्ट रोबोटिक्स, बीज पेरणी यंत्रणा), कृषि ड्रोन, AI-ML, बिग-डेटा व LLM (ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व अचूक शेती) आणि हरित व पर्यायी ऊर्जा (सौरऊर्जा, बायो-एनर्जी व शाश्वत शेतीसाठी पुनर्नवीन ऊर्जा उपाय) यावर उप विषयासह राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्याबाबत (NIRF) मूल्यांकनाचे निकष, आणि भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR) च्या रँकिंग पद्धतीची आणि एनआयआरएफ पद्धतीची तुलनात्मक मांडणी यावर देखील मंथन करण्यात आले. या चर्चेतून १० शिफारशी देण्यात आल्या आहेत. याचा लाभ लघु व सीमान्त शेतकऱ्यांना होणार आहे.

समारोप कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून पंतनगर येथील जीबीपीयुएटीचे माननीय कुलगुरू व भारतीय कृषि विद्यापीठे संघाचे महासचिव डॉ. एम. एस. चौहान आणि पीडीकेव्ही (अकोला) व एमपीकेव्ही (राहुरी) चे माननीय कुलगुरू डॉ शरद गडाख उपस्थित होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठे संघाचे सचिव श्री. दिनेश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नमूद केले की, हा परिसंवाद राष्ट्रीय पातळीवरील सर्व कृषि विद्यापीठांमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि एकमेकांची कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे आदरातिथ्य, संस्कृती आणि कार्यप्रणाली उत्कृष्ट असल्याबाबत सर्वांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. विशेषतः महाराष्ट्र या बाबतीत भारतात अग्रगण्य असून, त्यास सातत्याने महत्त्व दिले जात आहे. आदरातिथ्याच्या संदर्भात विद्यापीठ “अतिथी देवो भव:” या भावनेतून कार्यरत आहे, तर शेतकऱ्यांच्या सेवेसाठी “शेतकरी देवा भव:” या तत्त्वाचा अवलंब केला जातो. पुढे त्यांनी सांगितले की, शास्त्रज्ञाशिवाय शेती होऊ शकते, परंतु शेतीशिवाय शास्त्रज्ञ नाहीत. या परिसंवादातून निघालेल्या शिफारशी मराठवाड्यातील शेती विकासासाठी विद्यापीठ महत्त्वपूर्ण कार्य करून त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना देईल. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आज संपूर्ण मराठवाड्यासह राष्ट्रीय पातळीवर त्यांना शेतकऱ्यांचे “कुलगुरू” म्हणून ओळखले जाते.

माननीय कुलगुरू व संघाचे महासचिव डॉ. एम. एस. चौहान यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या आदर्श कार्याचे कौतुक करून आभार मानले. विद्यापीठाने मागील तीन वर्षांत केलेले सकारात्मक बदल आणि पायाभूत सुविधांचा दर्जेदार विकास उल्लेखनीय असल्याचे सांगितले. अशा प्रकारचे विकासात्मक उपक्रम आमच्या विद्यापीठातही राबविण्याचा निर्धार आम्ही या ठिकाणी करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या विद्यापीठाने अनेक मानांकने मिळवून आपली स्वतंत्र ओळख राष्ट्रीय पातळीवर निर्माण केली आहे, असेही त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सांस्कृतिक वारसा मोठा असून, सर्व अधिकारी यांच्यामध्ये दिसून येणारा समन्वय व साधेपणा प्रशंसनीय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून कार्य करीत आहे, असे कौतुकही त्यांनी केले. या परिसंवादातून ड्रोन, रोबोटिक्स यांसारख्या विषयांसह यांत्रिकीकरणावरील महत्त्वपूर्ण ज्ञानाचे आदानप्रदान झाले असून, दिलेल्या शिफारशींमुळे शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनीही या परिसंवादात निघालेल्या शिफारसी अत्यंत उपयुक्त असून, त्यांचा प्रत्यक्ष अवलंब विद्यापीठात करण्यासाठी ठोस कृती आराखडा राबविला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच या शिफारसींचा लाभ शेतकरी, विद्यार्थी व संशोधकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी केले तर आभार विद्यापीठे संघाचे सचिव श्री. दिनेश कुमार यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले.











Thursday, September 25, 2025

१७ व्या भारतीय कृषि विद्यापीठ संघाच्या राष्ट्रीय परिसंवादाचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात थाटात उद्घाटन

वातावरणातील बदलांमुळे येणाऱ्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी अशा परिसंवादांची आवश्यकता... माननीय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर

देशातील ८० टक्के सीमांत शेतकऱ्यांसाठी परिसंवादातून शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी देण्यात येणार

माननीय राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि भारतीय कृषि विद्यापीठे संघ (इंडियन अॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज असोसिएशन - IAUA), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील एकूण ७४ कृषि विद्यापीठांच्या समन्वयाने भारतीय कृषि विद्यापीठ संघाचा दोन दिवसीय (दिनांक २५ व २६ सप्टेंबर २०२५) १७ वा राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. या  परिसंवादाचा ‘लघु व सीमान्त शेतकऱ्यांसाठी शेती यांत्रिकीकरण आणि कृषि रोबोटिक्स : आव्हाने आणि संधी’ (Farm Mechanization and Agricultural Robotics for Small and Marginal Farmers: Challenges and Opportunities) हा विषय आहे. या परिसंवादाचा उद्घाटन समारंभ दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाला.

या परिसंवादाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या माननीय राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते.  यावेळी विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्रीमती श्रीजया चव्हाण यांनी आभासी माध्यामाद्वारे शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर पंतनगर येथील जीबीपीयुएटीचे माननीय कुलगुरू व भारतीय कृषि विद्यापीठे संघाचे महासचिव डॉ. एम. एस. चौहान, लोणेरे (जिल्हा रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे, कर्नल येथील एनडीआरआयचे माननीय कुलगुरू डॉ. धीर सिंह, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे शिक्षण विभागाचे माजी उपमहासंचालक डॉ. आर सी अग्रवाल, कृषि परिषदेचे कार्यकारी परिषद सदस्य, श्री. जनार्दन कातकडे, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, नियंत्रक श्री. अनंत कदम, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, विद्यापीठे संघाचे सचिव श्री. दिनेश कुमार,  प्रगतशील शेतकरी श्री चंद्रकांत वरपूडकर, सहयोजक डॉ. राहुल रामटेके, डॉ. सचिन मोरे डॉ. मदन पेंडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटन समारंभात माननीय राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, मी विद्यापीठातील विद्यार्थ्याकडे प्रयोगशील शेतकरी आणि शास्त्रज्ञ म्हणून पाहते. विद्यापीठाचाही हाच उद्देश असावा. त्या म्हणाल्या की, आज संपूर्ण देशात वातावरणातील बदलांचे परिणाम जाणवत आहेत. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी अशा प्रकारच्या परिसंवादांची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शाश्वत शेतीची गरज असून, नाविन्याचा अवलंब करून तंत्रज्ञान द्यावे लागेल. यासोबतच एकात्मिक शेतीस चालना देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. या परिसंवादातून निघालेल्या शिफारशी राज्य आणि केंद्र शासन अवलंबेल. विद्यापीठ कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) आधारित तंत्रज्ञान विकसित करत आहे आणि अनेक शेतकरी त्याचा यशस्वी प्रयोगही करत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थी उद्योजक बनावेत. स्वतः सेंद्रिय शेतकरी असल्याचा उल्लेख करून, विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळण्यासाठी प्रेरित केले. तसेच, येणारे वर्ष २०२६ हे आंतराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष” म्हणून साजरे करण्यासाठी वर्षभराचे नियोजन करण्याचे सूचित केले. त्या म्हणाल्या की, जागतिक स्तरावर भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ शकतो आणि त्यासाठी युवकांमध्ये अपार सामर्थ्य आहे. अन्नसुरक्षा ही आजची महत्त्वाची समस्या असून, कृषिद्वारे तिचे समाधान साधता येते. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, याद्वारे २२ कृषि उत्पादनांवर संशोधन होऊन त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग परभणीत उभारले जातील. कृषि संशोधन आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने सातत्याने प्रोत्साहन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या परिसंवादास देशभरातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ उपस्थित आहेत. त्यांच्या ज्ञानाचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी नक्कीच होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, माननीय राज्यपाल महोदय, महाराष्ट्राचे कृषिमंत्री तसेच कृषि राज्यमंत्री यांनी शुभेच्छा पाठवल्या आहेत. तसेच, माननीय राज्यमंत्री ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सूचनांचा अवलंब करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हे कृषि विकासाच्या दृष्टीने देशात अग्रगण्य असून, देशातील पहिले महाविस्तार ॲप विकसित करण्यासाठी ५०० कोटी रुपये आणि विद्यापीठात हवामान संशोधनासाठी एक कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निधी दिला आहे. याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. विद्यापीठाने विकसित केलेल्यागोदावरी’ तुरीच्या वाणाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, अशा वाणांबरोबरच हवामान- अनुकूल तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांना सक्षम केले जाणार आहे. तसेच, एकात्मिक शेतीसाठी कृषि, फळबाग आणि पशुसंवर्धन यांचे यात्रिसूत्री अवलंबन गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेती विकासासाठी सात महत्त्वपूर्ण साधनांची आवश्यकता असून, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे मनुष्यबळ आहे. या दृष्टीने अधिक कार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आपल्याला कृषिप्रधान देशातून शेतकरीप्रधान देशाकडे वाटचाल करायची आहे. त्यासाठी विद्यापीठ ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेतून कार्यरत आहे. शेतकरी देखील शास्त्रज्ञच आहेत, त्यांच्या ज्ञानाचा संशोधनासाठी उपयोग करून घेणे आवश्यक आहे. याबरोबरच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शैक्षणिक प्रणाली, उद्योजकता आणि शासन यांचा समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्योजकतेला चालना देण्यासाठी विद्यापीठाची बायोमिक्स आणि बायो-फर्टीलायझर सारखी उत्पादने महत्त्वाची ठरणार आहेत. ही उत्पादने शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय असून, फक्त जुलै २०२५ महिन्यातच सुमारे २ कोटी १० लाख रुपयांची विक्री झाल्याचे त्यांनी नमूद केले.

माजी उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. आर. सी. अग्रवाल यांनी शाश्वत शेतीसाठी केवळ शेतीपुरते नव्हे तर मानव संसाधन विकासालाही तितकाच प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. २०४७ मध्ये विकसित भारत घडवायचा असल्यास त्यासाठीचा ब्ल्यू प्रिंट महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये मानव संसाधनाची अनन्यसाधारण भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी नाहेप प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणावर कार्य करण्यात आले असून, त्यातून भविष्यात सक्षम शास्त्रज्ञ घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पाचे कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून प्रोत्साहन द्यावे, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. लोकसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नैसर्गिक साधनसंपत्तीवर प्रचंड दबाव येत आहे. वाढत्या लोकसंख्येला धान्यपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अचूक शेती (Precision Farming) अवलंबावी लागेल. यासाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषद आणि देशातील सर्व कृषि विद्यापीठे सातत्याने नाविन्यपूर्ण संशोधन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

माननीय कुलगुरू तथा संघाचे महासचिव डॉ. एम. एस. चौहान यांनी सांगितले की शेती उद्योगातील सध्याच्या समस्या आणि अडचणींवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. यासाठी भारतीय कृषि विद्यापीठे संघाकडून परिसंवाद, कुलगुरू परिषदा आणि बैठका आयोजित करून शासनास शिफारशी दिल्या जातात. त्यांनी पुढे नमूद केले की, देशातील ८० टक्के शेतकरी हे सीमांत शेतकरी असून त्यांची स्थिती पूर्वी जशी होती तशीच आजही आहे. आपण अन्नधान्य उत्पादनात उच्चांकी आहोत, मात्र शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे अत्यावश्यक आहे. या परिसंवादातून शासनाच्या नियोजन प्रक्रियेत अवलंबण्यासाठी तीन-चार महत्त्वपूर्ण शिफारशी दिल्या जातील, ज्यातून शेतकऱ्यांची उन्नती साधली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनीही शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञानाच्या विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शेती उत्पादनात कृत्रिम (संकरित वाणांद्वारे) वाढीपेक्षा उत्पादनातील पोषणमूल्यांना प्राधान्य द्यावे, तसेच पारंपरिक अन्नधान्यातील घटक जपले जावेत. यासाठी सर्वांनी संशोधनाची दिशा धरावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

एनडीआरआयचे माननीय कुलगुरू डॉ. धीर सिंह यांनी सांगितले की कृषि विद्यापीठाने केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनामुळे देशात कृषि क्रांती घडली. दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ज्वारीचा परभणी शक्ती, तुरीचा गोदावरी वाण आणि बायोमिक्ससारखी दर्जेदार उत्पादने हीच विद्यापीठाची खरी देशपातळीवरील ओळख असून, यामुळे विद्यापीठाला अनेक मानांकनांसह ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. भविष्यात या उत्पादनांसाठी मोठी विक्री केंद्रे विद्यापीठात आणि शहरात उभारली जावीत, ज्यायोगे विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह मराठवाड्यात उद्योजकतेला चालना मिळेल. अशा कार्यातून हे विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावर क्रमांक एकचे बनेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शाश्वत शेतीसाठी यांत्रिकीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच ‘विकसित कृषि संकल्प’ अभियानातून उभारण्यात आलेल्या कार्याचा आढावा घेतला. देशात अन्नधान्य मुबलक असूनही भूकबळी समस्या जाणवते. दर्जेदार कृषि उत्पादने उत्पादन आणि पुरवठ्यासाठी या परिसंवादात महत्त्वपूर्ण चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले.

प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रकांत दादा वरपूडकर यांनी देशभरातील अनेक कृषि विद्यापीठांचा २५ वर्षांचा अनुभव सांगून, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाद्वारे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सहकार्याबद्दल माहिती दिली. तसेच, सध्या मजूर टंचाई आणि वातावरणातील बदल यांचा शेतीवर मोठा परिणाम होत असला तरी फळबागेवर तो तुलनेने कमी जाणवतो. म्हणूनच शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

उद्घाटन समारंभास देशभरातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

प्रास्ताविकात परिसंवादाचे आयोजक व विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी परिसंवादाच्या आयोजनाची माहिती दिली तसेच विद्यापीठाच्या कार्याचा आढावा मांडला.

आभार प्रदर्शन विद्यापीठे संघाचे सचिव श्री. दिनेश कुमार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले. कार्यक्रमात विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.











माजी उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. आर. सी. अग्रवाल 
माननीय कुलगुरू तथा संघाचे महासचिव डॉ. एम. एस. चौहान
माननीय कुलगुरू डॉ. धीर सिंह 

माननीय कुलगुरू डॉ. कारभारी काळे


प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रकांत दादा वरपूडकर 
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार 

विद्यापीठे संघाचे सचिव श्री. दिनेश कुमार