Tuesday, September 23, 2025

१७ व्या भारतीय कृषि विद्यापीठ संघाच्या राष्ट्रीय परिसंवादाचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रभावशाली नेतृत्वामुळे वनामकृविस मिळाला बहुमान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि भारतीय कृषि विद्यापीठे संघ (इंडियन अॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज असोसिएशन - IAUA), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील एकूण ७४ कृषि विद्यापीठांच्या समन्वयाने भारतीय कृषि विद्यापीठ संघाचा दोन दिवसीय (दिनांक २५ व २६ सप्टेंबर २०२५) १७ वा राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या  परिसंवादाचा ‘लघु व सीमान्त शेतकऱ्यांसाठी शेती यांत्रिकीकरण आणि कृषी रोबोटिक्स : आव्हाने आणि संधी’ (Farm Mechanization and Agricultural Robotics for Small and Marginal Farmers: Challenges and Opportunities) हा विषय आहे. या परिसंवादाचा उद्घाटन समारंभ गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी सभागृहात होणार आहे.

या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषिमंत्री तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय प्रति कुलपती ना. श्री. दत्तात्रय भरणे हे भुषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून माननीय राज्यमंत्री वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री मा. ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल आणि माननीय राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे स्वागतपर भाषण करणार आहेत.

उद्घाटन समारंभाला राज्यसभा सदस्य मा. खा. श्रीमती फौजिया खान, लोकसभा सदस्य मा. खा. श्री. संजय जाधव, विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. सतीश चव्हाण, विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. विक्रम काळे, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, विधानसभा सदस्य मा. आ. श्री. रत्नाकर गुट्टे, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. रमेश कराड, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. अभिमन्यू पवार, विधानसभा सदस्य मा. आ. श्री. राजेश विटेकर, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्रीमती श्रीजया चव्हाण, पुणे येथील कृषि परिषदेचे माननीय उपाध्यक्ष श्री. तुषार पवार, पंतनगर येथील जीबीपीयुएटीचे माननीय कुलगुरू व भारतीय कृषि विद्यापीठे संघाचे महासचिव डॉ. एम. एस. चौहान, कृषि परिषदेच्या महासंचालिका श्रीमती वर्षा लड्डा-उंटवाल (भा. प्र. से.), यांच्यासह देशभरातील सर्व कृषि विद्यापीठांचे सन्मानीय कुलगुरू आणि कृषि परिषदेचे कार्यकारी परिषद सदस्य श्री. विवेक दामले, श्री. जनार्दन कातकडे, श्री. प्रविण देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य मा. डॉ. व्ही. एम. मायंदे, मा. श्री. दिलीप देशमुख, मा. श्री. भागवत देवसरकर, मा. डॉ. आदिती सारडा, मा. श्री. सुरज जगताप, मा. श्री. विठ्ठल सकपाळ, मा. डॉ. कौशिक बॅनर्जी, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. अनंत कदम, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, विद्यापीठे संघाचे सचिव श्री. दिनेश कुमार आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

आजवर भारतीय कृषि विद्यापीठे संघातर्फे (IAUA) ४८ कुलगुरू अधिवेशने, १६ राष्ट्रीय परिसंवाद, १४ मंथन सत्रे व ९ प्रादेशिक बैठका देश भरातील विविध कृषि विद्यापीठात आयोजित करण्यात आल्या आहेत. १७ वा राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्याचा बहुमान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रभावशाली नेतृत्वामुळे मिळाला आहे.

परिसंवादात देशभरातील सर्व कृषि विद्यापीठांचे सन्मानीय कुलगुरू सहभागी होणार असून मेकेट्रॉनिक्स, कृषि रोबोटिक्स, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI-ML), बिग-डेटा, इंटरनेट ऑफ थिंकिंग (IoT), ऊर्जा कार्यक्षम शेती यंत्रसामग्री, स्मार्ट शेती पद्धती, अचूक शेती व्यवस्थापन तसेच नवीन उर्जेच्या तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सखोल चर्चा होईल.

भारतीय शेतीसमोरील हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांची कमतरता, मजुरांची टंचाई आणि शेतकऱ्यांचे घटते उत्पन्न या गंभीर समस्यांचा सामना करण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी स्वस्त व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपलब्ध करून देत त्यांचे उत्पन्न व उत्पादनक्षमता वाढवणे हा या परिसंवादाचा मुख्य उद्देश आहे.

या परिसंवादात नवीन शास्त्र व तंत्रज्ञान : शासन उपक्रम (महाविस्तार-AI, पोक्रा, स्मार्ट प्रोजेक्ट),
शेती यंत्रीकरण : सेन्सर्स IoT व रोबोटिक्स (लहान शेतकऱ्यांसाठी यंत्रसामग्री, स्मार्ट रोबोटिक्स, बीज पेरणी यंत्रणा), कृषि ड्रोन, AI-ML, बिग-डेटा व LLM (ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व अचूक शेती) आणि हरित व पर्यायी ऊर्जा (सौरऊर्जा, बायो-एनर्जी व शाश्वत शेतीसाठी पुनर्नवीन ऊर्जा उपाय) यावर विषयावर देखील चर्चा करण्यात येणार आहे.

या परिसंवादातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचे लाभ मिळवून देत, खर्चात बचत व उत्पादनात वाढ करण्यासाठी व्यवहार्य उपाय सुचवले जाणार आहेत. देशभरातील कृषि विद्यापीठांचे अधिकारी, तज्ज्ञ व संशोधकांच्या सहभागामुळे हा राष्ट्रीय परिसंवाद मोठ्या उत्साहात पार पडणार आहे, असे परिसंवादाचे आयोजक विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विद्यापीठे संघाचे सचिव श्री. दिनेश कुमार यांनी कळविले आहे.

भारतीय कृषि विद्यापीठ संघ (IAUA) संक्षिप्त माहिती

नवी दिल्लीस्थित भारतीय कृषि विद्यापीठ संघ (IAUA) या संघटनेची स्थापना १० नोव्हेंबर १९६७ रोजी झाली होती. संघटनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कृषि संशोधन, शिक्षण व विस्तार कार्याचा प्रसार करून ग्रामीण विकासाला चालना देणे हे आहे.

सध्या भारतीय कृषि विद्यापीठ संघामध्ये देशातील एकूण ७४ कृषि विद्यापीठांचा समावेश असून त्यामध्ये ६६ राज्य कृषि विद्यापीठे, ४ मानद विद्यापीठे (भा कृ अ. संस्था- नवी दिल्ली, आय व्ही आर आय - इझतनगर, एनडीआरआय - कर्नाल व सीआयएफइ - मुंबई), ३ केंद्रीय कृषि विद्यापीठे (सीएयू - इंफाळ, आरपीसीएयू - पूसा व आर एलबीसीएयू - झाशी) तसेच एक केंद्रीय विद्यापीठ कृषि शाखेसह, (बीएचयू वाराणसी) यांचा समावेश आहे.

विशेष शाखेनुसार ४६ कृषि, ७ उद्यानविद्या, १७ पशुवैद्यक व प्राणिशास्त्र तसेच ४ मत्स्य विज्ञान विद्यापीठे भारतीय कृषि विद्यापीठ संघामध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सर्व कृषि विद्यापीठांमध्ये शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण यांचा एकात्मिक कार्यक्रम राबविला जातो.

भारतीय कृषि विद्यापीठ संघा मार्फत शेतकरी व ग्रामीण विकासासाठी परिषद, परिसंवाद, कार्यशाळा व व्याख्याने आयोजित केली आणि त्याद्वारे कृषि संशोधन व शिक्षणाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा घडवून आणली आहे.