राज्याचे मुख्यमंत्री माननीय ना. श्री.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व महाराष्ट्र कृषि
शिक्षण संशोधन परिषद, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने
राज्यातील चारही कृषि विद्यापीठाची ५३ व्या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास
समिती-२०२५ चे आयोजन २९ ते ३१ मे, २०२५ दरम्यान वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे करण्यात आले आहे. या
बैठकीचे तसेच केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास
मंत्रालयाच्या वतीने केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना.श्री. शिवराजसिंह
चौहान यांचे दूरदृष्टी नेतृत्वात दि. २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान देशभरात “विकसित
कृषि संकल्प अभियान” राबविण्यात येत आहे, त्याचे उद्घाटन दिनांक २९ मे रोजी महाराष्ट्र राज्याचे
मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. अॅड. माणिकरावजी कोकाटे होते तर
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे
स्वागताध्यक्ष होते.
कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी
पुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व
बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघनाताई साकोरे-बोर्डीकर,
कृषि, वित्त, नियोजन,
मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री मा.ना. अॅड.
आशिष जयस्वाल यांची सन्मानीय प्रमुख उपस्थिती होती. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय
ना. श्री हसन मुश्रीफ हे ऑनलाईन सहभागी होते .
यावेळी लोकसभा सदस्य मा. खा.
श्री. संजय जाधव,
विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. सतीश
चव्हाण, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. डॉ.
राहुल पाटील, विधानसभा सदस्य मा. आ. श्री रत्नाकर गुट्टे,
विधानसभा सदस्य मा. आ. श्री राजेश विटेकर, विद्यापीठ
कार्यकारी परिषद सन्मानीय सदस्य मा. श्री. प्रविण देशमुख, मा.डॉ.
आदिती सारडा, मा. श्री. भागवत देवसरकर, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा. श्री. विकासचंद्र रस्तोगी
(भाप्रसे), पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक मा. श्री.
रावसाहेब भागडे (भाप्रसे), कृषि आयुक्त मा. श्री. सुरज
मांढरे (भाप्रसे), पोकराचे प्रकल्प संचालक श्री. परिमल सिंह,
पिडीकेव्ही अकोला आणि एमपीकेव्ही राहुरीचे कुलगुरू मा. डॉ शरद गडाख, बीएसकेकेव्ही दापोलीचे कुलगुरू
मा. डॉ, संजय भावे, परभणीचे
जिल्हाधिकारी श्री. रघुनाथ गावडे (भाप्रसे), पोलीस अधीक्षक श्री
रवींद्रसिंह परदेशी (भापोसे), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी श्रीमती नतिशा माथुर, मनपा आयुक्त श्री धैर्यशील जाधव, पुणे येथील अटारीचे
श्री तुषार अत्रे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ अजय चंदनवाले, कृषि
परिषदेचे सदस्य श्री विवेक दामले आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन समारंभात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या
"विकसित भारत" या दूरदृष्टीय संकल्पनेला पूरक ठरणारे "विकसित
कृषी संकल्प अभियान" आज राज्यात मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले. या
अभियानाचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्र फडणवीस
यांनी याला कृषी क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास
व्यक्त केला.
या अभियानाद्वारे कृषी शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन थेट
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाणार असून, शास्त्रज्ञ आणि विस्तार यंत्रणा
थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत काम करतील. शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष प्रश्न सोडवण्यावर
भर दिला जाणार आहे. या अभियानामुळे कृषी क्षेत्रातील सर्व संबंधित यंत्रणा एकत्र
येऊन समन्वयाने काम करतील आणि महाराष्ट्र यात आघाडीवर राहील, असे त्यांनी सांगितले.
शेतीतील सध्याच्या आव्हानांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले
की, जमीनधारणा कमी होत चालल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे,
ज्यामुळे उत्पादनखर्च आणि गुंतवणुकीवर मर्यादा येत आहेत. यासोबतच वातावरणातील
बदलांमुळे पर्जन्यमानात अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे पिकांवर ताण येतो,
किडी-रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी किड
व रोग प्रतिकारक तसेच ताण सहन करणारे आणि हवामान अनुकूल वाण सातत्याने विकसित केले
जात असल्याचे त्यांनी नमूद केले. संरक्षित, संवर्धित याबरोबरच शाश्वत शेतीसाठी तांत्रिक
उपायांचा अवलंब करणे अत्यावश्यक असून, रुंद सरी वरंबा पद्धत,
मूलस्थानी जलसंधारण तंत्रे आणि आधुनिक अवजारांचा प्रसार आवश्यक आहे.
शासन श्रमबचतीचे उपाय आणि यंत्रबळ उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रगतशील शेतकऱ्यांचे स्थान महत्त्वाचे असल्याचे सांगताना, कापूस
उत्पादक श्री. दादा लाड यांच्या तंत्रज्ञानाचा विशेष उल्लेख करण्यात आला. तसेच
महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी विद्यापीठाने किमान दहा शेतकऱ्यांना ‘कृषी
शास्त्रज्ञ’ या मानद पदवीने सन्मानित करावे, असे सूचक
आवाहनही त्यांनी केले.
याशिवाय, "ॲग्रीस्टॅक" द्वारे शेतकऱ्यांची
माहिती संकलित करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सहाय्याने
त्यांना वैयक्तिक तंत्रज्ञान सल्ला देता येणार आहे. विद्यापीठांनी AI आधारित शेती तंत्रज्ञान मॉडेल विकसित करावीत, यासाठी
शासन पुरेसा निधी उपलब्ध करून देत आहे. ड्रोन वापरास प्रोत्साहन तसेच अवजार बँक
निर्मितीस चालना दिली जात आहे.
महाराष्ट्र शासनाने नुकतेच विकसित केलेले ‘महाविस्तार
एआय’ हे ॲप शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र ठरणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना संदर्भासहित
व्हिडीओ आणि लिखित माहिती देतो, तसेच मराठीमध्ये चॅटबॉटची मदत
मिळत आहे, त्याचा व्यापक वापर व्हावा
यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.
पोकरा टप्पा २ अंतर्गत रु. ४००० कोटींची तरतूद करून साडेसात
हजार गावांचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. केंद्र शासनाकडून देखील कृषी
क्षेत्रात भरीव गुंतवणूक जाहीर झाली आहे. शेवटी त्यांनी आशा व्यक्त केली की, या बैठकीतूननवे
संशोधन आणि नवकल्पना पुढे येतील आणि शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न यामध्ये
निश्चितच वाढ होईल.
राज्याचे कृषी मंत्री कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना.
अॅड. माणिकराव कोकाटे यांनी कृषी क्षेत्रातील विविध आव्हानांवर भाष्य करताना
सांगितले की,
शेतीसमोरील समस्यांवर मात करण्यासाठी कृषी विभाग विविध उपक्रम राबवत
आहे. या सर्व उपक्रमांमध्ये मुख्यमंत्री नामदार श्री. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत
संवेदनशीलतेने सहभागी होत असून, शेतीच्या सर्वांगीण
विकासासाठी उपाय सुचवत आहेत.
मा. ना. अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे
माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीतून राज्यात चार कृषी
विद्यापीठांची स्थापना झाली आणि ही विद्यापीठे शेतकऱ्यांसाठी नवे तंत्रज्ञान व सुधारित
वाण उपलब्ध करून देणारी महत्त्वाची दालने ठरली आहेत. विद्यापीठांद्वारे मोठ्या
प्रमाणावर संशोधन घडून आले असून, अनेक प्रगतशील शेतकरी देखील
विविध क्षेत्रांमध्ये नवनवीन प्रयोग करून पुढे येत आहेत. अशा शेतकऱ्यांचे कौतुकही
त्यांनी केले. केंद्रीय कृषी मंत्री ना. मा. श्री. शिवराज सिंह चौहान यांच्या
नेतृत्वाखाली भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे अधिकारी सध्या महाराष्ट्रात विशेष
कार्यक्रम राबवत असून, याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त
केले. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर
कोरडवाहू क्षेत्र आहे. त्यामुळे अशा भागांसाठी शाश्वत उत्पादन देणारे व कोरडवाहू
परिस्थितीला तोंड देणारे वाण विकसित करणे अत्यावश्यक आहे. विद्यापीठ या दिशेने काम
करत असून शासन त्यासाठी सर्वतोपरी मदत करेल. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘परभणी शक्ती’ या देशातील पहिल्या जैव संपृक्त
ज्वारी वाणाचे तसेच बाजारासाठी विकसित केलेल्या दोन नव्या वाणांचे त्यांनी कौतुक
केले. उत्पादन वाढीसोबतच उत्पादन खर्च कमी करण्यावर भर द्यावा लागेल. सेंद्रिय
शेतीस चालना देऊन विषमुक्त व आरोग्यदायी अन्नधान्य निर्माण करणे काळाची गरज आहे,
असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी
शास्त्रज्ञांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले पाहिजे, त्यांच्या
तंत्रज्ञानाला चालना देऊन सुधारित उपाय प्रस्थापित करावेत. हवामान अनुकूल
तंत्रज्ञान विकसित करणे व प्रसार करणे आवश्यक आहे. राज्य सरकार शेतीमध्ये मोठ्या
प्रमाणात भांडवली गुंतवणूक करत असून, शेतकऱ्यांना स्वावलंबी
बनवण्यास कटिबद्ध आहे. महाराष्ट्र देशात शेती विकासात अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्याचे कृषि राज्यमंत्री ना. मा. अॅड. आशिष जयस्वाल म्हणाले की,
कृषी क्षेत्रात योग्य दिशा आणि पद्धती अवलंबल्यास अपेक्षित वेगाने प्रगती शक्य
आहे. शेतीतील विद्यमान आव्हाने पेलण्यासाठी या बैठकीतील तांत्रिक शिफारसी अत्यंत
उपयुक्त ठरतील. विकसित कृषी संकल्प अभियान या राष्ट्रव्यापी अभियानामुळे
आतापर्यंतचे आधुनिक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे शेतीतील
उत्पादनक्षमता वाढवण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. यावेळी
त्यांनी शेतीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर अपरिहार्य असल्याचे सांगितले. “AI चा
समावेश केल्यास निर्णयप्रक्रिया अधिक अचूक व वेगवान होईल. त्यामुळे उत्पादकता
वाढवणे आणि शाश्वत शेतीसाठी नवे मार्ग खुलणे शक्य होईल,” असे
ते म्हणाले. या बैठकीत मुख्यमंत्री ना. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली
कृषी क्षेत्रात राज्याने मोठी प्रगती साधेल, असा ठाम
विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा. श्री. विकासचंद्र
रस्तोगी (भाप्रसे) यांनी स्पष्ट केले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या
सर्वांगीण विकासासाठी कृषी संशोधनाला विशेष महत्त्व आहे. याच संदर्भात माननीय
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कृषी
संशोधनासंदर्भातील संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे. त्यांनी सांगितले की, केवळ विद्यापीठांकडून होणारे संशोधन नव्हे तर प्रगतशील शेतकऱ्यांनी विकसित
केलेली तंत्रज्ञानदेखील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. बायोटिक आणि अबायोटिक ताण सहन
करणाऱ्या नवीन वाणांच्या विकासासाठी दापोली कृषी विद्यापीठात विशेष प्रकल्प सुरू
करण्यात आले आहेत. तसेच, पिकांवरील नुकसानीचे अचूक मूल्यांकन
ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने करून उपाययोजना आणि नुकसानभरपाईचे निर्धारण
करण्यासाठी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला प्रकल्प देण्यात आला
आहे. त्यांनी असेही नमूद केले की, विद्यापीठांना दिल्या
जाणाऱ्या निधीचा योग्य उपयोग होऊन त्यातून ठोस निष्पत्ती मिळणे आवश्यक आहे. शेतीमध्ये
आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स यांचा प्रभावी वापर वाढवण्याची गरज त्यांनी
अधोरेखित केली. कृषी विकासाच्या दिशेने खाजगी क्षेत्र व खाजगी विद्यापीठांचीही साथ
आवश्यक असून, एकत्रित प्रयत्नांनीच शाश्वत कृषी विकास साधता
येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रास्तावनेत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
उपस्थित मान्यवरांचे आणि प्रगतशील शेतकऱ्यांचे मन:पूर्वक स्वागत करत आपल्या भावना
व्यक्त केल्या. यावेळी बोलताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, या
बैठकीत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले नवे वाण, अवजारे आणि तंत्रज्ञान शिफारशी मंजूर करून शेतकऱ्यांच्या सेवेत आणले जाणार
आहेत. देशभरात एकमेव अशी संयुक्त निर्णय प्रणाली महाराष्ट्रात राबवली जात असल्याचा
त्यांनी अभिमान व्यक्त केला. यावेळी त्यांनी कृषी संकल्प अभियानाची माहिती दिली.
याबरोबरच स्पष्ट केले की, १९५०-५१ च्या तुलनेत आज अन्नधान्य
उत्पादनात सहापटीने वाढ झाली आहे. हरित क्रांतीपासून सुरू झालेला शेती विकास आता
‘इंद्रधनुष्य क्रांती’च्या रूपात विविध क्षेत्रांत विस्तारलेला आहे. महाराष्ट्राने
यामध्ये आघाडी घेतली असून, राष्ट्रीय पातळीवर
महाराष्ट्राच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठे आपल्या-आपल्या विभागांतील शेतकऱ्यांच्या
अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असून, संशोधन आणि नवनवीन
तंत्रज्ञानाद्वारे शेतीला दिशा देत आहेत, असे माननीय कुलगुरूंनी
नमूद केले. शेवटी, विद्यापीठांच्या प्रगतीसाठी आवश्यक
असलेल्या संसाधनांची आणि सुविधांची मागणी त्यांनी यावेळी मांडली.
कार्यक्रमादरम्यान बैठकीच्या स्मरणिकेचे आणि शास्त्रज्ञांनी
दिलेल्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले तसेच कापसाच्या एनएच
१९०१ बीटी, एन एच १९०२ बीटी व एनएच १९०४ बीटी या तीन वाणाचे लोकार्पण केले. तसेच परभणी
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सेलू येथील १३२ के. व्ही. उपकेंद्राचे ई
उद्घाटन मुख्यमंत्री मा.ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान परभणी येथील डॉ. मदन पेंडके, राहुरी येथील डॉ. सुनील
कदम, दापोली येथील डॉ. विजय दळवी आणि अकोला येथील डॉ. संतोष गहूकर या
शास्त्रज्ञांना विद्यापीठ आणि शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल “उत्कृष्ट शास्त्रज्ञ २०२५” या
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आभार संशोधन संचालक डॉ.
खिजर बेग यांनी मानले. कार्यक्रमात चारही कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक, शिक्षण
संचालक, विस्तार शिक्षण संचालक, वनामकृविचे कुलसचिव, नियंत्रक, विद्यापीठ अभियंता, सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख यांच्यासह तीनशेहून अधिक शास्त्रज्ञ उपस्थित होते. यावेळी विद्यापीठ तंत्रज्ञान व उपक्रमावर आधारित
प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विना भालेराव आणि
डॉ दयानंद मोरे यांनी केले.
