माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 'व्हॉइस चान्सलर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना "उत्कृष्ट नेतृत्वासाठी वर्षातील कुलगुरू पुरस्कार" (Vice Chancellor of the Year for Exceptional Leadership Award) या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना १५ मे रोजी पुणे येथे झालेल्या ‘८ व्या हायर एज्युकेशन इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी समिट अँड अवॉर्ड्स २०२५’ या राष्ट्रीय परिषदेच्या दरम्यान प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम प्लस नाइनवन मिडिया या शिक्षण क्षेत्रात नवोन्मेष व गुणवत्ता वाढविणाऱ्या प्रतिष्ठित संस्थेमार्फत आयोजित करण्यात आला होता.
सदर पुरस्कार प्लस नाइनवन
मिडियाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप गुलाटी व सह-संस्थापक
श्री. आशुतोष दुबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या कृषि शिक्षणातील दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व संस्थात्मक
विकासातील योगदानाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
या राष्ट्रीय शिखर
संमेलनात देशभरातील विविध विद्यापीठांचे कुलगुरु, अध्यक्ष, संचालक, अधिष्ठाता व प्राचार्य यांनी सहभाग नोंदवला
होता. या मंचावर उच्च शिक्षणातील आव्हाने, संधी, आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणारे बदल यावर विविध परिसंवाद आणि
सादरीकरण झाले.
माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांना या समारंभात प्रमुख पाहुणे व सन्मानार्थी पुरस्कार विजेते
म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी “उच्च शिक्षणाचा नवविचार: नवप्रवर्तन, उद्योगसमन्वय
आणि डिजिटल रूपांतरणाच्या माध्यमातून भविष्यकालीन विद्यापीठांची उभारणी” या विषयावर
झालेल्या उच्चस्तरीय परिसंवादात सहभाग घेतला. या वेळी त्यांनी डिजिटल अॅग्रीकल्चर,
शैक्षणिक-उद्योग-शासन (AIG) सहकार्य व कृषि
विद्यापीठांमध्ये तंत्रज्ञान-आधारित बदलांबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले. सक्षम देश
उभारणीसाठी अन्नसुरक्षेचे महत्व त्यांनी विशद केले. शेतकरी हा अन्नदाता म्हणून अन्न
निर्मितीसाठी महत्वाची भूमिका बजावतो. शेतकऱ्याला आधुनिक ज्ञानाची गरज आहे, म्हणून
“शेतकरी देवो भव:” या भावनेतून विद्यापीठ कार्य
करून नियमीत त्यांचे ज्ञान वाढवत आहे. तसेच, त्यांनी वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संशोधन, विस्तार आणि शिक्षणातील विविध
उपक्रमांची माहितीही दिली.
या संवादाचे संचालन पुणे
येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाचे माननीय कुलगुरु डॉ. सायली गणकर यांनी केले. पॅनेलिस्टमध्ये
राष्ट्रीय पातळीवरील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील आघाडीचे शैक्षणिक तज्ञ एकत्र
आले. या परिषदेत भारतातील उच्च शिक्षणाच्या भविष्यासाठी नवकल्पना, रोजगारक्षमता
आणि डिजिटल परिवर्तन हे प्रमुख अंग म्हणून ओळखले गेले.
परिषदेच्या महत्त्वाच्या
सत्रांमध्ये “उच्च शिक्षण प्रवेशांसाठी प्रमाणित मूल्यमापन : देशांतर्गत आणि
आंतरराष्ट्रीय प्रवेशांसाठी संधी व आव्हाने” या विषयावर राउंड टेबल चर्चा झाली.
तसेच, विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठीच्या तयारीसंबंधी प्लेसमेंट सेल आणि परीक्षा
प्रणालीतील सुधारणा यावरही सखोल चर्चा करण्यात आली. या परिषदेत शिक्षण क्षेत्रात
येणाऱ्या तंत्रज्ञानावरही सादरीकरण करण्यात आले, ज्यामुळे भविष्यात
शिक्षण अधिक प्रभावी आणि सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त केला
गेला. या सत्रांनी भविष्यातील विद्यापीठांना अधिक सक्षम आणि उद्योगसज्ज
बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटा दाखवल्या आहेत.
या कार्यक्रमात माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना मिळालेला हा सन्मान, वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेस, संशोधनातील
नवोन्मेषास आणि डिजिटल विस्तारास मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील थेट मान्यता आहे.
हा पुरस्कार विद्यापीठाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला आहे. भविष्यातील
सक्षम, विज्ञानाधिष्ठित व व्यावसायिक कृषि नेतृत्व
घडविण्याच्या विद्यापीठाच्या ध्येयदृष्टीला यामुळे नवे बळ मिळाले आहे. या यशस्वी
सन्मानामुळे संपूर्ण विद्यापीठात नवीन ऊर्जा, उत्साह आणि
प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले आहे. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे
विद्यापीठाच्या समस्त कुटुंबाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे!