सर्वांनी आपली ऊर्जा सकारात्मक आणि बांधिलकीने वापरून संघभावनेतून काम करावे... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि
जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य क्रीडा
प्रांगणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण
करण्यात आले.
कार्यक्रमानिमित्त बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महाराष्ट्र
दिन व कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात त्यांनी
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाचे महत्त्व विशद केले. १ मे १९६० रोजी
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि
सामाजिक परंपरा अत्यंत समृद्ध असून, देशाच्या स्वातंत्र्य
लढ्यात व विविध विकास प्रक्रियांत राज्याने मोलाची भूमिका बजावली आहे, असे ते म्हणाले.
माननीय कुलगुरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचा
गौरव करताना त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या अनेक थोर देशभक्तांचे स्मरण केले.
त्यांनी वासुदेव बळवंत फडके, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक,
स्वातंत्रवीर सावरकर, राजगुरु अशा
महापुरुषांच्या संघर्षाची आठवण करून दिली.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र संतपरंपरेचा अभिमान बाळगतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, समर्थ
रामदास, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी
महाराज आदी संतांनी समाज प्रबोधनाचे महान कार्य केले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले,
सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे
यांसारख्या समाजसुधारकांनी समाजात शिक्षण व समतेचा संदेश दिला.
महाराष्ट्राने विविध क्षेत्रांमध्ये – साहित्य, कला, संगीत, विज्ञान, शेती, शिक्षण व उद्योगात प्रगती साधली असून, आपण या
गौरवशाली परंपरेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला पाहिजे, असे
आवाहन माननीय कुलगुरूंनी केले.
पुढे त्यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण, विस्तार, प्रशासकीय आणि आर्थिक विभागांमध्ये समन्वय
साधून गेल्या अडीच वर्षांपासून विकासात्मक कार्याला गती मिळाली आहे. या काळात
विद्यापीठाने अनेक बाबतीत स्वयंपूर्णता साधली असून, बीजोत्पादन,
पिकांचे वाण विकास, प्रभावी विस्तार कार्य आणि
शैक्षणिक प्रगती यामुळे पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र
आणि राष्ट्रीय पातळीवरही विद्यापीठाचे कौतुक होत आहे. या यशाचे श्रेय
विद्यापीठातील सर्व अधिकाऱ्यांचे एकजूटीनं आणि समर्पितपणे केलेल्या कार्याला जाते.
याबद्दल माननीय कुलगुरूंनी सर्वांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
आगामी काळात आणखी जोमाने कार्य करण्याची गरज असल्याचे सांगत, सर्वांनी आपली ऊर्जा सकारात्मक आणि बांधिलकीने वापरून संघभावनेतून काम
करावे, असे आवाहन करण्यात आले.
विद्यापीठ “शेतकरी देवो भव:” या तत्त्वज्ञानातून कार्य करत असून, शेतकरी केंद्रित
विस्तार सेवा, कर्मचारी केंद्र प्रशासन, विद्यार्थी केंद्र शिक्षण आणि नावीन्यपूर्ण संशोधन या चार स्तंभांवर
विद्यापीठाचा पाया भक्कमपणे उभारला जात आहे. शेवटी त्यांनी नमूद केले की, महाराष्ट्रात शेती हा मुख्य व्यवसाय असून, आपण
सर्वजण कृषी व शेतकरी कल्याणासाठी कार्य करीत आहोत, हे आपले
भाग्य आहे. विद्यापीठ मराठवाड्याच्या कृषी विकासात मोलाची भूमिका बजावत आहे.
कार्यक्रमात विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश आहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदींसह विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, आणि विद्यार्थी यांची बहुसंखेने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्री उदय वाईकर यांनी केले.