सर्वांनी स्वयंस्फूर्ततेने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करावे... माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र विभाग व
क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत आयोजित “शेतकरी – शास्त्रज्ञ कृषि संवाद” या ऑनलाईन
कार्यक्रमाचा ४४ वा भाग दिनांक २ मे रोजी यशस्वीपणे पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी भूषविले, तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सध्या सुरू असलेल्या उन्हाळी
हंगामात अचानक हवामान बदलाची शक्यता लक्षात घेऊन, शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या ग्रामीण
कृषि मौसम सेवा या योजनेच्या अंदाजावर आधारित शेती व्यवस्थापन करावे, असे सुचविले. तसेच, कार्यक्रमाच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल
आयोजक, मार्गदर्शक शास्त्रज्ञ आणि सहभागी शेतकऱ्यांचे
अभिनंदन करत सर्वांनी स्वयंस्फूर्ततेने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी मृदा विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रविण वैद्य यांनी जमिनीचे
स्वास्थ चिरकाल टिकवण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा तर्कसंगत वापर या विषयावर
सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी क्षारयुक्त जमीन व्यवस्थापन, योग्य निचरा,
वापसा स्थिती, गाळ आणि हिरवळीच्या खतांचे
व्यवस्थापन या महत्त्वाच्या बाबींवर माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात हवामान तज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांच्या सत्राने झाली.
त्यांनी ४, ५ व ६ मे रोजी छत्रपती संभाजीनगर, बीड व जालना
जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करत, शेतकऱ्यांनी फळबागा आणि हळद प्रक्रियेत योग्य ती दक्षता घ्यावी, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत देशमुख यांनी केले. यावेळी कार्यक्रमात
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून, त्यांनी हवामान बदलाच्या
पार्श्वभूमीवर पिकांची, फळबागांची, पशुधनाची
निगा आणि इतर संबंधित बाबींवर विचारलेले प्रश्न शास्त्रज्ञांनी समर्पक पद्धतीने
उत्तरून समाधान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले.