शेतकऱ्यांच्या सहभागातून क्रियात्मक संशोधनाची गरज... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे दिनांक ३० एप्रिल रोजी “हवामान बदलाच्या परिस्थितीत हवामान अनुकूल पीक तंत्रज्ञान: विस्तार आणि संशोधनात्मक धोरणे” या विषयावर विशेष संवाद सत्र आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी भूषवले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नानाजी देशमुख कृषि
संजीवनी प्रकल्पाचे, प्रकल्प संचालक माननीय श्री. परिमल सिंह (भाप्रसे), मृद विज्ञान तंत्रज्ञ
श्री विजय कोळेकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. विशेष निमंत्रित म्हणून माजी
शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांचा सहभाग होता. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान
आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक
डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी तेलबिया,
डाळ वर्गीय आणि कापूस या पिकांवर भर देणे आवश्यक असून हवामान अनुकूल, स्थानिक
पातळीच्या गरजेनुसार, धोका व्यवस्थापन करण्यायोग्य, उत्पादनात शाश्वतता ठेवणारे पीक
पद्धती आणि पीएम प्रणाम योजनेअंतर्गत सेंद्रिय शेतीस चालना देण्याची आवश्यकता
असल्याचे नमूद केले. शासनाचे सध्या पूर्ण लक्ष शेतकरी केंद्रित संशोधन आणि
विस्तारावर आहे. यासाठी सर्व विभागाने एकजुटीने आणि संयुक्तपणे कार्य करण्याची गरज
आहे. याबरोबरच पाणी फाउंडेशन आणि इतर खाजगी संस्थेच्या कार्याचे समाजातील आकर्षणाचे विद्यापीठ आणि
कृषि विभागाने उपयोग करून घ्यावा आणि संयुक्तपणे नाविन्य असे उपक्रम राबवावेत.
सध्या शेतकऱ्यांच्या सहभागातून क्रियात्मक संशोधनाची गरज आहे. शेतकऱ्यांमध्ये
आपल्या प्रति विश्वास जागृत करावा, त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करावी, यातून
त्यांचे मन शास्त्रज्ञांनी आणि विस्तार कार्यकर्त्यांना जिंकता येतील.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी भरपूर प्रमाणात आहे. विशेषतः मोदीपुरम येथील भारतीय शेती संशोधन
संस्थेमध्ये आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय एकात्मिक
शेती पद्धती परिषदेत विद्यापीठ माननीय कुलगुरू हे स्वतःसह नऊ शेतकरी, चार शास्त्रज्ञ आणि दोन विद्यार्थी असे एकूण सोळा जणांचा चमूसह सहभागी
झाले होते, याची राष्ट्रीय पातळीवर स्तुती होवून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना
शेतकऱ्यांचे कुलगुरू असे संभोधले होते. शेतकऱ्यांसोबत ही आपले संबंध असेच ठेवावेत
असे आवाहन केले. याबरोबरच पोकरा आणि विद्यापीठाने पूर्ण क्षमतेने आपले कार्य
करावे. डेटा म्हणजे माहितीचा संचय यामध्ये ज्ञान सुद्धा आहे, म्हणून जास्तीत जास्त
ज्ञान मिळवावे, त्याचा संचय करावा आणि त्याला पुन्हा स्थापित करून अधिक
कार्यक्षमतेने वापर करावा. तसेच कोणत्याही समस्येचे समाधान एका दिवसात होत नाही
परंतु एक दिवशी समस्याचे समाधान नक्कीच होते असे त्यांनी विशेष नमूद केले.
प्रकल्प संचालक माननीय श्री. परिमल सिंह (भाप्रसे) म्हणाले की, संयुक्त आणि
शेतकऱ्यांच्या सहभागातून दर्जेदार आणि गुणवत्ता युक्त संशोधन आणि विस्तार कार्य
विद्यापीठे करत आहेत. सध्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित विपुल प्रमाणात माहितीचा
(डेटाचा) वापर करून संशोधन करणे आवश्यक आहे. माहितीचे संवर्धन आणि जतन सोन्यासारखे
करणे आवश्यक आहे. प्रत्येक संस्थेने आपला डाटा क्लाऊडवर सुरक्षित ठेवावा. संगणकीय
प्रणाली वापरत असताना मान्यताप्राप्त आणि अचूक सॉफ्टवेअरचा वापर करून कार्य करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ हवामानावर आधारित संदेश देणारे पहिले
विद्यापीठ आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. सध्या ब्लॉक पातळीवर संदेश दिला
जातो. भविष्यात शेतकरी निहाय संदेश देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याबरोबरच
पीकनिहाय वर्णपट संग्रह (Spectral Library)
असण्याची गरज आहे. या विद्यापीठाद्वारे हे कार्य उभारून देशातील
दुसरे विद्यापीठ ठरण्याचा बहुमान मिळेल. पोकरा २ मध्ये संशोधन आणि विस्तार कार्यावर
अधिक भर देण्यात येत आहे. यासाठी शासकीय पातळीवरील सर्व संस्थांची एकजूट ठेवून
आपल्या डेटाची देवाण-घेवाण करून सामाजिक हिताचे संशोधन आणि विस्तार कार्य करण्याची
गरज असल्याची मत व्यक्त केले. विद्यापीठ नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेला
(पोकरा) योग्य पद्धतीने दिशा देऊन घडवत असल्यामुळे विद्यापीठासोबत अनेक प्रकल्प
करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
पोकरा प्रकल्पाचे मृद विज्ञान तंत्रज्ञ श्री विजय कोळेकर यांनी पोकरा -२ या अंतर्गत कार्यपद्धतीचा माहिती सांगितली. याद्वारे
शेतकऱ्यांच्या सहभागातून संशोधनावर अधिकाधिक भर देण्यात येणार असून विद्यापीठाच्या
सहकार्याने पीकनिहाय अभ्यासक्रम तयार करून शेतकरी शेती शाळा याच्यासाठी अवलंब केला
जाणार आहे. पोकरा -२ मध्ये पिकाच्या प्रत्येक स्थितीची, गावाची, शेतकऱ्यांची
संपूर्ण माहिती संकलित करून भविष्यात त्यावर त्याचा अवलंब करून हवामान अनुकूल
तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. यावेळी त्यांनी विस्तार कार्यासाठी मृदभाषिक
संवाद कौशल्य आणि योजनेस पूरक आवश्यक साधनसामुग्री यांचा योग्य वापर करण्यासाठी
कार्य केले जाईल असे सांगितले. सध्या शेतीसाठी भरपूर प्रमाणात तंत्रज्ञान उपलब्ध
आहे, परंतु यापैकी दहा ते पंधरा अति महत्त्वाचे तंत्रज्ञान देणे आवश्यक आहे. या
तंत्रज्ञानाच्या उपयोगातून योग्य निष्कर्ष मिळवण्यासाठी एका ठिकाणी सलग तीन वर्ष
कार्यक्रम राबविण्यात येतील. तसेच योजनांचा प्रभावी अवलंब होण्यासाठी शेतकरी
उत्पादक कंपन्या आणि स्वयंसहायता बचत गटांचा सहभाग अधिक वाढवण्यात येईल, असे
सांगितले.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी हरितक्रांतीच्या काळात आवश्यकतेनुसार
अधिक उत्पादन देणारे वाण आणि तंत्रज्ञान यांचा वापर झाला. परंतु त्याचा काही
प्रमाणात सध्या वातावरणावर परिणाम झाल्याचे दिसून येते. यासाठी संवर्धित शेती
करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच यासाठी आवश्यक असलेली प्रस्ताव
शासनास सादर केल्याचे नमूद केले.
प्रस्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांनी सद्यस्थितीत
डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे हवामान अनुकूल पीक पद्धती आणि लागवड तंत्रज्ञान जास्तीत
जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे नमूद केले.
यावेळी डॉ. मदन पेंडके यांनी मराठवाड्यातील हवामानावर आधारित बिभाग आणि
वातावरणाची माहिती दिली. तसेच या हवामानाशी जुळवून घेणारे विद्यापीठ विकसित
तंत्रज्ञान याबद्दल माहिती दिली. यामध्ये त्यांनी शेततळे, बोरवेल आणि विहिरी यांचे
पुनर्भरण, रुंद सरी वरंबा पद्धत, आंतरपीक पद्धत याची सविस्तर माहिती दिली. यासोबतच
विद्यापीठाने हवामान अनुकूल विकसित केलेल्या कार्याचा आढावा सादर केला.
यावेळी संवादामध्ये मान्यवरांचे चर्चेतून मार्गदर्शन घेण्यात आले. चर्चासत्रामध्ये संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी पोकरा योजना अंतर्गत सोयाबीन, कापूस या पिकांचे बीजोत्पादनावर भर द्यावा, याबरोबरच पशुसंवर्धन, मधुमक्षिका पालन आणि ड्रोन तंत्रज्ञान यांचा समावेश करावा असे सांगितले. माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी मूलस्थानी जलसंधारण करण्याच्या उद्धती सोप्या व सहज करण्यासाख्या आहे त्यामुळे त्यावर अधिक भर देण्याची शिफारस केली. तसेच योजना राबवत असताना काही तंत्रज्ञान अवलंबिण्यामध्ये अडचणी असतील तर त्या अडचणींवर उपाय शोधून दुरुस्ती करून तंत्रज्ञान राबवावे आणि यापुढील काळात अशाच प्रकारची कामे करणाऱ्या संबंधित शासकीय व अशासकीय संस्थांशी समन्वय साधावा जेणेकरून अंमलबजावणीचा वेग आणि प्रसार वाढेल असे सांगितले. डॉ. हरीश आवारी यांनी शेती उपयुक्त सर्व योजना यामध्ये, शेततळे, सोलार पंप, ठिबक सिंचन, अवजारे हे एकाच शेतकऱ्याला दिल्यास अधिक लाभ होईल असे मत व्यक्त केले. डॉ. प्रवीण वैद्य यांनी मातीच्या खोलीनुसार आणि प्रकारानुसार योजनेद्वारे तंत्रज्ञान प्रसारित करावे. डॉ. सचिन मोरे यांनी पिकासोबत पशुसंवर्धन फळबाग योजनेचे लाभ प्रभावीपणे तंत्रज्ञान प्रसारण करून होणे गरजेचे आहे असे सांगितले, डॉ. दयानंद टेकाळे यांनी योजनेत बैलचलित अवजारे देण्याची विनंती केली. डॉ. सूर्यकांत पवार यांनीही रेशीम उद्योग वाढवण्याची शिफारस केली, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी जैविक किड नियंत्रणाची उपकरणे आणि जैविक औषधे योजनेतून द्यावेत तसेच डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी आवळा जांभूळ ड्रॅगन फ्रुट यासारख्या दुय्यम फळ पिकांनाही चालना देण्यासाठी योजनेत सहभाग करावा तर डॉ. अनंत लाड यांनी पीक संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना द्याव्यात अशी विनंती केली.
या चर्चेला उत्तर देताना माननीय श्री. परिमल सिंह यांनी शेतकऱ्यांच्या
क्षमतेवर आणि बँकेतील त्यांच्या क्रेडिट नुसार सर्व योजना एका शेतकऱ्याला देणेही
शक्य आहे. याबरोबरच मातीच्या प्रतीनुसार आणि प्रकरणावर तंत्रज्ञान देण्यात येत आहे,
असे सांगितले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना मनापासून संवाद साधने आवश्यक आहे. प्रभावी
विस्तारासाठी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापेक्षा आपली आपुलकी वाटावी याप्रमाणे राहावे,
यातून त्यांचा आपल्या तंत्रज्ञानावर अधिक विश्वास बसतो याद्वारे ते सहज आपले तंत्रज्ञान
स्वीकारतात. याबरोबरच चारा पिकांचे लागवड तंत्रज्ञान आणि त्याच्या बीजोत्पादन यांचाही
समावेश करण्यात येईल असे सांगितले.
कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता
विभाग प्रमुख प्राध्यापक शास्त्रज्ञ उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. दिगंबर पटाईत यांनी
केले तर आभार मुख्य विस्तार शिक्षणाधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.