माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली निवड प्रक्रिया संपन्न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत परभणी येथील कृषि
महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांनी 'रिलायन्स
बायो-एनर्जी', पुणे या नामांकित कंपनीत वार्षिक ५ लाख रुपये
पॅकेजवर नोकरीची संधी मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांची निवड
महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलमार्फत आयोजित परिसर मुलाखतीद्वारे करण्यात आली.
ही नियुक्ती प्रक्रिया दिनांक २८ एप्रिलरोजी विद्यापीठात पार पडली. एकूण २८
विद्यार्थ्यांनी या मुलाखतीत सहभाग घेतला होता, त्यापैकी ८ विद्यार्थी अंतिम निवडीस
पात्र ठरले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ५ जणांची टीसीसी सुपरवायझर आणि ३
जणांची स्टोअर एक्झिक्युटिव्ह पदावर नियुक्ती झाली याबाबतचे पत्र महाविद्यालयास प्राप्त
झाले असून लवकरच विद्यार्थ्यांना औपचारिक नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत असे कंपनीने
कळविले आहे.
या यशस्वी निवडीसाठी माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार व सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली. निवड झालेल्या मध्ये ऋषिकेश काळे, यश देशमुख, अजय ठोंबरे, ज्ञानेश्वर गायकवाड, किशोर जाधव, अभिषेक तांबारे, प्राणल चट्टे आणि अविष्कार पाटील हे विद्यार्थी आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांचे माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव
श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ आणि
विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल बोलताना सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल म्हणाले, विद्यार्थ्यांनी
दाखवलेली समर्पणभावना आणि चिकाटी यामुळेच हे यश शक्य झाले आहे. हे इतर विद्यार्थ्यांसाठीही
प्रेरणादायक ठरेल.
प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष डॉ. रणजित चव्हाण यांनी सांगितले की,
विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यावर आणि गुणवत्तेवर आधारित ही
सुवर्णसंधी मिळवली आहे. यामध्ये प्लेसमेंट सेलच्या संपूर्ण टीमचे विशेष योगदान
असून, त्यांनी मुलाखतीच्या दिवशी अतिशय परिश्रमपूर्वक काम
केले.
या यशामुळे कृषि महाविद्यालय, परभणीचा शैक्षणिक व औद्योगिक
क्षेत्रातील विश्वास अधिक बळकट झाला आहे. प्लेसमेंट सेलचे कार्य अत्यंत स्तुत्य
असून, यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल
करिअरच्या संधी प्राप्त होण्याचा मार्ग खुला झाला आहे.