माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि महाविद्यालय, लिहाखेडी येथील
विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या
व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक त्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा केली. कृषि
तंत्रज्ञान विद्यालय, छत्रपती संभाजीनगरच्या बळकटीकरणावर भर
देत विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत
मार्गदर्शन केले.
या भेटीत त्यांनी हिमायतबाग येथील रोपवाटिकेची पाहणी केली. वादळामुळे आंबा
पिकाला झालेल्या नुकसानीची आणि गारपीटग्रस्त बागांची पाहणी करून शिल्लक फळांची
निगा कशी राखावी याचे मार्गदर्शन शास्त्रज्ञांना केले. तसेच, पडलेल्या फळांची
योग्य प्रकारे ग्रेडिंग करून विक्री कशी करता येईल, याविषयीही
महत्त्वाचे सूचनावजा निर्देश दिले.
यावेळी कृषि विज्ञान केंद्रात सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेत "शेतकरी देवो
भव" या तत्त्वानुसार कार्यक्रम आखण्याचे आणि संकटाच्या काळात शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले. बाजरी पिकाखालील क्षेत्र वाढवण्यासाठी धोरणात्मक
पावले उचलण्याच्या सूचनाही दिल्या.
विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्यांचा विकास करून त्यांना बीज कंपन्यांमध्ये
प्रशिक्षण मिळावे यासाठी नियोजन करण्याचे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.
या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान
आसेवार व, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे सहयोगी
संचालक डॉ. एस. बी. पवार, फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य श्री. डी. एम. मूळे, कृषि विज्ञान केंद्राच्या
कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाडगावकर यांच्यासह शास्त्रज्ञ व कर्मचारी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.