पदवीपूर्व शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न आवश्यक... शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथे दिनांक १६ मे रोजी पालक मेळाव्याचे आयोजन
करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये सशक्त समन्वय असावा, या
उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार हे होते. त्यांनी आपल्या
भाषणात पदवीपूर्व शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पाया असल्याचे सांगत, हा पाया भक्कम करण्यासाठी शिक्षक, पालक
व विद्यार्थी यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे
मत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
राहुल रामटेके यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्तरावर
राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, कृषि अभियांत्रिकी
शाखा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेसोबतच त्यांच्या अंगी असलेल्या
कलागुणांना वाव देणारी शिक्षणपद्धती आहे. विद्यार्थ्यांनी कृषि क्षेत्रात उद्योजक
होण्याची संधी घेतली पाहिजे.
शिक्षण प्रभारी प्रा.
विवेकानंद भोसले यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना
व्यवसायाभिमुख, दर्जेदार आणि जागतिक दर्जाचे
शिक्षण देणे हे महाविद्यालयाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
डॉ. मधुकर मोरे यांनी
पालकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले संस्कार, वाचन, खेळ आणि व्यायाम यांचे महत्व
अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात
डॉ. गोपाळ शिंदे यांनी कृषि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी ड्रोन, रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता या नव्या क्षेत्रांमध्ये
पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. पालक प्रतिनिधी श्री. ढाकणे यांनी महाविद्यालयातील
शिस्तबद्ध वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे समाधान
व्यक्त केले.
कार्यक्रमास डॉ. सुमंत जाधव, डॉ. सुभाष विखे, डॉ. प्रमोदिनी मोरे,
डॉ. विशाल इंगळे, प्रा. दत्ता पाटील, डॉ. गजानन वासू, डॉ. आश्विनी गावंडे, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. शैलजा देशवेना, डॉ. ओंकार गुप्ता, लक्ष्मीकांत राऊतमारे आणि मंचक
डोंबे यांची उपस्थिती होती.