वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व
कीटकशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद’ या
ऑनलाईन कार्यक्रमाचा ४६ वा भाग दिनांक १६ मे रोजी संपन्न झाला. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात विकसित कृषि संकल्प
अभियान आणि तूर पिकातील पंचसूत्री यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांच्या
कल्याणासाठी विद्यापीठ, राज्य आणि संपूर्ण देश समर्पित
भावनेने कार्य करत आहे. या सर्व कार्यात शेतकरी आणि
शास्त्रज्ञ यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी
कृषी क्षेत्रात कार्य करणारी देशाची सर्वोच्च संस्था भारतीय कृषी अनुसंधान परिषद
परिश्रम घेत आहे. यासाठी केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना.श्री.
शिवराजसिंह चौहान यांचे
दूरदृष्टी नेतृत्व लाभदायक ठरत आहे. खरीपाचे उत्कृष्ट नियोजन होणाच्या दृष्टीने भारतीय
कृषि अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून २९ मे ते १२ जून दरम्यान शेतकऱ्यांसाठी “विकसित
कृषि संकल्प अभियान” हा विशेष उपक्रम आयोजित केला आहे. यामध्ये वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कृषि विज्ञान केंद्र आणि सर्व विस्तार यंत्रणा सक्रिय
सहभागी होणार आहे. या उपक्रमासाठी विद्यापीठ सूक्ष्म नियोजन करत असून यासाठी
शास्त्रज्ञांचे चमू तयार करण्यात येणार आहेत. त्यांच्यामार्फत ‘पीएम-प्रणाम’
योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे तसेच पीकनिहाय आणि शेतकऱ्यांच्या
प्रश्नांशी निगडित मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याबरोबरच माननीय कुलगुरूंची राज्यांच्या
उच्चस्तरीय झालेल्या बैठकीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचून शेती
उद्योगासाठी उपयुक्त तंत्रज्ञान सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून पोहोचविण्याचे ठरविण्यात
आले आहे. यासाठी महत्त्वपूर्ण दहा ते पंधरा शेती तंत्रज्ञानावर भर देण्यात येणार
आहे. या उपक्रमातून शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन देऊन नफा मिळविणे शक्य होईल.
यातून शेतकऱ्यांची सेवा करण्याचे योगदान लाभत आहे. शेतकऱ्यांचे कल्याण झाले तरच ते
सुखी होतील आणि यातूनच “शेतकरी देवो भव:” या विद्यापीठाच्या भावनेचे पूर्णत्वास
नेण्यासाठीचे समाधान मिळणार आहे, असे प्रतिपादन माननीय कुलगुरूंनी केले.
प्रस्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी
करताना नमूद केले की, दिनांक १८ मे रोजी विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त
आयोजित शेतकरी परिसंवादात खरीप हंगामातील सोयाबीन, तूर आणि कापूस महत्त्वपूर्ण
पिकावर शास्त्रज्ञांच्या चमूद्वारे चर्चा घडवून आणून तसेच शेतकऱ्यांच्या समस्या वर
आधारित मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती विषयक
सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच व्यासपीठावर मिळणार आहेत. यासाठी जास्तीत जास्त
शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
तांत्रिक सत्रात डॉ. कैलास डाखोरे यांनी पुढील आठवड्यातील
हवामानाचा अंदाज सविस्तर मांडला तसेच त्यांनी विजेच्या अंदाज येण्यासाठी व
दुर्घटना टाळण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये दामिनी ॲप डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन
केले.
विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे यांनी यांनी तुर
पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी तूर पिकातील पंचसूत्रींचे वर्णन केले. यामध्ये
त्यांनी वाणाची निवड, यात विद्यापीठ विकसित गोदावरी आणि बी डी एन ७१६ या वाणाचा वापर
वाढवावा आणि केवळ वाण बदलल्यामुळे १५ ते ३० टक्के उत्पादनात वाढ होईल, असे
सांगितले. याबरोबरच बीज प्रक्रिया, तुरीची पेरणी ऐवजी टोकन पद्धत करावी, रोग
नियंत्रणासाठी विद्यापीठाच्या बायोमिक्सचा वापर करावा, ४५ ते ५० दिवसांनी एकदाच
तुरीचा शेंडा खोडावा आणि पाण्याची व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे या
महत्त्वपूर्ण बाबीवर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.
प्रशांत देशमुख यांचे मोलाचे योगदान लाभले. सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले
तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले.
यावेळी मराठवाड्यासह विदर्भातील ६० हून अधिक शेतकरी
उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यातील काही शेतकऱ्यांनी विद्यापीठ विकसित गोदावरी
वाणाची स्तुती करत, या वाणाच्या उपलब्धतेबाबत तसेच विविध शेती विषयक समस्या बद्दल
माहिती विचारली विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.