वनामकृविच्या हवामान विभागाचा सल्ला
सध्या मराठवाड्यातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली असून या
पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. मात्र, भारतीय हवामान विभागानुसार
अजून मान्सूनचे अधिकृत आगमन झालेले नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सद्यस्थितीत
पेरणी करण्याची घाई टाळावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.
कैलास कामाजी डाखोरे यांनी केले आहे.
मान्सूनपूर्व पाऊस ही नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी या पावसावर
पेरणी केल्यास पुढील टप्प्यावर पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. अशा
परिस्थितीत कीड-रोगांचा प्रादुर्भाव, उशिरा होणारा पाऊस
किंवा अचानक कोरडा पडल्यास पीक नुकसान होऊ शकते. त्यामुळे सध्याच्या वातावरणात
फक्त मशागत पूर्ण करून ठेवणे योग्य ठरेल.
भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील काही
दिवसांत अजून काही ठिकाणी पावसाच्या सरी कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र हा पाऊस
अपुरा व अनियमित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीच्या दीर्घकालीन यशासाठी,
खरीप हंगामातील पेरणीसाठी मान्सूनच्या स्थिर व सातत्यपूर्ण पावसाची
वाट पाहणे गरजेचे आहे.
शेतकरी बांधवांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन, शेतातील
"वापसा" स्थिती योग्य प्रकारे तयार करून मशागतीची कामे उरकावीत. यामुळे
पावसाळा सुरू झाल्यावर वेळेवर पेरणी करता येईल.
मान्सूनचे अधिकृत आगमन जाहीर झाल्यावरच पेरणीसाठी
मार्गदर्शन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.