Friday, May 23, 2025

"ऑपरेशन सिंदूर " साठी वनामकृवित विशेष कार्यक्रम आणि तिरंगा रॅली – विद्यार्थ्यांत राष्ट्रभक्ती आणि मानवी मूल्यांची रुजवणूक

 ऑपरेशन सिंदूरचा गौरवशाली विजय – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रतिपादन



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भारतीय सैन्याच्या शौर्यगाथेचे प्रतीक ठरलेले "ऑपरेशन सिंदूर " या ऐतिहासिक शौर्याच्या यशोगाथावर आधारित “विशेष कार्यक्रम आणि तिरंगा रॅलीचे” माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी आयोजन दिनांक २३  मे  रोजी  केले. राष्ट्रीय एकात्मता आणि मानवी मूल्यांचे संवर्धन हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून हा कार्यक्रम राबविण्यात आला. या शौर्याच्या यशोगाथेचा विद्यार्थ्यांपर्यंत प्रचार व प्रसार करणे तसेच त्यातून भारतीय सैन्याच्या योगदानाची जाणीव करून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता.

या विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना देशभक्तीची भावना जागृत करणारे मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी अलीकडेच काश्मीरमध्ये घडलेल्या निंदनीय आणि वेदनादायी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. ही घटना विकृतीच्या सीमेला गेलेल्या प्रवृत्तींनी घडवलेली असून, संपूर्ण भारताचे रक्त उसळले होते, असे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या विशेष लष्करी कारवाईचा गौरव करत त्यांनी भारतीय लष्कराच्या धाडसाचे कौतुक केले. या मोहिमेद्वारे जे विकृत कृत्य करणारे होते, त्यांच्यावर कठोर कारवाई करून भारतीय लष्कराने त्यांचा नायनाट केला. हा विजय फक्त लष्कराचा नसून संपूर्ण देशासाठी गौरवाचा क्षण आहे, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या मोहिमेचे नेतृत्व महिलांनी केले असल्याने भारतीय महिला शक्तीचे अधोरेखनही या प्रसंगी झाले. या कार्यवाहीमुळे भारताची लष्करी ताकद आणि महिला सामर्थ्य दोन्हींचा जागतिक स्तरावर सन्मान वाढला आहे, असे ते म्हणाले. आपला देश शांतताप्रिय असूनही जर कोणी डिवचले, तर त्याला सडेतोड उत्तर देण्याची क्षमता भारताकडे आहे, हे या मोहिमेने पुन्हा सिद्ध केले आहे. आपण सर्वांनी देशप्रथम ही भावना ठेवून कार्य करणे आवश्यक आहे. दुसऱ्यांमध्येही ही भावना रुजवणे ही आपली जबाबदारी आहे. राष्ट्र सुरक्षा आणि अन्न सुरक्षा या दोन्ही बाबतीत भारत सक्षम आहे आणि हीच ताकद संपूर्ण जगासमोर उभी राहत आहे, असे प्रतिपादन त्यांनी शेवटी केले.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारतीय लष्कराच्या शौर्यगाथेचा सन्मान करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवण्यासाठी विद्यापीठात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यापीठातील १२०० विद्यार्थ्यांनी "योद्धा" म्हणून नोंदणी केली आहे, ही बाब विद्यार्थ्यांमधील देशसेवेच्या भावना अधोरेखित करते.

विद्यापीठाच्या परिसरात या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद ईस्‍माईलडॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. जया बंगाळेडॉ. राहुल रामटेके, डॉ विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदींसह विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, आणि राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेचे तसेच विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांची बहुसंखेने उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीच्या घोषणां देवून परिसर दणाणला आणि एक स्फूर्तीदायी वातावरण विद्यापीठात परिसरात निर्माण केले. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागवणारा व भारतीय सैन्याच्या अभिमानास वंदन करणारा ठरला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्टनंट डॉ जयकुमार देशमुख यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. रणजीत चव्हाण यांनी मानले.