जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी व्यक्तीचा भावनांक अधिक महत्त्वाचा.... अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान
महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ ५ मे रोजी अत्यंत
उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे होत्या.
या प्रसंगी व्यासपीठावर विभाग प्रमुख डॉ. वीणा भालेराव, डॉ. नीता गायकवाड, तसेच महाविद्यालयाचे जिमखाना
उपाध्यक्ष आणि पदवी अभ्यासक्रमाचे पाल्य प्राध्यापक डॉ. शंकर पुरी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर प्राचार्य व
प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी
मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. जया बंगाळे यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन
शिक्षणातून मिळालेल्या मूल्यांचा उपयोग करत यशस्वी जीवनमान घडवावे असा संदेश दिला.
जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी बुद्ध्यांकापेक्षाही
व्यक्तीचा भावनांक अधिक महत्त्वाचा असून, तो विकसित होण्यासाठी सामुदायिक विज्ञान
अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना लाभ होतो
असे त्यांनी याप्रसंगी नमूद केले. तसेच निरोप समारंभ म्हणजे ज्या संस्थेत आपण
शिकलो त्या संस्थेविषयी आणि तेथील गुरुजनांविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा
दिवस असतो आणि यावेळी विद्यार्थी आपल्या मनापासून च्या भावना व्यक्त करतात. यातूनच
संस्थेलाही विकासाच्या दृष्टीने एक वेगळी दिशा मिळते, असे त्या म्हणाल्या.
डॉ. वीणा भालेराव यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देत
शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील ऋणानुबंधांवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी आपल्या
व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित करावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. याचबरोबर
महाविद्यालय विविध कंपन्यांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी
उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. नीता गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यापासून
त्यांच्यामध्ये होत गेलेल्या प्रगतीचे कौतुक करत त्यांच्यातील कलागुणांची प्रशंसा
केली.
डॉ. शंकर पुरी यांनी विद्यार्थ्यांमध्ये असलेली शिस्त, एकजूट व भावनिक समृद्धी यांचे कौतुक
केले. यामुळे या विद्यार्थ्यांची पाल्य प्राध्यापक म्हणून जबाबदारी पार पाडण्यात
समाधान आणि अतिशय आनंद मिळाल्याचे त्यांनी यावेळी
विशद केले. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याचा आणि स्पर्धा परीक्षांकडे
वळण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तसेच, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय
मध्ये सर्व विभागात व्यवसायाच्या विपुल प्रमाणात संधी असल्यामुळे केवळ नोकरीवर
अवलंबून न राहता स्वयंरोजगाराच्या संधी ओळखून त्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन
त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या
समारंभात पदव्युत्तर विद्यार्थ्यांपैकी गायत्री काबरा, दिव्या भगत, प्रियंका देसटी, सुमा, सोमा,
शिवाणी ठोंबरे, विकास शिक्रे आणि पदवी अभ्यासक्रमातील संजीवनी कदम, पल्लवी शिंदे, आकांक्षा थोरात, कोमल शिंदे, श्रेया तोमरपाटील, कीर्ती मुसळे, ऋतुजा काळे, भाग्यश्री शेळके, हरिदास क्षीरसागर, अनंता वाघमारे यांनी आपले कॉलेज
जीवन, आठवणी व अनुभव अत्यंत भावनिक शब्दांत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. जया
बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना उपाध्यक्ष डॉ. शंकर पुरी व द्वितीय
वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले. तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रम
यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन अपूर्वा लांडगे व श्रावणी जाधव
यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील
विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.