Tuesday, March 22, 2022

वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात व्‍यक्तिमत्‍व आणि उद्योजकता विकास प्रशिक्षण

नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम कठोर परिश्रम घेऊन यशस्वीरित्या पूर्ण करावा. करिअर च्‍या दृष्‍टीने व्‍यक्‍तीमत्‍व विकास व संवाद कौशल्‍य जाणीवपुर्वक वृध्‍दींगत करणे आवश्‍यक असल्याचे मत शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयांत विद्यार्थ्यासाठी व्यक्तिमत्व आणि उद्योजकता विकास यावरील तीन दिवसीय प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रमात दिनांक 21 मार्च रोजी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ जया बंगाळे, प्रमुख वक्‍ते पुणे येथील कम्युनीकेअर अँड कंटेंट सोल्युशन्स संस्थेचे संचालक प्रा. कुशल राऊत, प्रा.संजीव राणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. जया बंगाळे म्‍हणाल्‍या की, भविष्यात नोकरीच्या संधी जरी मिळाल्या नाही तरी सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमाच्या आधारावर विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराकडे वळत यशस्वी उद्योजक बनावे. प्रशिक्षणा दरम्यान वृद्धींगत केलेल्या ज्ञान व कौश्यल्यांच्या आधारावर प्रत्यकाने व्यक्तिमत्व व उद्योजकता विकास साधावा.

सदरिल तीन दिवसीय प्रशिक्षणात प्रा. कुशल राऊत आणि प्रा.संजीव राणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अंतर्गत त्यांनी विविध उपक्रम, प्रात्यक्षिके तसेच दृक-श्राव्य माध्यमांचा उपयोग करत विद्यार्थ्यांना नोकरी – व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणा-या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूविषयी अवगत करत विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला.  याप्रसंगी विद्यार्थी प्रशिक्षणार्थी दिव्या भगत, द्रोपदा मस्के, लवन कुमार, सुनिल पुरोहित यांनी मनोगतात सदरिल प्रशिक्षणामुळे विद्यार्थीमध्‍ये संवाद कौशल्‍य वाढीस लागुन करिअरच्‍या दृष्‍टीने लाभ होईल असे मत व्‍यक्‍त केले. प्रास्‍ताविक कार्यक्रम समन्‍वयक डॉ शंकर पुरी यांनी केलेय तर सूत्रसंचालन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ निता गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख डॉ. नाहिद खान, डॉ. सुनिता काळे,  डॉ.माधुरी कुलकर्णी, डॉ. वीणा भालेराव, डॉ. इरफाना सिद्दिकी, डॉ. जयश्री रोडगे आणि डॉ. विद्यानंद मनवर यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणाचे आयोजन प्राचार्या डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी केले. कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील श्री रवींद्र चंदाले, शितल मोरे, रमेश शिंदे, मारोती गिरी, प्रकाश जोंधळे, रामा शिंदे, अलीम शेख यांनी परिश्रम घेतले.