Tuesday, March 1, 2022

एकात्मिक शेती पध्दतीच्या माध्यमातुन शाश्वत शेती शक्य:... कुलगुरु मा. डॉ. विलास भाले

परभणी चाप्टर ऑफ इंडीयन सोसायटी ऑफ ॲग्रोनॉमीच्‍या वतीने आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत परभणी चाप्टर ऑफ इंडीयन सोसायटी ऑफ ॲग्रोनॉमी च्या वतीने व्याख्यानमाला २०२२ चे आयोजन करण्यात असुन दिनांक २५ फेब्रुवारी रोजी शाश्वत शेती- सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल या विषयावर अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. विलास भाले यांच्‍या व्याख्यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, माजी शिक्षण संचालक डॉ एम व्‍ही ढोबळे, विभाग प्रमुख तथा गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भगवान आसेवार, माजी प्राध्‍यापक डॉ ए एन गिरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ. विलास भाले म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानाचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. नैसर्गिक संसाधनांचा संतुलित वापर करून सेंद्रीय निविष्‍ठांचा शास्‍त्रोक्‍त वापर करणे आवश्‍यक आहे. रासायनिक निविष्‍ठांचा अवाचवी वापर न करता एकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब करावा लागेल, यात एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, किड व रोग व्‍यवस्‍थापनाचे कास धरावी लागेल.  तरच शेतीत शाश्‍वतता शक्‍य होईन शेतकरी बांधव आर्थिकदृष्टया सक्षम होईल.

माजी शिक्षण संचालक डॉ. एम.व्ही. ढोबळे म्‍हणाले की, सर्व कृषिविद्या शाखेतील प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांच्‍या सहयोगातुन परभणी चाप्टरची उभारणी झाली, या माध्‍यमातुन विविध व्याख्याने व परिसंवादे नियमित आयोजन करण्‍यात आले, यामुळे या शाखातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती संशोधकांना व विद्यार्थ्‍यांना झाली.

प्रास्‍ताविकात शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी कृषिविद्या शाखेतील पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्याना प्रोत्‍साहन म्‍हणुन सोसायटीच्या माध्यमातुन २०१९ पासून प्रतीवर्षी सुवर्णपदक देण्‍यात येत असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ आयएबी मिर्चा व डॉ सुनिता पवार यांनी केले तर डॉ भगवान आसेवार यांनी केले कार्यक्रमात डॉ. आर. ए. गायकवाड, डॉ. बैनाडे, डॉ. के. टी. जाधव, डॉ. नवाट, डॉ. ओझा, डॉ. मुलगीर, डॉ. व्ही. व्ही. दहिफळे, डॉ. एम. यु. उमाटे, डॉ. एन. के. काळेगोरे, डॉ. यु. एन. आळसे आदी कृषिविद्या विषयातील माजी प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांचा त्‍यांच्‍या कृषि विद्यापीठातील योगदानाबददल सन्मानित करण्यात आले. व्याख्यानास डॉ. डब्लु. एन. नारखेडे, डॉ. ए. एस. कारले, डॉ. ए. एस. जाधव, डॉ. एस. बी. पवार, डॉ. पी. एन. करंजीकर, डॉ. के. टी. जाधव, डॉ. ए. के. गोरे आदीसह सोसायटी ऑफ अँग्रोनॉमीचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, विषय विशेषज्ञ, शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.