Thursday, March 10, 2022

जैविक शेतीमध्ये किड व्यवस्थापनासाठी शास्त्रीय ज्ञान महत्वाचे... किटकशास्‍त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम नेहरकर

वनामकृवित आयोजित ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने राज्यस्तरीय तीस दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातुन मा. कुलगुरु डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सदरिल प्रशिक्षणात दिनांक 08 मार्च रोजी फळे व भाजीपाला पिकांतील जैविक कीड व्यवस्थापन’’ या विषयावर नाशिक येथील के के वाघ कृषि महाविद्यालयातील किटकशास्त्रज्ञ डॉ. तुषार उगले यांच्या व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी कृषि किटकशास्त्र विभागाचे प्राध्‍यापक डॉ. पुरुषोत्तम नेहरकर हे होते तर प्रमुख पाहूणे प्रमुख पालमपुर (हिमाचल प्रदेश) येथील किटकशास्त्रज्ञ डॉ. प्रमचंद शर्मा, बाभुळगाव (ता. पाथरी, जि. परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री. बाबासाहेब रनेर, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, डॉ. स्मिता खोडके, डॉ. संतोष फुलारी, डॉ. पपीता गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

अध्‍यक्षीय मार्गदर्शनात डॉ. पुरुषोत्तम नेहरकर म्‍हणाले की, रासायनिक किटकनाशकांच मोठया प्रमाणात वापर वाढला आहे, याचा मानवी शरीरावर व पर्यावरणावर फार मोठा विपरीत परिणाम होत आहे. जवळपास 97 टक्के किडींचे नियंत्रण हे निसर्गत: होते. केवळ तीन टक्के किडींचे नियंत्रण आपल्याला करावे लागते.  किड नियंत्रणासाठी एकात्मिक पीक पध्दती, पीकांची फेरपालट, जमिनीची मशागत आदींव्दारे किड व्‍यवस्‍थापन करता येते. विद्यापीठ निर्मित मित्रकींडीचे अंडे असलेल्‍या ट्रायकोकार्डचा वापर किड व्‍यवस्‍थापनासाठी केला जाऊ शकतोसेंद्रीय शेती करतांना जैविक किड नियंत्रणाबाबत शेतकरी बांधवांमध्‍ये शास्‍त्रीय ज्ञान असणे आवश्‍यक आहे.

मार्गदर्शनात डॉ. प्रमचंद शर्मा, म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीसाठी आणि जैविक नियंत्रणासाठी शेतक­यांनी जागरुक राहुन किडींच्या नियंत्रणासाठी किड येण्यापुर्वीच प्रतिबंधात्मक उपाय हाती घेणे आवश्यक आहे. जैविक किटकनाशकांची कार्यकक्षमता ही केवळ सहा महिने ते एक वर्षाची असते, त्यामुळे त्यांचा वापर योग्यवेळी करणे गरजेचे आहे.

प्रमुख वक्ते डॉ. तुषार उगले आपल्‍या व्‍याख्‍यानात म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीमध्ये फळपिक उत्पादक शेतक­यांचना मोठी संधी असुन जैविक पध्दतीने कीड व्यवस्थापनमध्ये वनस्पतीजन्य घटक जेसे की, निम अर्क, दशपणी अर्क, प्राणीजन्य घटक जसे की, माशाचे तेल,  सुक्ष्मजीव आधारीत घटक,  परोपजीवी घटक या घटकांवर आधारीत जैविक किड नियंत्रण करता येते. भाजीपाला पिकां रसशोषक किडी, पांढरी माशी, फुलकिडे, लाल कोळी ढेकूण, उंटअळी, पाने गुंडाळणारी अळी, शेडे पोखरणारी अळी हूमणी, सुत्रक्रमी, उधई आदी मुख्‍य किडी आढळतात. फळबागा पांढरी माशी, मिलीबग, खोड पोखरणारी अळी आदींची परिणाम दिसुन येतो. यावर नियंत्रनासाठी लेकॅनिसिलियम, लेकॅनी, बिव्हेरीया बॅसियाना आणि मेटारायझियम या किटक परोपजीवी बुरशीचा वापर फवारणीतुन करता येईल.

प्रगतशील शेतकरी श्री. बाबासाहेब रनेर यांनी आपले सेंद्रिय शेतीमघील अनुभव कथन करतांना सांगितले की, सेंद्रीय शेतीबाबत विविध माध्‍यामातुन प्रशिक्षण घेऊन आत्मा अंतर्गत 50 शेतक­यांचा गट तयार करुन सेंद्रीय शेती करण्यास सुरुवात केली.  त्यामध्ये सर्वप्रथम माती परिक्षण करुन घेतले व जमिनीतील सेंद्रीय कर्ब कशा पध्दतीने वाढवता येईल यावर भर दिला. सेंद्रीय शेतीमध्ये दाळवर्गीय पिकांचे उत्पादन घेतले व ते आठवडी बाजारामध्ये, शिवार बाजार इ. विक्री केली त्यामध्ये नफा मिळाला. जीवामृत, दशपर्णी अर्क गांडुळ खत इ. वापरले तर मित्र किडींची जोपासना केली. सेंद्रीय खतांमुळे जमिनीची सुपिकता वाढते असे अनुभव त्‍यांनी सांगितले

महिला दिना निमित्त प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती रनेर ताई म्हणाल्या की धरणी माता सर्वाची आई आहे. त्यामुळे धरणीमातचे अरोग्य जोपासले तर ती जगेल. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. श्रध्दा धुरगुडे यांनी केले तर आभार डॉ. मिनक्षी पाटील यांनी मानले. डॉ. आनंत लाड यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी, डॉ. अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, दिपक शिंदे, अभिजीत कदम, सतिश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.