वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील बायोमिक्स संशोधन व निर्मिती
केंद्रास नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक माननीय श्री.
परिमल सिंह (भा.प्र.से.) यांनी दिनांक ३० एप्रिल रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी
त्यांनी बायोमिक्सच्या संशोधन कार्याचा आढावा घेतला व त्याच्या वापरामुळे
शेतीमध्ये घडत असलेल्या सकारात्मक बदलांबाबत समाधान व्यक्त केले.
“हळद, अद्रक, फळपिके व भाजीपाला
पिकांमध्ये बायोमिक्सच्या वापरामुळे विक्रमी उत्पादन नोंदवले गेले असून, हे जैविक मिश्रण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. त्यामुळे बायोमिक्सचा लाभ
प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे,” असे गौरवोद्गार माननीय श्री. परिमल सिंह (भा.प्र.से.) यांनी काढले.
शेतकऱ्यांमध्ये बायोमिक्सची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून, त्याच्या
वापरामुळे जमिनीतील मित्र बुरशी व मित्र जिवाणूंची संख्या वाढते, जे वनस्पतीच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचे त्यांनी नमूद
केले.
या प्रसंगी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे मृद विज्ञान तंत्रज्ञ
श्री. विजय कोळेकर, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,
कृषी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे आदी मान्यवर उपस्थित
होते.
कार्यक्रमाचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी बायोमिक्सबाबत
सविस्तर माहिती देताना सांगितले की, या जैविक मिश्रणामुळे जमिनीजन्य
रोगांवर व कीड नियंत्रणावर प्रभावी उपाय मिळतो. यामुळे रासायनिक कीटकनाशकांवरील
खर्चात बचत होते, पिकांचे आरोग्य सुधारते आणि उत्पादनात वाढ
होते.