Friday, November 21, 2025

विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासोबत उत्तम नागरिकत्व जपावे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृविच्या गोळेगाव येथील कृषि महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, गोळेगाव (ता. औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली) येथे सन २०२५-२६ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर तसेच महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ शिवाजी शिंदे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर न थांबता उत्तम आहार, चांगले आरोग्य, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन आणि नैतिक मूल्यांसह सर्वांगीण विकासावर भर दिला पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी अभ्यासू, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडणे अत्यावश्यक असून, त्या दिशेने प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्न केले पाहिजेत. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करावा, ग्रामीण कृषी समस्यांचे अध्ययन करून अभिनव उपाय शोधण्याची वृत्ती जोपासावी, असे आवाहन केले. यानंतर माननीय कुलगुरूंच्या हस्ते नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रतीकात्मक स्वागत करण्यात आले.

आपल्या मनोगतात शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मुळे कौशल्याधारित शिक्षण व मूल्याधिष्ठित शिक्षणाला नवी दिशा मिळाली आहे. कृषि क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान, स्टार्टअप्स, उद्योजकता आणि संशोधनाच्या संधींचा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात लाभ घेऊ शकतात. कृषि क्षेत्रातील ड्रोन टेक्नॉलॉजी, प्रिसिजन फार्मिंग, जलसंवर्धन पद्धती आणि नैसर्गिक शेतीतील संधी यांचीही त्यांनी माहिती दिली.

प्रास्ताविकात सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे यांनी सांगितले की, अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी नव्या उपक्रमांना प्रारंभ करण्यात येणार आहे. महाविद्यालय विद्यार्थी-केंद्रित, अभ्यासू तसेच प्रेरणादायी वातावरण घडविण्यास कटिबद्ध आहे.

नवप्रवेशित विद्यार्थी दुर्गा कल्याणकर व अस्मिता भालेराव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना महाविद्यालयीन वातावरण, अध्यापन पद्धती आणि उपलब्ध सुविधांविषयी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. शंकर नरवाडे, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. दशरथ सारंग, डॉ. राहुल भालेराव, डॉ. विद्यानंद मनवर, डॉ. पुंडलीक वाघमारे, डॉ. राजेंद्र जाधव, प्रा. वैशाली बास्टेवाड, प्रा. ज्योती गायकवाड, डॉ. डी. पी. देशपांडे, अधिकारी श्री. प्रवीण दंडे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन ज्योती देवकर व महेश भुजबळ यांनी केले. वैभव कौशल्ये यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. एस. एम. ताटके, श्री. शेख सलीम, श्री. जी. एन. नाईक, श्री. सी. एल. ताटीकोंडलवार, श्री. एस. डी. आडे, श्री. बी. आर. खुडे, श्री. एम. डी. गुव्हाडे, श्री. बी. एम. खुडे, श्री. पी. बी. हंबर्डे, श्री. यु. बी. खटींग, श्री. जी. ए. जाधव, श्रीमती एम. एस. भिसे, श्रीमती आर. पी. बुरकुळे तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.