Monday, December 22, 2025

वनामकृवित सोयाबीन पिकातील अद्ययावत तंत्रज्ञानासाठी शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी संपन्न

 सोयाबीन संशोधनात परभणी विद्यापीठाचे मोलाचे योगदान – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन प्रकल्प, परभणी व भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन दिनांक १९ ते २० डिसेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले. हा कार्यक्रम आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिक उपक्रमांतर्गत (FLD) राबविण्यात आला असून, शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती देणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.

उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि लाभले, तर प्रमुख अतिथी म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे हे होते.  प्रमुख मार्गदर्शक म्हणून संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे व कृषि विस्तार विद्यावेत्ता डॅा. गजानन गदडे यांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थितीमध्ये प्रगतिशील शेतकरी श्री मंगेश देशमुख मु. पेडगाव त. जि. परभणी  श्री. प्रताप किशनराव काळेमु. धानोरा (काळे)पोस्ट कळगावता. पूर्णाजि. परभणी, हे लाभले.

अध्यक्षीय मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाचे कार्य शेतकरी देवो भव:” या भावनेतून सुरू असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी हा केवळ लाभार्थी नसून तो विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनाचे विशेष कौतुक केले. विद्यापीठाच्या योगदानाचे महत्व विशद करताना म्हणाले की, परभणी विद्यापीठ हे १९७५ पासून सोयाबीन संशोधनामध्ये सक्रिय असून आजपर्यंत विद्यापीठाने एकूण १३ वाण विकसित केले आहेत. यामध्ये एमएयुएस ६१२एमएयुएस ७२५ आणि एमएयुएस ७३१ हे अलीकडेच विकसित केलेले रोगप्रतिरोधक व ताणसहनशील वाण शेतकऱ्यांमध्ये विशेषतः लोकप्रिय ठरले आहेत. तसेच भविष्यात येणाऱ्या एमएयुएस ७९१ व एमएयुएस ७९५ या वणाबद्दल माहिती दिली. याशिवाय विद्यापीठाने शिफारस केलेली रुंद सरी वरंबा पद्धत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. अधिक पाणी किंवा ताण सहन न करणारा सोयाबीन हे उत्पादनातील एक मोठे आव्हान असून एमएयुएस ७२५ आणि एमएयुएस ७३१ वाणांचा वापर व विद्यापीठाने शिफारस केलेल्या लागवड पद्धतींचे अवलंबन केल्यास हे आव्हान कमी करता येतेअसे स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांनी विद्यापीठाशी अधिकाधिक संपर्कात राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठ शेतकरी-केंद्रित संशोधन व प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठामार्फत विकसित करण्यात आलेल्या विविध सोयाबीन पिकाच्या वणाबद्दल माहिती सांगितली. तसेच सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आवश्यक नियोजन  व बिजोत्पादन कार्यक्रमा बाबत माहिती सांगितली तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, व उत्पादनवाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यापीठामार्फत विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञान शिफारसी व पीक व्यवस्थापन पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, खरीप हंगामात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी आंतरमशागतीची सुरुवातीची कामे पूर्ण झाल्यानंतर उभ्या पिकात ठरावीक ओळीनंतर सरी काढणे अत्यंत उपयुक्त ठरते. बळीराम अथवा लाकडी नांगराच्या सहाय्याने पिकांच्या प्रत्येक २, ४ किंवा ६ ओळीनंतर १५ ते २० सें.मी. खोलीची अरुंद सरी काढल्यास कोरडवाहू पिकांना विशेष लाभ होतो. उभ्या पिकांत अशा प्रकारे काढलेल्या सऱ्यांमुळे पावसाचे पाणी अधिक काळ साठते, जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि पिकांच्या उत्पादनात वाढ होते, असे त्यांनी नमूद केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी-केंद्रित विस्तार कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, व उत्पादनवाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कृषि विस्तार विद्यावेत्ता डॅा. गजानन गदडे यांनी सोयाबीन पिकाचे सद्यस्थितीतील महत्त्व स्पष्ट करत पिक व्यवस्थापन करताना घ्यावयाच्या काळजीबाबत सखोल व उपयुक्त मार्गदर्शन केले. संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांनी बैल चलित विविध औजारे विषयी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देत त्याचा प्रत्यक्ष उपयोग समजावून सांगितला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. सुनिल उमाटे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार डॉ. राजेंद्र जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॅा विवेक घुगे, वरिष्ट संशोधन सहायक श्री. दत्ता सुरनर, श्री. प्रेषित चव्हाण, कृषि सहायक श्री. भाऊसाहेब रंधवे, श्रीमती. मोहिनी अंबुरे व श्रीमती किंगरे  यांनी परिश्रम घेतले.







Saturday, December 20, 2025

वनामकृविद्वारा पौष्टिक तृणधान्यांच्या लागवड व मूल्यवर्धनावर कृषि विभागासाठी दोन दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण

 कमी पाण्यातील पौष्टिक तृणधान्ये आरोग्य व शाश्वत शेतीसाठी उपयुक्त : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

राष्ट्रीय कृषि विकास योजना – महाराष्ट्र पौष्टिक गुणधर्म अभियान सन २०२५-२६ अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिनांक १९ व २० डिसेंबर २०२५ दरम्यान दोन दिवसीय तृणधान्य चे महत्व लागवड व मुल्यवर्धन या विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २० डिसेंबर २०२५ ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरूंनी सध्याच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात, कमी खतांवर तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असलेली बाजरी व ज्वारी ही पौष्टिक तृणधान्ये अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. ही पिके शेतकऱ्यांनी आपल्या पीक पद्धतीत समाविष्ट करावीत तसेच दैनंदिन आहारात वापर केल्यास निरोगी आरोग्यास चालना मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.विद्यापीठाने बाजरी व ज्वारीचे अधिक लोह व जस्तयुक्त सुधारित वाण विकसित केले असून, हे वाण तसेच पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. हे कार्य कृषि सहाय्यक अधिकारी प्रभावीपणे करू शकतात, कारण त्यांचा शेतकरी बांधवांशी थेट संपर्क असतो. या पिकांखालील क्षेत्र विस्तारासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) व महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन मूल्यवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच बाजरी व ज्वारी पिकांमध्ये काढणी प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने संशोधन करून त्याचे निष्कर्ष शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. क्लस्टर पातळीवर प्रात्यक्षिकांचे आयोजन करून कमी खर्चिक निविष्ठांच्या वापरातून उत्पादनवाढ साधता येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. प्रकाश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात पोषक तृणधान्यांचे क्षेत्र व उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने कृषि विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

तांत्रिक सत्रांमध्ये डॉ. चंद्रकांत पाटील यांनी बाजरी लागवडीविषयी, श्री. कुलकर्णी यांनी पोषक तृणधान्यांचे मूल्यवर्धन, डॉ. योगेश बन यांनी नाचणी, वरी व भगर लागवड तंत्रज्ञान, तर डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे व डॉ. दिलीप हिंगोले यांनी किड व रोग व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सूर्यकांत पवार यांनी बियाणे उपलब्धता व जैविक खताच्या वापराविषयी माहिती दिली.

माजी ज्वारी पैदासकार डॉ. लक्ष्मण जावळे यांनी ज्वारी व हुरडा लागवडीद्वारे अधिक उत्पन्न कसे मिळविता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर नरसापूर व सारंगपूर येथे श्री. आनंद गंजेवार यांनी हुरडा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन त्यांच्या अनुभवांबाबत व अडचणींबाबत माहिती घेतली तसेच योग्य मार्गदर्शन केले.शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठाच्या शिफारशीनुसार तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविणे, तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार वाण उपलब्ध होण्यासाठी पैदासकारांनी सातत्याने प्रयत्न करावेत, असे यावेळी आवाहन करण्यात आले.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहयोगी संचालक (संशोधन)डॉ. सूर्यकांत पवार आणि छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कृषि अधिकारी श्री. आनंद गंजेवार, कार्यक्रम समन्वयक श्री. काकासाहेब सुकासे, तसेच राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र, गांधेली येथील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण ८० अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



वनामकृवितील अमृत सरोवर व गोदावरी तूर बीजोत्पादन प्रक्षेत्रास माननीय कुलगुरू व माननीय जिल्हाधिकारी यांची भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (सिंचन जल व्यवस्थापन) अंतर्गत विकसित अमृत सरोवर तसेच गोदावरी तूर बीजोत्पादन प्रक्षेत्रास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांनी दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी भेट दिली.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठातील या योजनेच्या लगत असलेल्या नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (वनामकृवि – आरपीटीओ / VNMKV–RPTO) प्रशिक्षण केंद्राची तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या वृक्षलागवड व वनीकरण उपक्रमांबाबत माहिती सांगून शेतकरी-केंद्रित संशोधन व उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले.

या भेटीदरम्यान प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा तसेच आतापर्यंत साध्य झालेल्या उल्लेखनीय यशांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सिंचन जल व्यवस्थापन, पाणी साठवण व कार्यक्षम वापर, तसेच दर्जेदार बियाणे उत्पादनाच्या माध्यमातून शाश्वत शेतीस चालना मिळत असल्याबाबत माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांनी अमृत सरोवर तसेच संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्षेत्रावरील ठिबक सिंचानावर लागवड करण्यात आलेल्या गोदावरी तुरीच्या वाणावरील  विविध प्रयोगांची पाहणी केली. या सर्व उपक्रमांचा व तंत्रज्ञानाचा माननीय जिल्हाधिकारी यांनी विशेष कौतुक केले. परिसरातील नैसर्गिक वातावरण व समृद्ध साधनसंपत्ती लक्षात घेता येथे कृषि पर्यटनाची मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद करून, विद्यापीठाने या ठिकाणी कृषि पर्यटनाचे एक आदर्श मॉडेल विकसित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

भेटीदरम्यान कोरडवाहू शेतीसाठी वरदान ठरणाऱ्या ‘त्रिशूल तंत्रज्ञानाची’ प्रक्षेत्रावर उपयुक्तता प्रत्यक्ष दाखवण्यात आली. या तंत्रज्ञानामध्ये पावसाच्या पाण्याची शेततळ्यात साठवणूक, सिंचनासाठी सौर (ग्रीन) ऊर्जेचा वापर तसेच पाण्याच्या अचूक व कार्यक्षम वापरासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतींचा समावेश आहे. या प्रणालीमुळे सिंचनाखालील क्षेत्र वाढून उत्पादनात लक्षणीय, सुमारे दुप्पट वाढ साध्य होत असल्याचे योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी यांनी मान्यवरांना सांगितले.

या भेटीदरम्यान शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी तसेच प्रक्षेत्र अधिकारी श्री. ऋषिकेश औंढेकर उपस्थित होते.





परभणी जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी वनामकृवित MahaSTRIDE अंतर्गत महत्त्वपूर्ण बैठक

 

राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी शासनाने महत्वाकांक्षी MahaSTRIDE प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत शासन निर्णयानुसार वार्षिक जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या समन्वयाने परभणी जिल्ह्याचा वार्षिक जिल्हा विकास आराखडा (सन २०२५–२६ व २०२६–२७) तयार करण्यासाठी शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिम्पोजीयम हॉल (हॉल क्र. १८) येथे पार पडली.

या बैठकीस MahaSTRIDE प्रकल्पांतर्गत वार्षिक कृती आराखड्याची मांडणी व अंमलबजावणी यावर चर्चा करण्यासाठी संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. उमेश वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. दौलत चव्हाण, उपसंचालक (पशुसंवर्धन) तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे प्राध्यापक व कृषि विभागाचे अधिकारी आदी मान्यवरासह सर्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ,  प्राथमिक, दुय्यम व तृतीय क्षेत्रांतील प्रमुख हितधारक उपस्थित होते.

या चर्चेचा मुख्य उद्देश हा परभणी जिल्ह्याच्या सकल जिल्हाअंतर्गत उत्पादनात (GDDP) लक्षणीय योगदान देण्यासाठी कृतीक्षम मार्ग निश्चित करणे हा होता. पारंपरिक प्रशासकीय चौकटीपलीकडे जाऊन शेती, उद्योग व सेवा क्षेत्र यांचा समन्वय साधणारा सर्वसमावेशक विकास दृष्टिकोन स्वीकारण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना शेतीचे व्यवस्थापन करताना जमिनीचे जैविक घटक व आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. यासाठी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे अनन्यसाधारण महत्त्व असून, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत पोषक अन्नघटकांचे उत्पादन वाढविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेती उत्पादन वाढविण्यासाठी फलोत्पादन, पशुधन विकास, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, रेशीम शेती आदी कृषि संलग्न घटकांचा समावेश करून सर्व बाबी एका छत्राखाली आणत एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. या सर्व उपक्रमांचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे सर्वांगीण कल्याण, त्यांचे उत्पन्न वाढवणे व आनंदी जीवनमान निर्माण करणे हा असला पाहिजे.

तसेच शेतीमध्ये पाणी बचत करणारे तंत्रज्ञान, जमिनीचे आरोग्य सुधारण्याच्या पद्धती, सेंद्रिय घटकांची निर्मिती आणि प्रभावी लागवड तंत्रांचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांनी विद्यापीठात झालेल्या चर्चेदरम्यान आपली मते मांडली. त्यांनी वार्षिक कृती आराखडा हा नवोन्मेष व टिकाऊपणा वाढविणारा ‘जिवंत दस्तऐवज’ असावा, असे नमूद केले. चर्चेत शेती हे परभणीचे कणा असल्याचे स्पष्ट करण्यात आले; मात्र शाश्वत विकासासाठी कृषि संलग्न क्षेत्रांमध्ये विविधीकरण आवश्यक असल्यावर भर देण्यात आला.

MahaSTRIDE प्रकल्पाअंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे रिसर्च पार्क (संशोधन उद्यान) स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. कृषि विद्यापीठ, शासन व शेतकरी यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणारा हा प्रकल्प कृषि व कृषि संलग्न क्षेत्रांमध्ये नवोन्मेष, संशोधन, उद्योजकता व कौशल्य विकासाला चालना देऊन जिल्ह्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) वाढ करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित आहे. प्रस्तावित रिसर्च पार्कद्वारे कृषि आधारित स्टार्ट-अप्स, कृषि प्रक्रिया उद्योग तसेच संशोधनाधारित उपक्रमांना पाठबळ देण्यात येणार असून, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

चर्चेतील प्रमुख मुद्दे :

बैठकीत खालील क्षेत्रांच्या कार्यक्षम विकासासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांची देवाणघेवाण करण्यात आली –

शेती संलग्न क्षेत्रे : मत्स्यव्यवसाय व पशुधन–दुग्धव्यवसायाचे आधुनिकीकरण करून उत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या रणनीती.

रेशीम उद्योग (सेरीकल्चर) : रेशीम उत्पादनाला उच्च मूल्याचे नगदी पीक म्हणून प्रोत्साहन.

मूल्यवर्धन : काढणीपश्चात नुकसान कमी करण्यासाठी व स्थानिक रोजगारनिर्मितीसाठी कृषि प्रक्रिया उद्योगांना चालना.

फलोत्पादन (हॉर्टिकल्चर) : निर्यातक्षम दर्जाच्या फळे व भाजीपाला पिकांच्या लागवडीचा विस्तार.

नवीन विकास स्रोत : जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून पर्यावरण पर्यटन (इको-टुरिझम) विकसित करण्याच्या शक्यता, ज्यातून तृतीय क्षेत्रातील उत्पन्नात वाढ होईल.

बैठकीच्या समारोप सत्रात एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) उपक्रमावर विशेष चर्चा करण्यात आली. परभणीच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे ब्रँडिंग, विपणन व पुरवठा साखळी व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा करून ती उत्पादने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचविण्याबाबत रणनीती ठरविण्यात आल्या, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला थेट चालना मिळेल.


Friday, December 19, 2025

प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांतून महिलांना उद्योजकतेची संधी : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृवित परभणी जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी दोन दिवसीय अन्नप्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयातील सामायिक उष्मायन केंद्र (Common Incubation Centre) व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील महिला बचत गटांसाठी दोन दिवसीय अन्नप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. उद्घाटनपर मार्गदर्शनात त्यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) स्थापनेमागील उद्दिष्टे व कार्यपद्धती यांचा सविस्तर आढावा घेतला. भारत सरकार व महाराष्ट्र शासनामार्फत महिला शेतकऱ्यांच्या कल्याण व सक्षमीकरणासाठी विविध विशेष योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिला प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले की, यशस्वी उद्योजक होण्यासाठी दृढ संकल्पासोबत सातत्यपूर्ण परिश्रम आवश्यक असतात. प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांची निर्मिती करताना त्यांचे दर्जेदार व प्रभावी विपणन कसे करता येईल, याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुटुंबाचा सर्वांगीण विकास साधताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

या मूलभूत प्रशिक्षणानंतर ‘प्रशिक्षण २.०’ घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुढे महाराष्ट्र शासन, आत्मा यंत्रणा व विद्यापीठ यांनी संयुक्तपणे कार्य करून एक विशिष्ट कार्यक्षम मॉडेल विकसित करावे, असे त्यांनी सूचित केले. या मॉडेलअंतर्गत काही प्रशिक्षणार्थी प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांची निर्मिती करतील, तर काही प्रशिक्षणार्थी त्या उत्पादनांचे प्रभावी विपणन करतील. शेतापासून थेट ग्राहकापर्यंत प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित अन्नपदार्थ पोहोचविण्यासाठी मजबूत व शाश्वत पुरवठा साखळी निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विद्यापीठाचे माननीय शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी हे प्रशिक्षण कार्यक्रम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त व महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. आत्मा प्रकल्पाचे संचालक श्री. दौलत चव्हाण यांनी प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांच्या बाजारपेठेची व्याप्ती मोठी असून या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध असल्याचे सांगून महिला बचत गटांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यक्रमास अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, प्रशिक्षण समन्वयक डॉ. विजया पवार, परभणीचे तालुका कृषी अधिकारी श्री. विजयकुमार नांदे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आत्मा प्रकल्पातर्फे श्री. पी. पी. रेंगे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, परभणी आणि श्री. एस. यू. हूगे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, सेलू यांनी प्रशिक्षण समन्वयक म्हणून कार्य केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आवळा, केळी व सोयाबीन यांपासून विविध प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित अन्नपदार्थ — जसे की आवळा मुरंबा, आवळा लोणचे, केळीचे चिप्स, केळीची पावडर, सोयाबीन स्नॅक्स इत्यादी — तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण महिला बचत गटांना महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्वाती घोडके, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा प्रकल्प, परभणी यांनी केले, तर आभार डॉ. राजेश क्षीरसागर मानले.





वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात ऊर्जासंवर्धन सप्ताह जनजागृती कार्यक्रम

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाअंतर्गत असलेल्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ऊर्जासंवर्धन सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम दिनांक १९ डिसेंबर २०२५रोजी उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम महाविद्यालयीन जिमखाना, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तसेच महाऊर्जा, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके हे होते. यावेळी भाषणात त्यांनी सांगितले की, ऊर्जासंवर्धन म्हणजे उपलब्ध ऊर्जा संसाधनांचा सुयोग्य, काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर करणे होय. ऊर्जा बचत ही केवळ आर्थिक गरज नसून पर्यावरण संरक्षण, आर्थिक शाश्वतता तसेच भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर करणे, अनावश्यक वीज वापर टाळणे तसेच नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

ऊर्जा ऑडीटर श्री. केदार खमीतकर यांनी ऊर्जासंवर्धन विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी ऊर्जेचा इतिहास, औद्योगिकीकरणानंतर वाढलेला ऊर्जावापर, आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारी ऊर्जा गरज तसेच भविष्यातील संभाव्य ऊर्जासंकट याविषयी माहिती दिली. १९८० नंतर जागतिक ऊर्जावापर सुमारे ४५ टक्क्यांनी वाढलेला असून २०३० पर्यंत तो ७० टक्क्यांपेक्षा अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. एलईडी दिवे, ऊर्जा कार्यक्षम (स्टार रेटिंग) उपकरणे, सौरऊर्जेचा वापर तसेच विद्युत उपकरणांची नियमित देखभाल केल्यास मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचत शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. प्रशांत गायकवाड यांनी महाऊर्जाच्या विविध योजना तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ऊर्जा बचत उपक्रमांची माहिती दिली. तसेच श्री. किरण खमीरकर व श्री. संदेश सुरोसे यांचीही उपस्थिती लाभली.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सुभाष विखे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमास डॉ. गजानन वसू, डॉ. अनिकेत वायकर, श्री. प्रमोद राठोड व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ऊर्जासंवर्धनाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.






वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारा सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी बैलचलित आधुनिक अवजारांचे वाटप

 बैलचलित सुधारित शेती अवजारांमुळे खर्चात २५ टक्के बचत शक्य – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पांतर्गत (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजना) विकसित करण्यात आलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारे व यंत्रांचे वाटप दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी मौजे इट, तालुका गेवराई, जिल्हा बीड येथे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सुभाष साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री उद्धव गर्जे, पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजनाचे प्रभारी अधिकारी डॉ. दयानंद टेकाळे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हनुमान गरुड, कृषी अभियंता डॉ. सुरपाम यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदर अवजारे मौजे इट येथील गुगळादेवी शेतकरी गट, सह्याद्री महिला शेतकरी गट तसेच प्रगतशील शेतकरी श्री. रामप्रसाद डोईफोडे यांना सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी तसेच शेतीतील विविध मशागतीच्या कामांसाठी वापराच्या उद्देशाने देण्यात आली.

वाटप करण्यात आलेल्या अवजारांमध्ये क्रीडा टोकन यंत्र, धसकटे गोळा करण्याचे अवजार, तीन फाळीचे खत कोळपे, बहुउपयोगी अवजार, सौरऊर्जाचलित फवारणी यंत्र, कापूस खत व बी टोकन यंत्र, हळद व आल्याचे काढणी अवजार, सुधारित आंतरमशागत अवजारे, बैलगाडीचे जू  इत्यादी अवजारांचा समावेश होता.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सेंद्रिय शेतीला चालना देण्यात येत असून, विद्यापीठाने विकसित केलेली बैलचलित सुधारित शेती अवजारे व यंत्रांचा वापर केल्यास मशागतीवरील खर्च लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. पशुसंवर्धन यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या अवजारांचा योग्य वापर केल्यास शेतकऱ्यांना शेतीतील मशागतीचा खर्च २० ते २५ टक्क्यांनी घटविता येईल, तसेच उत्पादनातही २० ते २५ टक्के वाढ साधता येईल, असे त्यांनी प्रतिपादन केले.

या प्रसंगी डॉ. राकेश अहिरे व डॉ. हनुमान गरुड यांनीही शेतकऱ्यांना बैलचलित सुधारित शेती अवजारे व यंत्रांचा वापराबाबत मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात डॉ. दयानंद टेकाळे यांनी शेतकऱ्यांनी सदर अवजारांचा काटेकोर वापर करून बियाणे, खते, औषधे व मजुरीवरील खर्च कमी करावा तसेच बैलचलित अवजारे वापरून सेंद्रिय व नैसर्गिक शेती अधिक प्रभावीपणे करावी, असे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पशुसंवर्धन यांत्रिकीकरण योजनेचे पशुशास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख, इंजि. अजय वाघमारे, दीपक यंदे व मंगेश खाडे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमास मौजे इट येथील सह्याद्री महिला शेतकरी गट व गुगळादेवी शेतकरी बचत गटाचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी डॉ. संदेश देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.







मराठवाड्यातील कोरडवाहू शेतीसाठी खरीप आढावा व रब्बी नियोजन कार्यशाळा संपन्न

कोरडवाहू शेतीसाठी नैसर्गिक शेती व कृषि संलग्न उपक्रमांचा समन्वय गरजेचा.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या वतीने “मराठवाडा विभागातील कोरडवाहू शेतीत खरीप हंगामाचा आढावा व रब्बी पीक व्यवस्थापन नियोजन” या विषयावर एकदिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले.

या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. उद्घाटनपर मार्गदर्शनात त्यांनी कोरडवाहू शेतीचे व्यवस्थापन करताना जमिनीचे जैविक घटक व आरोग्य जपणे अत्यंत महत्त्वाचे असून, यासाठी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्र राज्य नैसर्गिक शेतीसाठी कटिबद्ध असून त्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कोरडवाहू शेती ही केवळ पिकांचे उत्पादन वाढविण्यापुरती मर्यादित नसून, त्यामध्ये फलोत्पादन, पशुधन विकास, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, रेशीम शेती आदी कृषि संलग्न घटकांचाही समावेश असून, या सर्व बाबी एका छत्राखाली राबवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व उपक्रमांचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे कल्याण, त्यांचे उत्पन्न व आनंद वाढवणे हा असला पाहिजे. यासाठी कोरडवाहू शेतीत पाणी बचत करणारे तंत्रज्ञान, जमिनीचे आरोग्य सुधारण्याच्या पद्धती, सेंद्रिय घटकांची निर्मिती तसेच प्रभावी लागवड तंत्रांचा अवलंब करणे आवश्यक आहे. मात्र, या शिफारशी देताना शेतकऱ्यांच्या अवलंबनामध्ये गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी सर्व शास्त्रज्ञांनी समन्वयाने चर्चा करून शेतकरी-उपयुक्त व सहज अवलंबण्याजोग्या शिफारशी द्याव्यात. तसेच मराठवाड्यातील कोरडवाहू शेतीसाठी संशोधन, विस्तार व कृषि विभाग यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात आयसीएआर-क्रिडा, हैदराबाद येथील प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत खरीप हंगामाचा आढावा व रब्बी पीक व्यवस्थापनावर सादरीकरण सहसंचालक कृषि श्री. सुनील वानखेडे (छत्रपती संभाजीनगर विभाग) तसेच श्री. महेश तिर्थकर (लातूर विभाग) यांनी केले. सध्याच्या व आगामी हवामान अंदाजाबाबत माहिती डॉ. के. के. डाखोरे, मुख्य शास्त्रज्ञ (कृषि हवामानशास्त्र) यांनी दिली. प्रास्ताविक प्रभारी अधिकारी डॉ आनंद गोरे यांनी केले.

लातूर, अंबाजोगाई, परभणी, नांदेड व छत्रपती संभाजीनगर येथील विस्तार कृषि विद्यावेत्ता यांच्या अनुभवांवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापनाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

रब्बी पीक व्यवस्थापनावर सादरीकरण करताना कृषिशास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे (कृषिविद्याशास्त्र), डॉ. मदन पेंडके (कृषि अभियांत्रिकी), विभाग प्रमुख डॉ. प्रफुल घंटे (वनस्पती रोगशास्त्र), डॉ. गजेंद्र लोंढे (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र), डॉ. विश्वनाथ खंदारे (फलोत्पादन), सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुर्यकांत पवार, प्रभारी अधिकारी डॉ. शिवाजी शिंदे (केळी संशोधन केंद्र), डॉ. संजय पाटील (फळ संशोधन केंद्र), डॉ. किरण जाधव (एकात्मिक शेती पद्धती योजना)आणि शास्त्रज्ञ डॉ. वसंत सुर्यवंशी, (कृषिविद्याशास्त्र), डॉ. गणेश गायकवाड (मृदा शास्त्र), डॉ.अनंत लाड (कीटकशास्त्र), डॉ. राजेश भालेराव यांनी पीक, पालोत्पादन, पशुधन उत्पादन वाढ, कीड-रोग व्यवस्थापन, मृदा आरोग्य व यांत्रिकीकरण याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी (DSAO), तालुका कृषि अधिकारी (TAO), मंडळ कृषि अधिकारी (CAO), कृषि विज्ञान केंद्रे (KVK) तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला. संवाद सत्रात क्षेत्रीय समस्यांवर चर्चा करत शाश्वत व शेतकरी-केंद्रित उपाययोजनांवर भर देण्यात आला.

शेवटी या कार्यशाळेतून मिळालेल्या शिफारशी शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे आयोजकांनी  आवाहन केले. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत होणार असून रब्बी हंगामातील उत्पादनक्षमतेत वाढ होण्यास हातभार लागेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन डॉ. गणेश गायकवाड व पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मदन पेंडके यांनी केले.