Thursday, December 18, 2025

शेतकरी देवो भव: संकल्पनेतून शेतकरी-केंद्रित, शाश्वत व उद्योजक शेतीकडे वाटचाल – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वनामकृविच्या खामगाव येथील केव्हिकेद्वारा आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिकांतर्गत ईट (बीड) येथे तूर शेती दिन व पीक पाहणी कार्यक्रम संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि  विज्ञान केंद्र, खामगाव (ता. गेवराई, जि. बीड), महाबीज बीड, कृषि  विभाग, आत्मा तसेच पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिक उपक्रमांतर्गत तूर शेती दिन व पीक पाहणी कार्यक्रम दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी बीड तालुक्यातील मौजे ईट येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला.

अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि लाभले, उद्घाटक गोरक्षनाथ टेकडीचे महंत हभप नवनाथ बाबा तर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, जिल्हा अधीक्षक कृषि  अधिकारी (बीड) श्री सुभाष साळवे, महाबीजचे जालना येथील विभागीय व्यवस्थापक श्री राजाभाऊ मोराळे, तसेच महाबीज बीड जिल्हाचे व्यवस्थापक श्री अजय फुलझेले हे होते.  प्रमुख उपस्थितीमध्ये इटचे सरपंच श्री गणपत डोईफोडे, उपविभागीय कृषि  अधिकारी श्री उद्धव गर्जे, पानी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक श्री संतोष शिनगारे तसेच डॉ गिते  हे लाभले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बदनापूर येथील कृषि  संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दिपक पाटील, कृषि  विस्तार विद्यावेता प्रा. अरुण गुट्टे यांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाचे कार्य शेतकरी देवो भव:” या भावनेतून सुरू असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी हा केवळ लाभार्थी नसून तो विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बदलत्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेतीस प्रोत्साहन देणे काळाची गरज असल्याचे सांगत, पर्यावरणपूरक व शाश्वत शेती पद्धती स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.

शेतकरी मजबूर नव्हे तर मजबूत झाला पाहिजे, यासाठी संशोधन, तंत्रज्ञान व विस्तार कार्याच्या माध्यमातून विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शेतकरी महिलांनी पुढे येऊन नेतृत्वाची भूमिका बजावावी, महिलाशक्तीच्या सहभागातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय शेतकरी केवळ उत्पादक न राहता शेतकरी उद्योजक बनला पाहिजे, मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग व बाजारपेठेशी थेट जोड निर्माण करून उत्पन्नवाढ साधता येईल, असे मत माननीय कुलगुरूंनी व्यक्त केले. विद्यापीठ शेतकरी-केंद्रित संशोधन व प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी-केंद्रित विस्तार कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, शाश्वत शेती पद्धती व उत्पादनवाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ. दिपक पाटील यांनी तूर पिकाचे सद्यस्थितीतील महत्त्व स्पष्ट करत पिक व्यवस्थापन करताना घ्यावयाच्या काळजीबाबत सखोल व उपयुक्त मार्गदर्शन केले. महाबीजचे श्री. मोराळे यांनी बियाणे, बीजोत्पादन प्रक्रिया तसेच महाबीज निर्मित विविध उत्पादनांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच श्री. सुभाष साळवे यांनी कृषि महाविस्तार ॲप विषयी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देत त्याचा प्रत्यक्ष उपयोग समजावून सांगितला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. हनुमान गरुड यांनी केले. यावेळी शेतकरी श्री. रामप्रसाद डोईफोडे यांनी मनोगत व्यक्त करताना तूर पिकाच्या एसओपीवर आधारित गीत सादर केले तसेच तूर पिकाचे नियोजन, लागवड व व्यवस्थापनाबाबत आपले अनुभव मांडले.

यानंतर श्री. रामप्रसाद डोईफोडे यांच्या शेतावर राबविण्यात आलेल्या आद्यरेषीय पिक प्रात्यक्षिक तूर शेतीची पाहणी करण्यात आली. या ठिकाणी प्रा. अरुण गुट्टे यांनी तूर पिकाच्या विविध टप्प्यांवरील व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन महाबीजच्या क्षेत्र अधिकारी कविता देवढे यांनी केले तर आभार प्रा. किशोर जगताप यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रगतशील शेतकरी श्री. रामप्रसाद डोईफोडे, कृषि  विज्ञान केंद्राचे डॉ. तुकेश सुरपाम, डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, श्री. गजेंद्र आढावे, श्री. दत्तप्रसाद वीर, श्री. विजयकुमार चांदणे, महाबीज, कृषि विभाग तसेच पानी फाउंडेशनचे श्री. महेश लाखे, श्री. संतोष शिनगारे, शिवलेश्वर मेदने व विशाल घोलप यांनी अथक परिश्रम घेतले.