Thursday, December 18, 2025

वनामकृवित बदलत्या हवामानात पीक संरक्षणावर राष्ट्रीय परिसंवादाचा यशस्वी समारोप

रोगशास्त्र व कीटकशास्त्र विभाग वेळेवर निदान करून अल्प खर्चातील प्रभावी उपाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्वाचे... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी बदलत्या हवामान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांचे संरक्षण व शाश्वत वनस्पती आरोग्यया विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद (इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी – पश्चिम विभाग) चा समारोप झाला. या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन परभणी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभाग, नवी दिल्ली इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी व असोसिएशन ऑफ प्लांट पॅथॉलॉजिस्ट्स (इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माननीय माजी कुलगुरू डॉ. विलास भाले, उपस्थित होते. व्यासपीठावर आयसीएआर–आयएआरआय, नवी दिल्ली येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रतिभा शर्मा, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या माजी संचालक तथा डाळिंब रोग शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, अकोला येथील कृषी वनस्पती रोगशास्त्रज्ञ संघाचे अध्यक्ष श्री. बी. टी. राऊत, परिसंवादाचे संयोजक डॉ. विक्रम घोळवे व सहसंयोजक डॉ. गजेंद्र जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात नुकताच विद्यापीठास प्राप्त झालेल्या ‘वेटरन्स इंडिया – प्राईड ऑफ नेशन अवॉर्ड २०२५’ या मानाच्या पुरस्काराबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व विद्यापीठाचा इंडियन फाइटोपॅथॉलॉजिकल सोसायटी (IPS), कृषि वनस्पती रोगशास्त्रज्ञ संघ तसेच विद्यापीठातील सर्व महाविद्यालये, विभाग व कार्यालयांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी माननीय कुलगुरू यांनी विद्यापीठाच्या गौरवशाली परंपरा, दर्जेदार शिक्षण, संशोधन व शेतकरी-केंद्रित विस्तार कार्यावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले. बदलत्या हवामान परिस्थितीत पीक संरक्षण व शाश्वत कृषी विकासासाठी विद्यापीठ सातत्याने कार्यरत असून, या राष्ट्रीय परिसंवादातून प्राप्त शिफारशींवर आधारित बहुविषयक व उपयुक्त संशोधन हाती घेण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले. कृषी वनस्पती रोगशास्त्र व कीटकशास्त्र विभागांद्वारे किडी व रोगांचे वेळेवर निदान करून अल्प खर्चात प्रभावी उपाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. पोकरा, स्मार्ट प्रकल्प व ‘महाॲग्री’ अ‍ॅपमुळे महाराष्ट्र कृषी विकासासाठी दिशादर्शक राज्य ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करत, विद्यार्थिनींच्या वाढत्या यशाचा उल्लेख त्यांनी केला. परिसंवादाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रोगशास्त्र विभागाचे अभिनंदन करून, अद्ययावत सुविधा वापरून दर्जेदार व शेतकरीहिताचे संशोधन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

माननीय माजी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सांगितले की या विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागाने विविध पिकांसाठी रोगप्रतिकारक वाणांच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले आहे. सध्या अन्नधान्य व फळपिकांचे उच्च उत्पादन घेतले जात असले तरी त्यासोबत काही गंभीर समस्या देखील निर्माण होत आहेत. उत्पादनात वाढ होत असताना साठवणूक प्रक्रियेपर्यंत अन्नधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असल्याचे दिसून येते. या नासाडीवर प्रतिबंधात्मक उपाय शोधणे व त्यावर सखोल संशोधन करणे अत्यावश्यक आहे. यासोबतच संशोधनासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी व शास्त्रज्ञांनी आपले तंत्रज्ञान व संशोधन व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून करावे, असे आवाहन त्यांनी केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आयोजकांचे अभिनंदन करताना सांगितले की, या परिसंवादातून विषयानिहाय महत्त्वपूर्ण शिफारशी मांडण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसोबतचे संवाद सत्र अत्यंत प्रभावी ठरले असून, त्यातून संशोधनासाठी योग्य दिशा मिळेल. या दिशेने संशोधनात सातत्य ठेवून शेतकरीहित-केंद्रित कार्य करावे, असे त्यांनी सुचविले. तसेच अशा प्रकारच्या उपक्रमांचे विद्यापीठातील इतर महाविद्यालये व विभागांनीही अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

संयोजक सचिव डॉ. विक्रम घोळवे यांनी परिसंवादाचा सविस्तर अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, इंडियन फाइटोपॅथॉलॉजिकल सोसायटी (IPS) तसेच रोगशास्त्रज्ञ संघटनेच्या प्रतिनिधींनी परिसंवादासाठी उपस्थित राहून दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच प्रमुख वक्ते, सहभागी शास्त्रज्ञ व विद्यार्थी, विद्यापीठाची प्रशासकीय यंत्रणा तसेच परिसंवादाच्या विविध समित्यांचे अध्यक्ष व सदस्य यांचे मोलाच्या सहकार्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

परिसंवादामध्ये एकूण १३० शास्त्रज्ञ आणि १९० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सहभागी शास्त्रज्ञांनी लीड पेपर तसेच त्यांच्या संशोधनात्मक शोधनिबंधांचे सादरीकरण केले. या परिसंवादामध्ये एकूण नऊ प्रमुख विषय (Major Themes) होत्या. यामध्ये पीक संरक्षणासाठी हवामान-ताण सहनशील धोरणे, एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापनातील प्रगती, वनस्पती रोग दमनासाठी मृदा आरोग्य व सूक्ष्मजीव परिसंस्थेची (मायक्रोबायोम) गतीशीलता, शाश्वत पीक व्यवस्थेसाठी कृषी-परिसंस्थात्मक (Agroecological) दृष्टिकोन, पीक संरक्षणातील उदयोन्मुख तंत्रज्ञान व डिजिटल नवकल्पना, वनस्पती आरोग्य सुधारण्यासाठी नैसर्गिक व सेंद्रिय शेती प्रणाली, शाश्वत वनस्पती संरक्षणासाठी धोरणात्मक कार्यपद्धती व शेतकरी-नेतृत्वाखालील उपक्रम, वनस्पती आरोग्य व्यवस्थापनासाठी क्षमता वृद्धी व सार्वजनिक–खाजगी भागीदारीचे बळकटीकरण, शाश्वत पीक व्यवस्थापनात सामाजिक जनजागृती व समुदाय सहभाग तसेच फळे व भाजीपाला पिकांचे एकात्मिक काढणोत्तर (Post-Harvest) व्यवस्थापन या विषयांचा सामवेश होता.

या परिसंवादातून शेतकरी हित केंद्रित तसेच भविष्यातील संशोधनाची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण शिफारशी मांडण्यात आल्या. या शिफारशींवर आधारित स्थलनिहाय (Location-specific) संशोधन हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

परिसंवादात विविध विषयांनुसार सत्रांमध्ये मौखिक व भित्तिपत्रक सादरीकरणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व संशोधकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच परिसंवादाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांच्या वतीने आणि मान्यवरांच्या शुभहस्ते संबंधितांना प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे प्रदान करून गौरविण्यात आले.

परिसंवादाच्या यशस्वी आयोजनात वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, आयोजक सचिव (IPS–पश्चिम विभाग) व प्राध्यापक डॉ. विक्रम घोळवे, तसेच सह–आयोजक सचिव व प्राध्यापक डॉ. गजेंद्र जगताप, डॉ. संदीप बडगुजर, डॉ. चंद्रशेखर आंबाडकर, डॉ. अनंद  दौंडे, डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. संतोष वाघमारे, डॉ. संतोष  पवार, डॉ. सचिन सोमवंशी, डॉ. दिलीपकुमार हिंगोले, डॉ. सुनिता मगर, डॉ. रवी चव्हाण, तसेच सर्व सहाय्यक कर्मचारी, पीएच.डी. व पदव्युत्तर (पी.जी.) विद्यार्थी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. समारोप कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच वनस्पती रोगशास्त्र विभागाचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.