Wednesday, April 30, 2025

बायोमिक्समुळे शेतकऱ्यांना उत्पादनात विक्रमी वाढ – माननीय श्री. परिमल सिंह यांची विद्यापीठातील बायोमिक्स संशोधन व निर्मिती केंद्रास भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील बायोमिक्स संशोधन व निर्मिती केंद्रास नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक माननीय श्री. परिमल सिंह (भा.प्र.से.) यांनी दिनांक ३० एप्रिल रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी बायोमिक्सच्या संशोधन कार्याचा आढावा घेतला व त्याच्या वापरामुळे शेतीमध्ये घडत असलेल्या सकारात्मक बदलांबाबत समाधान व्यक्त केले.

हळद, अद्रक, फळपिके व भाजीपाला पिकांमध्ये बायोमिक्सच्या वापरामुळे विक्रमी उत्पादन नोंदवले गेले असून, हे जैविक मिश्रण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. त्यामुळे बायोमिक्सचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे,” असे गौरवोद्गार माननीय श्री. परिमल सिंह (भा.प्र.से.) यांनी काढले.

शेतकऱ्यांमध्ये बायोमिक्सची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून, त्याच्या वापरामुळे जमिनीतील मित्र बुरशी व मित्र जिवाणूंची संख्या वाढते, जे वनस्पतीच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे मृद विज्ञान तंत्रज्ञ श्री. विजय कोळेकर, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी बायोमिक्सबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, या जैविक मिश्रणामुळे जमिनीजन्य रोगांवर व कीड नियंत्रणावर प्रभावी उपाय मिळतो. यामुळे रासायनिक कीटकनाशकांवरील खर्चात बचत होते, पिकांचे आरोग्य सुधारते आणि उत्पादनात वाढ होते.


वनामकृविच्या नाहेप-डीएफएसआरडीए केंद्रास माननीय श्री. परिमल सिंह यांची सदिच्छा भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या नाहेपअंतर्गत डीएफएसआरडीए केंद्रास नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक माननीय श्री. परिमल सिंह (भा.प्र.से.) यांनी दिनांक ३० एप्रिल रोजी सदिच्छा भेट दिली.

या प्रसंगी हवामान आधारित सेंसर प्रणालीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय पिक पद्धतीनुसार शेतकऱ्यांना परवडणारी, स्वस्त व उच्च प्रतीची तंत्रज्ञाने विकसित करून ती नव लघुउद्योजकांना कराराद्वारे उपलब्ध करून देण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच एग्री-बॉट, एग्री-ड्रोन, एग्री-एजीवी आणि एग्री-एआय प्रयोगशाळांना भेट देत, डीएफएसआरडीए केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाल शिंदे यांच्याशी विविध अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा केली.

डॉ. शिंदे यांनी ग्राफ्टिंग रोबोट व ३-डी प्रिंटरसारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर करून तंतोतंत व डिजिटल शेती कशी विकसित करता येईल याविषयी सादरीकरण केले.

या भेटीदरम्यान विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठस्तरीय वार्षिक व आकस्मिक उपक्रम रचनेबाबत मार्गदर्शन घेतले.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे मृद विज्ञान तंत्रज्ञ श्री. विजय कोळेकर, विद्यापीठाचे डॉ. प्रवीण कापसे व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भेटीनंतर माननीय श्री. परिमल सिंह यांची विशेष मुलाखत नाहेप केंद्राच्या डिजिटल स्टुडिओमध्ये प्रमुख डॉ. प्रवीण कापसे यांनी घेतली. या मुलाखतीतून त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञाने पोहचविण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले.

या संपूर्ण भेटी दरम्यान तांत्रिक सहायक श्री. जगदीश माने, श्री. नितीन शहाणे आणि श्री. दीपक समिंद्रे यांनी परिश्रम घेतले.

माननीय श्री. परिमल सिंह यांच्या मुलाखतीची लिंक - https://youtu.be/1naeTivTNiA


पुणे कृषि आयुक्तालयाचे आत्मा संचालक श्री. अशोक कीरनाळी यांची वनामकृविच्या सेंद्रीय शेती केंद्राला सदिच्छा भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राला पुणे येथील कृषि आयुक्तालयाच्या आत्मा योजनेचे संचालक माननीय श्री. अशोक कीरनाळी यांनी दिनांक ३० एप्रिल रोजी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे जिल्हा मोहिम अधिकारी श्री. सामाले व सेंद्रीय शेती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. आनंद गोरे यांची उपस्थिती होती.

माननीय श्री. अशोक कीरनाळी यांनी सेंद्रिय शेतीतील विविध प्रकल्पांची पाहणी करत सविस्तर माहिती घेतली. त्यांनी सेंद्रिय टरबूज संशोधन प्रयोग, गांडुळ खत उत्पादन युनिट, लाल कंधार गायींचा गोठा तसेच चारा पिके प्रक्षेत्र यांना भेट देत त्यातील कामगिरीचे कौतुक केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, नैसर्गिक शेतीमध्ये गट शेती आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून निविष्ठा (इंपुट्स) निर्मिती व वापर यावर भर दिला पाहिजे. तसेच कमी खर्चिक व प्रभावी निविष्ठांचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन पोहचवणे आवश्यक आहे.

त्यांच्या मार्गदर्शनामुळे केंद्रातील कार्यरत संशोधक व अधिकारी यांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाल्याचे मत डॉ. आनंद गोरे यांनी व्यक्त केले.







‘जल व्यवस्थापन कृति पंधरवडा २०२५’ समारोप सोहळा उत्साहात संपन्न; जल व्यवस्थापनात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

 पाण्याचे योग्य व्यवस्थापन व बचत ही काळाची गरज... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

जलसंपदा विभागपरभणी व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जल व्यवस्थापन कृति पंधरवडा २०२५’ चा समारोप व गौरव सोहळा मोठ्या उत्साहात दिनांक ३० एप्रिल रोजी पार पडला. या कार्यक्रमात जल व्यवस्थापनाच्या विविध पातळ्यांवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी सेवानिवृत्त सचिव जलसंपदा विभाग श्री. अजय कोहीरकर, परभणी महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. धैर्यशील जाधव, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता व पालक अभियंता श्री इ. म. चिस्ती, कार्यकारी अभियंता श्री प्रसाद लांब (माजलगाव), श्री रुक्मानंद गरूड (गंगाखेड), श्री चंद्रशेखर तरटे (परभणी), मुंबई विद्यापीठाचे प्रा. बडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रकल्पाच्या कालव्यावर जलपूजन करून करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलनाने मुख्य समारंभास आरंभ झाला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पाणी हे प्रत्येक कृतीचे मूळ असून, त्याचे योग्य व्यवस्थापन व बचत हे काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, सिंचनासाठी पाण्याचे योग्य नियोजन शेतकऱ्यांनी करावे व पाणी वापर संस्था यांचा प्रभावी वापर करावा. कृषी विद्यापीठ सदैव जल व्यवस्थापनासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन देण्यास तयार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी आगामी काळात जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या प्रशिक्षणात कालवा सिंचन प्रणालीपासून पीक व्यवस्थापनापर्यंत सर्व बाबींवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच बोलतांना त्यांनी जलसंपदा विभाग यांचे विशेष अभिनंदन केले की, सिंचन व पाणी व्यवस्थापन बाबत कृषी क्षेत्राशी सर्व विभागांना एकच व्यासपीठावर एकत्र आणून कृषी क्षेत्रात क्रांती निर्माण करण्याचे प्रयत्न केले व याच प्रमाणे सदैव पुढे हे कार्य चालत रहावे, अशा भावना व्यक्त केल्या.

सेवानिवृत्त सचिव श्री. अ. प्र. कोहीरकर यांनी आपल्या ४० वर्षांच्या अनुभवाद्वारे उपस्थितांना जल व्यवस्थापनाशी संबंधित धोरणे, कायदे (MMSIF, MWRRA) व अंमलबजावणीबाबत सखोल मार्गदर्शन केले. पाणी आवर्तनादरम्यान येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना कशा कराव्यात, याचीही माहिती दिली.

या कार्यक्रमास परभणीचे जिल्हाधिकारी मा. श्री. रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती नितीशा माथुर, व अपर जिल्हाधिकारी मा. डॉ. प्रताप काळे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. परभणी महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. धैर्यशील जाधव यांनीही मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.

कार्यक्रमास जलसंपदा विभाग, परभणीचे सर्व अधिकारी, कर्मचारी व सुमारे २०० शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जल व्यवस्थापनाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल शाश्वत सिंचन व्यवस्थापनाची पायाभरणी करणारे ठरेल, असा विश्वास कार्यक्रमाच्या यशस्वीतेतून व्यक्त करण्यात आला.





वनामकृवितील सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पास नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे माननीय संचालक श्री. परिमल सिंह यांची सदिच्छा भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाला नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक माननीय मा. श्री. परिमल सिंह (भा.प्र.से.) यांनी आज दिनांक ३० एप्रिल रोजी सदिच्छा भेट दिली.

या प्रसंगी बोलताना माननीय श्री. परिमल सिंह यांनी शाश्वत शेतीसाठी पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन व संचयन करणे अत्यंत गरजेचे असून, ठिबक सिंचन पद्धतीच्या माध्यमातून सौर ऊर्जेचा वापर हा शेतकऱ्यांसाठी परिवर्तन घडवणारा ठरू शकतो, असे मत व्यक्त केले.

या भेटीदरम्यान नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे मृद विज्ञान तंत्रज्ञ श्री. विजय कोळेकर, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषि वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, प्रभारी अधिकारी डॉ. हरीश आवारी तसेच ॲग्रोवनचे जिल्हा प्रतिनिधी श्री. माणिक रासवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

ही भेट विद्यापीठाच्या संशोधन व क्षेत्रीय प्रयोगांना चालना देणारी ठरली असून, भविष्यात शाश्वत शेतीसाठी विद्यापीठ व प्रकल्प कार्यालय यांच्यातील समन्वय अधिक बळकट होईल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात इस्कॉनद्वारे अध्यात्म आणि सेंद्रिय शेतीचा संगम

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली श्री चैतन्य बेस भक्त स्नेह मिलन २०२५ उत्साहात संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे २६ व २७ एप्रिल २०२५ रोजी इस्कॉन (ISKCON) तर्फे “श्री चैतन्य बेस भक्त स्नेह मिलन २०२५” या भक्तिमय स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या इंद्रधनुष्य इमारतीत पार पडलेल्या या कार्यक्रमात अध्यात्म, सेंद्रिय शेती आणि मानवतावाद यांचा सुंदर समन्वय पाहायला मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, तसेच इस्कॉनचे ठाणे, मुंबई, वृंदावन व लातूर येथून आलेले भक्तगण सहभागी झाले होते. 

या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, “मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी अध्यात्माची साथ अत्यावश्यक असून, प्रत्येकाने काही ना काही आध्यात्मिक साधनेचे पालन करणे गरजेचे आहे.”

कुलसचिव श्री संतोष वेणीकर यांनी इस्कॉनच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याचा गौरव करताना मानवतेसाठी अध्यात्म किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित केले.

विभागप्रमुख डॉ. राजेश कदम यांनी इस्कॉनच्या स्थापनेपासूनचा प्रवास उलगडत सांगितले की, “जगभरात इस्कॉनचे सुमारे १५ लाख सक्रिय सदस्य असून, सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी इस्कॉन विशेष कार्यरत आहे. या कार्यात अनेक कृषी पदवीधर सहभागी होत आहेत. यामुळे मानवजीवन व पर्यावरण संरक्षणास मोठा हातभार लागत आहे.” तसेच त्यांनी श्रीमद् भगवद्गीतेतील संदेश आचरणात आणण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात श्री तरुण नित्या प्रभुजी (गोवर्धन इको व्हिलेज), श्री देवानंद पंडित प्रभुजी (वृंदावन), श्री बलदेव प्रभुजी (मुंबई), डॉ. दिनानाथ प्रभुजी (परभणी), परमगोपाल प्रभुजी (लातूर), डॉ. सर्वेश्री माताजी आदी मान्यवरांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या स्नेह मिलनात परभणी येथील १०० हून अधिक भक्तांनी सहभाग नोंदवला. गीतापठण, कीर्तन, संवाद आणि सेंद्रिय शेती विषयक चर्चासत्र या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.



Tuesday, April 29, 2025

राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत परभणी विद्यापीठाचा सहभाग – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभेच्छा!

 

अयोध्या येथे दिनांक २ मे २०२५ ते ४ मे २०२५ या कालावधीत कुमारगंज येथील आचार्य नरेंद्र देव कृषि तंत्रज्ञान विद्यापीठात “अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठीय क्रीडा महोत्सव २०२४-२५” आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे क्रीडा संघ सहभागी होण्यासाठी अयोध्याकडे आज दिनांक २९ एप्रिल रोजी रवाना झाले. संघाच्या या महत्त्वपूर्ण सहभागासाठी आणि यशासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच स्पर्धेत यश मिळविण्यासाठी विशेष टिप्स देवून मार्गदर्शन केले. समवेत शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम हे होते.

या क्रीडा महोत्सवात भारतातील विविध विद्यापीठे आपले संघ विविध क्रीडा प्रकारांत उतरवणार असून परभणी विद्यापीठाकडून बॅडमिंटन (मुले/मुली), टेबल टेनिस (मुले), मैदानी स्पर्धा (मुले/मुली), कबड्डी (मुले), खो-खो (मुले), बास्केटबॉल (मुले) या क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा खेळल्या जाणार आहेत.

स्पर्धेसाठी विद्यापीठातर्फे पात्र खेळाडूंची निवड पारदर्शक पद्धतीने करण्यात आली असून अंतिम निवड झालेले सर्व ४० खेळाडू प्रशिक्षकासह अयोध्याकडे रवाना झाले.

या महोत्सवात देशभरातील विविध कृषि विद्यापीठांतील प्रतिभावान खेळाडूंच्या सहभागामुळे क्रीडा व सौहार्दाचा एक सुंदर संगम पाहायला मिळणार आहे.




वनामकृवित मराठवाड्यातील खरीप नियोजनासाठी दोन दिवसीय कार्यशाळेला प्रारंभ

 विद्यापीठ आणि कृषि विभागाचे संयुक्त आयोजन; शेतकरी केंद्रस्थानी ठेवून विविध तंत्रज्ञानावर मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या खरीप हंगामासाठी दोन दिवसीय 'विभागीय खरीप नियोजन कार्यशाळा’ दिनांक २९ व ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन २९ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले.

या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. या कार्यशाळेस विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, व संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, राज्य शासनाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक श्री रफीक नाईकवाडी, विभागीय कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर (लातूर), श्री प्रकाश देशमुख (छत्रपती संभाजीनगर), प्रगतशील शेतकरी श्री कांतरावकाका देशमुख आणि श्री चंद्रकांतदादा वरपूडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, शेतीसाठी ज्ञानाची गरज आहे. शेतकऱ्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी त्यांच्यापर्यंत विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग करत आहे, म्हणून कृषि विभागाच्या कृषि सहाय्यकापासून ते सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि विद्यापीठातील शास्त्रज्ञांची सहा महिन्यातून एकदा भेट होवून चर्चा होणे आवश्यक आहे. आपल्याला ज्याचे पर्यवेक्षण करायचे आहे, त्याचे भरपूर ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणून कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यापीठातील प्रात्यक्षिकाद्वारे तसेच प्रयोगशाळेतील प्रयोगांची पाहणी करून आपले ज्ञान वाढवावे व ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावे. यावेळी माननीय कुलगुरूनी त्यांचे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी जे अब्दुल कलाम यांच्यासोबत ते राष्ट्रपती होण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचे वर्णन केले. शेतकऱ्यांची पीक पद्धती बदललेली आहे. ती योग्य आहे का नाही हे समजावून सांगून योग्य तंत्रज्ञान देण्याची गरज आहे. याबरोबरच विज्ञान वाढत चाललेले असून दिवसेंदिवस अनेक संशोधने होत असतात. याचे ज्ञान कृषि विभागाच्या अधिकाऱ्याकडे आहे, त्याला अद्यायावत करण्याची गरज असते. त्यातील बारकावे प्रशिक्षणातून समजून घेऊन त्याविषयीची जाण आणि अभ्यास करावा व त्यातील महत्त्वपूर्ण बाबींचा शेतकऱ्यांना लाभ करून द्यावा, असे आवाहन केले. तसेच त्यांनी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांचे स्वभावातील विश्वास आणि संयम या गुणांचे वर्णन करून शेतकऱ्यांसोबत चांगले संबंध जोडलेले आहेत, याबद्दल त्यांचे कौतुक केले. कृषि क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांचेच अस्तित्व शेतकऱ्यावर अवलंबून आहे. हे जाणून विद्यापीठ “शेतकरी देवो भव:” या भावनेतून नियमित विस्तार कार्यासोबत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत आणि आठवड्यातून दोन दिवस ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवादाद्वारे अविरत कार्य करत आहे. शेतकऱ्यांसाठी कृषि क्षेत्रातील सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची आवश्यकता आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये इच्छाशक्ती आणि कार्य तत्परता असून त्यांना शेती तंत्रज्ञानाची गरज आहे. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी एखादा वाहन किंवा तंत्रज्ञान विकसित विकसित करणे जितके महत्त्वाचे आहे, त्याहून अधिक ते किती शेतकऱ्यापर्यंत पोहोचले हे अधिक महत्त्वाचे आहे. सध्या विद्यापीठाचा तुरीचा गोदावरी वाहन याचे उत्तम उदाहरण असून ते संपूर्ण महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये पोहोचले आहे, असे नमूद केले.

कार्यशाळेत दुपारच्या सत्रात महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव (कृषि) मा. श्री. विकासचंद्र रस्तोगी (भाप्रसे), आभासी माध्यमातून सहभागी झाले होते. ते म्हणाले की, कृषि विद्यापीठांनी विकसित केलेले पीकांचे वाण, शिफारशी, नवीन तंत्रज्ञान ठराविक शेतकऱ्यांपर्यंत नव्हे तर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी ग्राम कृषि विकास समितीची मदत घ्यावी. ज्या गावात समित्या स्थापन केल्या नाहीत तेथे स्थापन कराव्यात. स्थापन झालेल्या समित्या सक्रिय कराव्यात. शेतकरी गट, कंपन्यांनी तयार केलेल्या खरिप हंगाम आराखड्याचा तालुका स्तरावर आढावा घेण्यात यावा. पोकरा अंतर्गत हवामानुकुल तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी पीकनिहाय शेतीशाळा आयोजित कराव्यात. येत्या खरिपासाठी पुरेशा प्रमाणात बियाणे, खते आदी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे अशा सूचना त्यांनी केल्या.

प्रास्ताविकात विभागीय कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर यांनी विभागीय खरीप हंगामा कार्यशाळेमध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याचे अधीक्षक कृषि अधिकारी, आत्म्याचे प्रकल्प संचालक, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचा समावेश आहे असे सांगितले. तसेच खरीप हंगामाची पूर्वतयारी करून घेण्यासाठी पुणे येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार या कार्यशाळेत मराठवाड्यातील खरिपातील प्रमुख पिके सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मुग या पिकावर शास्त्रज्ञाद्वारे प्रात्यक्षिकाद्वारे आणि व्याख्यानातून मार्गदर्शन मिळणार आहे. खरीप हंगामात पावसाळ्यापूर्वी ८० टक्के कार्य करणे आवश्यक आहे, यामध्ये शेतकऱ्यांची आणि योग्य प्रात्यक्षिके निवड यांचा समावेश आवश्यक आहे, असे नमूद केले.

यावेळी खरीप हंगामाच्या अनुषंगाने विविध तंत्रज्ञानावर आधारित पुस्तके आणि घडी पत्रिकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

दोन दिवस चालणाऱ्या कार्यशाळेत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक मा. श्री. परिमल सिंह (भाप्रसे) यांचे प्रकल्प २ विषयी, मृद विज्ञान तज्ञ श्री. विजय कोळेकर यांचे जमिनीच्या आरोग्यासाठी संवर्धित शेती यावं तसेच विद्यापीठाद्वारे कोरडवाहू मराठवाड्यातील पर्जन्यमानातील अस्थिरता : एस पी आय चे वेळमानानुसार विश्लेषण यावर डॉ. कैलास डाखोरे, हवामान बदलानुसार कोरडवाहू पिक तंत्रज्ञान यावर डॉ. वासुदेव नारखेडे, खरीप हंगामातील गळीत धान्य उत्पादन तंत्रज्ञान यावर डॉ. वसंत सूर्यवंशी, सोयाबीन पिकातील कीड व्यवस्थापन यावर डॉ. आर एस जाधव, सोयाबीन पिकातील रोग व्यवस्थापन यावर डॉ. पी एच घंटे, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याविषयी डॉ. आर व्ही शिंदे, कापूस उत्पादन तंत्रज्ञान याविषयी डॉ. ए डी पांडागळे, खरीप हंगामातील कडधान्य उत्पादन तंत्रज्ञान याविषयी डॉ. डी के पाटील, सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान याविषयी डॉ. जी डी गडदे, खरीप ज्वारी बाजरी व मका पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान यावर डॉ. एल एन जावळे आणि डॉ. एस बी पवार, रसायनिक खत वापरांच्या बचतीसाठी जैविक खतांचे महत्त्व याविषयी डॉ. एच के कौसडीकर, सेंद्रिय नैसर्गिक व एकात्मिक शेती पद्धती याविषयी डॉ. एके गोरे, लिंबूवर्गीय फळ पिकांची व्यवस्थापन याविषयी डॉ. एस जी पाटील, भाजीपाला पिकांचे संरक्षित लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉ. व्ही एस खंदारे आदी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. याबरोबरच कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी श्री चंद्रकांत वरपूडकर श्री दादा लाड श्रीकांतराव देशमुख श्री निलेश देशमुख श्री रमेश देशमुख श्री गंगाधर शृंगारे श्री नंदकिशोर पाटील यांच्या यशोगाथातूनही अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणारअसून विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.



Sunday, April 27, 2025

उद्यानविद्या महाविद्यालयात अंतिम सत्र विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

 विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून समाजासाठी आदर्श ठरावे... शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालय, परभणी येथे अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक २६ एप्रिल  रोजी उत्साहात पार पडला.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माननीय संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार हे लाभले होते. प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, जिमखाना उपाध्यक्षा डॉ. वैशाली भगत तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. एस. आर. बरकुले, डॉ. ए. टी. दौंडे, डॉ. ए. एस. लोहकरे व डॉ. अमोल भोसले मंचावर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे विशेष कौतुक करत, उद्यानविद्या पदवीचे भविष्यकालीन महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून समाजासाठी आदर्श ठरावे, असे प्रेरणादायी आवाहन त्यांनी केले व भावी आयुष्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला व अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाने दिलेल्या विविध सुविधा, शैक्षणिक व अध्यात्मिक विकासाचा गौरवपूर्वक उल्लेख केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. एस. बी. पव्हणे, डॉ. एस. जे. खंडागळे, डॉ. पी. एस. देशमुख, डॉ. आशा सातपुते, श्रीमती शमा पठाण, श्री. एजाज शेख, श्री. अभिजीत देशमुख, श्री. सतीश पुंड, श्री. दत्ता मुकाडे व इतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन नम्रता गिरी व शुभम वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन सरस्वती तायनाथ यांनी केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद देत, निरोप समारंभ संस्मरणीय केला.






"व्हिजन २०४७ : समृद्ध आणि महान भारत" आंतरराष्ट्रीय परिसंवादात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा प्रेरणादायी सहभाग


नवी दिल्ली येथील स्वदेशी शोध संस्थान, मध्यप्रदेशातील इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ (IGNTU) आणि इतर उच्च शिक्षण संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ ते २६ एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित "व्हिजन २०४७ : समृद्ध आणि महान भारत" या आंतरराष्ट्रीय परिसंवादात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांना संसाधन व्यक्ती (Resource Person) म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

या परिसंवादात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्य, द्वैतीय शैक्षणिक भागीदारी आणि सामाजिक-आर्थिक विकासातील बदलती भूमिका यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी भविष्यातील धोरणात्मक आराखड्यांची गरज अधोरेखित करत, राष्ट्रीय आकांक्षांना पूरक ठरणाऱ्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि जागतिक विचारसरणीने परिसंवादात उपस्थित सर्व मान्यवरांना प्रभावित केले. त्यांच्या मौलिक विचारांनी परिसंवादातील चर्चांना अधिक समृद्धी दिली व २०४७ पर्यंत शाश्वत, सर्वसमावेशक व समृद्ध भारत घडविण्याच्या दृष्टीकोनात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.

या आंतरराष्ट्रीय परिसंवादात भारतातील व जगभरातील अर्थशास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत, खासदार, धोरणकर्ते, निती आयोगाचे सदस्य व अन्य थिंक टँक्स यांनी सहभाग घेतला होता. परिसंवादात भारताच्या स्वातंत्र्यशताब्दीनिमित्त स्वावलंबी, नैतिकतेच्या मार्गाने पुढे जाणाऱ्या आणि जागतिकदृष्ट्या भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सखोल विचारमंथन झाले.

युवकांचे सक्षमीकरण व रोजगार निर्मिती, भारताच्या जागतिक आर्थिक नेतृत्वाचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा व जागतिक सामरिक उपस्थिती बळकट करणे, वैज्ञानिक व तांत्रिक नवकल्पनांना प्रोत्साहन, भारतीय जीवनमूल्यांवर आधारित शांती व मानवकल्याण साध्य करणे, पर्यावरणीय संतुलन व शाश्वत विकास सुनिश्चित करणे आणि उच्च नैतिक मूल्यांद्वारे जागतिक नेतृत्व करण्यावर परिसंवादात विशेष भर देण्यात आला.

या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संवादात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची उपस्थिती अत्यंत प्रेरणादायी ठरली. त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. विकास कुमार सिंह आणि आयोजन समितीने त्यांचे विशेष आभार मानले.



Saturday, April 26, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आंतरराष्ट्रीय बियाणे दिन साजरा

 शुद्ध बियाणे उत्पादनावर भर देण्याचा निर्धार.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संशोधन संचालक कार्यालयांतर्गत बीज तंत्रज्ञान संशोधन केंद्राच्या वतीने २६ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय बियाणे दिन ऑनलाईन पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आपल्या जीवनातील तसेच अन्नसुरक्षा आणि शेती प्रणालीच्या शाश्वततेसाठी बियाण्यांचे महत्त्व अधोरेखित करणे हे होते. यंदाच्या आंतरराष्ट्रीय बियाणे दिनाची संकल्पना "डिस्कव्हरींग बोल्ड हॉरायझन्स" (Discovering Bold Horizons) अशी आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, बियाणे हे शाश्वत शेतीचे मूलभूत व अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. इतर सर्व शेतीसंबंधी घटकांचा परिणाम बियाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. शेतकऱ्यासाठी बियाणे म्हणजे जीवन आहे. त्यांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या करडई, तीळ व तुरीच्या वाणांचे राष्ट्रीय पातळीवर वाढते महत्त्व अधोरेखित केले. विशेषतः तुरीचा 'गोदावरी' वाण महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशात उच्च उत्पादन देत आहे, असेही त्यांनी नमूद केले. तसेच त्यांनी सोयाबीन बीजोत्पादनात विद्यापीठाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले आणि शुद्ध व गुणवत्तापूर्ण बियाणे तयार करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या कार्यात शास्त्रज्ञांनी अधिक मेहनत घ्यावी, असे आवाहन केले. तसेच, बियाणे वितरण व्यवस्था प्रभावीपणे राबवावी व सोयाबीन, करडई, तुर आणि हरभरा यासारख्या महत्त्वाच्या पिकांवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी सुचवले. याबरोबरच कोणताही दिन साजरा करत असताना त्याविषयी भविष्यात अधिक प्रभावी कार्य करण्याचा दृढनिश्चय करणे आवश्यक असते. यानुसार आंतरराष्ट्रीय बियाणे दिनाच्या निमित्ताने शेतकरी केंद्रित आणि शुद्ध बियाणे उत्पादनावर भर  द्यावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या प्रास्ताविकाने झाली. संत तुकाराम महाराजांच्या "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" या ओवीचा संदर्भ देत त्यांनी शुद्ध बियाण्याचे महत्त्व स्पष्ट केले. निरोगी झाडे व सकस आहारासाठी उच्च दर्जाच्या बियाण्यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी अन्नधान्य, भाजीपाला, फळपिके तसेच पशुधनातील उत्कृष्ट गुणधर्म असलेल्या वाणांचे जतन व संवर्धन करण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.

या कार्यक्रमात विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्रभारी अधिकारी व शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी अधिकारी डॉ. सुनील उमाटे यांनी केले, तर सहयोगी संचालक (बियाणे ) डॉ. हिराकांत काळपांडे यांनी "शेतकरी देवो भव:" या भावनेतून गुणवत्तापूर्ण बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा दृढ संकल्प व्यक्त करत उपस्थितांचे मानले.

Friday, April 25, 2025

सेंद्रिय शेतीकडे वाटचाल! वनामकृवित ४३वा 'शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद' यशस्वी संपन्न

 मृदा शास्त्रज्ञ डॉ.हरिहर कौसडीकर यांनी सुचविले जमिनीतील सेंद्रिय कर्ब वृद्धीचे उपाय

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभागातील क्रॉपसॅप  प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा ४३ वा भाग  मा. कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २५ एप्रिल रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मृदा शास्त्रज्ञ डॉ हरिहर कौसडीकर यांचेकडून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वृद्धीचे उपाय यावर तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. त्यांनी नमूद केले कीजमिनीमध्ये ४५% खनिज पदार्थ असून जमिनीस वापसा स्थिती येण्यासाठी २५% हवा आणि २५% पाण्याची गरज असते. यासाठी जमिनीमध्ये ५ % सेंद्रिय पदार्थांची आवश्यकता असते. मातीत सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर यामध्ये गोमूत्र, शेणखत, विविध कंपोस्ट खते , वर्मी कंपोस्ट यांचा नियमित वापर करावा, खत तयार करताना नीट कुजवलेले सेंद्रिय खत वापरणे महत्त्वाचे आहे. याबरोबरच हिरवळीची खते स्वतंत्र किंवा आंतरपिक यामध्ये धेंचा, देशी मूग, उडीद , तूर यासारखी पिके शेतात पेरून नंतर जमिनीत मिसळल्यास सेंद्रिय कर्ब वाढतो. विविध द्विदल पीकांची फेरपालट, शेतामध्ये शेळ्या मेंढ्या बसविणेभूसुधारक वापरणे, पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी कुजवून जमिनीत मिसळणे, तेलबियापेंड, घरगुती व शेतीतील जैविक कचऱ्याचा योग्य वापर करून कंपोस्ट तयार करावे. जैविक घटकांचा वापर करून जैववर्धक जसे की जिवामृत, घनामृत, अमृतपाणी संजीवकजिवाणू रायझोबियम, पीएसबी, अझॅटोवॅक्टर, ग्रीन अल्गी, ट्रायकोडर्माचा वापर आदी उपाय उपयुक्त ठरतात. विशेषतः रसायनांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळल्यास जमिनीचा पोत आणि सेंद्रिय कर्ब दोन्ही वाढते, असे त्यांनी नमूद केले.

हवामान शास्त्रज्ञ डॉ कैलास डाखोरे यांनी हवामानामध्ये बदल होत असून, तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाचे मागील आठवड्यामध्ये जाणवले, परंतु पुढील चार दिवसात विशेषतः दिनांक २६, २७ आणि २८ एप्रिल रोजी मराठवाड्यात तापमान कमी होईल असा अंदाज आहे, असे सांगितले. याबरोबरच नांदेड, लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला, फळ पिके, पशुधनाची योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनंत लाड यांनी केले तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले. कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७० हून अधिक शेतकऱ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवून शास्त्रज्ञांना प्रश्न विचारले तसेच विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले. यावेळी शास्त्रज्ञांनीही शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.

शेतीसाठी ज्ञान आणि पाणी महत्वाचे .... माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृवित जलसंपदा अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि जलसंपदा विभाग, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने "जल व्यवस्थापन कृति पंधरवडा २०२५" चे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान मराठवाड्यात विविध ठिकाणी राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत आधुनिक पिक पद्धती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि उस पिकासाठी जलव्यवस्थापनाच्या प्रभावी तंत्रांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी बैठक व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत दिनांक २५ एप्रिल रोजी माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या सिम्पोजियम हॉल (हॉल क्र १८) मध्ये जलसंपदा अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शनात माननीय कुलगुरुनी शेतीसाठी ज्ञान आणि पाण्याचे महत्व अधोरेखित केले. जल संकलन, संवर्धन आणि साठवणूक यासाठी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करणे आवश्यक असून विद्यापीठ परिसरात नवीन चार मोठया क्षमतेची शेततळी निर्माण करण्‍यात आली असुन जुन्या मोठ्या शेततळयाची दुरूस्‍ती करण्‍यात आली आहेया माध्‍यमातुन ८ – ९ कोटी लिटर पाण्‍याची साठवण क्षमता शक्‍य होत आहे, असे सांगितले. विद्यापीठाने शेततळी विकासाच्या माध्यमातून जल संकलन आणि काटेकोर वापरासाठी प्रभावी उपयोजना राबविल्या आहेत, हे सर्व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. इ. म. चिश्ती, कार्यकारी अभियंता श्री. रु. प्र. गरूड  (गंगाखेड), श्री. प. ब. लांब (परभणी), श्री. सि. एन. ताटे, (परभणी) आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जलसंपदा अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षणाचे नियोजन विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश अहिरे यांनी केले. प्रशिक्षणात विद्यापीठातील विविध तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. यामध्ये एकात्मिक शेती पद्धतीचे  प्रभारी अधिकारी डॉ. ए. के. गोरे यांनी आधुनिक पीक पद्धती, नाहेप प्रकल्प प्रभारी अधिकारी डॉ. गोपाळ शिंदे यांनी एआय चा कृषि क्षेत्रात वापर, पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. हरीश अवारी ऊस पिकाचे पाणी व्यवस्थापन आणि कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र  व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे यांनी कापूस पिकाचे पाणी व्यवस्थापन या विषयावर सविस्तर प्रशिक्षण दिले. कार्यक्रमात परभणी येथील कृषि विज्ञान केंदाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत भोसले यांचीही उपस्थिती होती.

या प्रशिक्षणामुळे जलसंपदा अधिकाऱ्यांना आधुनिक शेती, तंत्रज्ञान वापर, आणि जलव्यवस्थापनाचे सखोल ज्ञान मिळाले असून, ते आपल्या कार्यात याचा प्रभावी वापर करू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.