Tuesday, April 29, 2025

वनामकृवित मराठवाड्यातील खरीप नियोजनासाठी दोन दिवसीय कार्यशाळेला प्रारंभ

 विद्यापीठ आणि कृषि विभागाचे संयुक्त आयोजन; शेतकरी केंद्रस्थानी ठेवून विविध तंत्रज्ञानावर मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या खरीप हंगामासाठी दोन दिवसीय 'विभागीय खरीप नियोजन कार्यशाळा’ दिनांक २९ व ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन २९ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले.

या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. या कार्यशाळेस विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, व संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, राज्य शासनाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक श्री रफीक नाईकवाडी, विभागीय कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर (लातूर), श्री प्रकाश देशमुख (छत्रपती संभाजीनगर), प्रगतशील शेतकरी श्री कांतरावकाका देशमुख आणि श्री चंद्रकांतदादा वरपूडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, शेतीसाठी ज्ञानाची गरज आहे. शेतकऱ्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी त्यांच्यापर्यंत विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग करत आहे, म्हणून कृषि विभागाच्या कृषि सहाय्यकापासून ते सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि विद्यापीठातील शास्त्रज्ञांची सहा महिन्यातून एकदा भेट होवून चर्चा होणे आवश्यक आहे. आपल्याला ज्याचे पर्यवेक्षण करायचे आहे, त्याचे भरपूर ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणून कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यापीठातील प्रात्यक्षिकाद्वारे तसेच प्रयोगशाळेतील प्रयोगांची पाहणी करून आपले ज्ञान वाढवावे व ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावे. यावेळी माननीय कुलगुरूनी त्यांचे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी जे अब्दुल कलाम यांच्यासोबत ते राष्ट्रपती होण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचे वर्णन केले. शेतकऱ्यांची पीक पद्धती बदललेली आहे. ती योग्य आहे का नाही हे समजावून सांगून योग्य तंत्रज्ञान देण्याची गरज आहे. याबरोबरच विज्ञान वाढत चाललेले असून दिवसेंदिवस अनेक संशोधने होत असतात. याचे ज्ञान कृषि विभागाच्या अधिकाऱ्याकडे आहे, त्याला अद्यायावत करण्याची गरज असते. त्यातील बारकावे प्रशिक्षणातून समजून घेऊन त्याविषयीची जाण आणि अभ्यास करावा व त्यातील महत्त्वपूर्ण बाबींचा शेतकऱ्यांना लाभ करून द्यावा, असे आवाहन केले. तसेच त्यांनी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांचे स्वभावातील विश्वास आणि संयम या गुणांचे वर्णन करून शेतकऱ्यांसोबत चांगले संबंध जोडलेले आहेत, याबद्दल त्यांचे कौतुक केले. कृषि क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांचेच अस्तित्व शेतकऱ्यावर अवलंबून आहे. हे जाणून विद्यापीठ “शेतकरी देवो भव:” या भावनेतून नियमित विस्तार कार्यासोबत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत आणि आठवड्यातून दोन दिवस ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवादाद्वारे अविरत कार्य करत आहे. शेतकऱ्यांसाठी कृषि क्षेत्रातील सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची आवश्यकता आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये इच्छाशक्ती आणि कार्य तत्परता असून त्यांना शेती तंत्रज्ञानाची गरज आहे. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी एखादा वाहन किंवा तंत्रज्ञान विकसित विकसित करणे जितके महत्त्वाचे आहे, त्याहून अधिक ते किती शेतकऱ्यापर्यंत पोहोचले हे अधिक महत्त्वाचे आहे. सध्या विद्यापीठाचा तुरीचा गोदावरी वाहन याचे उत्तम उदाहरण असून ते संपूर्ण महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये पोहोचले आहे, असे नमूद केले.

कार्यशाळेत दुपारच्या सत्रात महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव (कृषि) मा. श्री. विकासचंद्र रस्तोगी (भाप्रसे), आभासी माध्यमातून सहभागी झाले होते. ते म्हणाले की, कृषि विद्यापीठांनी विकसित केलेले पीकांचे वाण, शिफारशी, नवीन तंत्रज्ञान ठराविक शेतकऱ्यांपर्यंत नव्हे तर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी ग्राम कृषि विकास समितीची मदत घ्यावी. ज्या गावात समित्या स्थापन केल्या नाहीत तेथे स्थापन कराव्यात. स्थापन झालेल्या समित्या सक्रिय कराव्यात. शेतकरी गट, कंपन्यांनी तयार केलेल्या खरिप हंगाम आराखड्याचा तालुका स्तरावर आढावा घेण्यात यावा. पोकरा अंतर्गत हवामानुकुल तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी पीकनिहाय शेतीशाळा आयोजित कराव्यात. येत्या खरिपासाठी पुरेशा प्रमाणात बियाणे, खते आदी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे अशा सूचना त्यांनी केल्या.

प्रास्ताविकात विभागीय कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर यांनी विभागीय खरीप हंगामा कार्यशाळेमध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याचे अधीक्षक कृषि अधिकारी, आत्म्याचे प्रकल्प संचालक, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचा समावेश आहे असे सांगितले. तसेच खरीप हंगामाची पूर्वतयारी करून घेण्यासाठी पुणे येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार या कार्यशाळेत मराठवाड्यातील खरिपातील प्रमुख पिके सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मुग या पिकावर शास्त्रज्ञाद्वारे प्रात्यक्षिकाद्वारे आणि व्याख्यानातून मार्गदर्शन मिळणार आहे. खरीप हंगामात पावसाळ्यापूर्वी ८० टक्के कार्य करणे आवश्यक आहे, यामध्ये शेतकऱ्यांची आणि योग्य प्रात्यक्षिके निवड यांचा समावेश आवश्यक आहे, असे नमूद केले.

यावेळी खरीप हंगामाच्या अनुषंगाने विविध तंत्रज्ञानावर आधारित पुस्तके आणि घडी पत्रिकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

दोन दिवस चालणाऱ्या कार्यशाळेत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक मा. श्री. परिमल सिंह (भाप्रसे) यांचे प्रकल्प २ विषयी, मृद विज्ञान तज्ञ श्री. विजय कोळेकर यांचे जमिनीच्या आरोग्यासाठी संवर्धित शेती यावं तसेच विद्यापीठाद्वारे कोरडवाहू मराठवाड्यातील पर्जन्यमानातील अस्थिरता : एस पी आय चे वेळमानानुसार विश्लेषण यावर डॉ. कैलास डाखोरे, हवामान बदलानुसार कोरडवाहू पिक तंत्रज्ञान यावर डॉ. वासुदेव नारखेडे, खरीप हंगामातील गळीत धान्य उत्पादन तंत्रज्ञान यावर डॉ. वसंत सूर्यवंशी, सोयाबीन पिकातील कीड व्यवस्थापन यावर डॉ. आर एस जाधव, सोयाबीन पिकातील रोग व्यवस्थापन यावर डॉ. पी एच घंटे, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याविषयी डॉ. आर व्ही शिंदे, कापूस उत्पादन तंत्रज्ञान याविषयी डॉ. ए डी पांडागळे, खरीप हंगामातील कडधान्य उत्पादन तंत्रज्ञान याविषयी डॉ. डी के पाटील, सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान याविषयी डॉ. जी डी गडदे, खरीप ज्वारी बाजरी व मका पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान यावर डॉ. एल एन जावळे आणि डॉ. एस बी पवार, रसायनिक खत वापरांच्या बचतीसाठी जैविक खतांचे महत्त्व याविषयी डॉ. एच के कौसडीकर, सेंद्रिय नैसर्गिक व एकात्मिक शेती पद्धती याविषयी डॉ. एके गोरे, लिंबूवर्गीय फळ पिकांची व्यवस्थापन याविषयी डॉ. एस जी पाटील, भाजीपाला पिकांचे संरक्षित लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉ. व्ही एस खंदारे आदी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. याबरोबरच कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी श्री चंद्रकांत वरपूडकर श्री दादा लाड श्रीकांतराव देशमुख श्री निलेश देशमुख श्री रमेश देशमुख श्री गंगाधर शृंगारे श्री नंदकिशोर पाटील यांच्या यशोगाथातूनही अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणारअसून विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.