Thursday, April 24, 2025

वनामकृवित जातिवंत मुऱ्हा म्हशी-रेडे आणि उस्मानाबादी शेळ्यांचे प्रदर्शन संपन्न

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी जीवनमान उंचावण्यासाठी व शेतीमधील जोखीम व्यवस्थापनासाठी पशुसंवर्धन आवश्यक माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातर्फे आज दिनांक २४ एप्रिल रोजी जातिवंत मुऱ्हा म्हशी, रेडे व उस्मानाबादी शेळ्या व बोकडांचे भव्य पशुप्रदर्शन आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, विद्यापीठ अभियंता श्री दीपक काशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल (परभणी), डॉ. बाबासाहेब ठोंबरे (लातूर) व विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रदर्शनाची सुरुवात दीपप्रज्वलन व नव्याने खरेदी करण्यात आलेल्या मुऱ्हा वंशीय म्हशी व उस्मानाबादी शेळ्यांच्या पाहणीने झाली.

अध्यक्षीय भाषणात सुरवातीला माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि  यांनी शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात पशुधनाच्या अमूल्य भूमिकेचे स्पष्ट व सखोल विश्लेषण केले. ते पुढे म्हणाले की, शेतीतील उत्पादनवाढ, शाश्वत जीवनमान आणि जोखमीचे व्यवस्थापन यासाठी पशुसंवर्धन हा अत्यंत प्रभावी पर्याय आहे. सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की सेंद्रिय उत्पादनात पशुधनाचे विशेष महत्त्व असून, त्याच्या माध्यमातून मातीचा पोत सुधारतो, उत्पादनातील गुणवत्ता वाढते आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळते. तसेच, आरोग्यदायी पशुधन जोपासणे हे केवळ शेतकऱ्याच्या अर्थकारणासाठी नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी उदाहरणासह मांडले.पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण या विषयावर बोलताना त्यांनी फीड ब्लॉक व युरिया मोलॅसिस ब्लॉक तयार करण्याचे महत्त्व पटवून दिले. यामध्ये स्वयंपूर्णता आणि पशुधनासाठी संतुलित आहाराची उपलब्धता यावर भर देण्यात आला. त्याचप्रमाणे, गोबर गॅसच्या माध्यमातून खतनिर्मिती आणि त्याचे शाश्वत शेतीतील उपयोग याचीही त्यांनी सविस्तर माहिती दिली. अशा पद्धतीने जैविक कचऱ्याचे रूपांतर उपयुक्त संसाधनांमध्ये करणे शक्य होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेवटी, शेतकऱ्यांच्या जीवनातील मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी पशुधन हे एक मजबूत आधारस्तंभ ठरू शकते, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांनी विभागातील म्हैस वंश व शेळीवंशवर्गीय पशुधनाच्या उत्पादित पिढीमध्ये शुद्धता जोपासण्यासाठी तसेच त्यांच्या उत्पादन व प्रज्योत्पादन गुणधर्मामध्ये सुधारणा होण्यासाठी विभागातील पशुधन खरेदी समितीने दिनांक १४ ते १८ मार्च २०२५ या कालावधीत जिंद हरियाणा राज्यातील निडाणी, बरारखेडा,  उचाना, जिंद, बनभोरी, माटलोडा येथील गावांना प्रत्यक्ष भेट देऊन पशुपालकासोबत वाटाघाटी करून एकूण सात म्हैसवर्गीय पशुधन त्यामध्ये एक जातीवंत मुऱ्हा रेडा व सहा मुऱ्हा म्हशी खरेदी केल्याचे सांगितले.  तसेच जातिवंत उस्मानाबादी शेळ्या व बोकड यांची खरेदी मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, पाटोदा व बीड जिल्हातील केज तालुक्यातून दिनांक ९ व ११ मार्च २०२५ रोजी पशुधन खरेदी समितीमार्फत खरेदी करण्यात आल्याची माहिती दिली.

पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागाचे डॉ. दिनेश सिंह चव्हाण, परभणी मुख्यालयातील विविध विभागाचे प्रमुख व संशोधन योजनांचे प्रभारी अधिकारी तसेच पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील अधिकारी कर्मचारी पदव्युत्तर आचार्य पदवीचे विद्यार्थी विद्यार्थिनी व मजूर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्ता बैनवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. नरेंद्र कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. शंकर नरवाडे, डॉ. रमेश पाटील, डॉ प्रभाकर पडघन, तसेच डॉ. संदेश देशमुख, आचार्य पदवीचे विद्यार्थी- विद्यार्थिनी व पदव्युत्तर विद्यार्थी-विद्यार्थिनी परिश्रम घेतले.