Monday, April 14, 2025

विद्यापीठाच्या गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयात विचारांच्या तेजाने उजळली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - साजरा झाला ज्ञानोत्सव

 

शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन, या तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयात प्रबोधनपर आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १४ एप्रिल रोजी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण व मेणबत्त्या प्रज्वलित करून अत्यंत उत्साही वातावरणात करण्यात आली. अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. वासुदेव नारखेडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. संजय मुलगीर हे होते.

यावेळी डॉ. वासुदेव नारखेडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुविध व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करण्याचे आणि त्यांच्या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

प्रमुख मार्गदर्शक प्रा. संजय मुलगीर यांनी डॉ. आंबेडकर यांचा जीवनपट अत्यंत प्रभावी शैलीत उलगडला. त्यांनी बाबासाहेबांचे विद्यार्थी जीवन, त्यांच्या संघर्षमय वाटचालीतील शिक्षणाचा ठसा आणि कोलंबिया विद्यापीठ, अमेरिका येथे त्यांना मिळालेले सन्मानाचे स्थान यांचे विशेष उल्लेख केले. बाबासाहेबांची पुस्तकांप्रती असलेली अतूट निष्ठा, त्यांची अर्थशास्त्रातील गाढ तज्ज्ञता, आणि कामगार तसेच महिलांसाठी केलेल्या कार्याचे मर्मस्पर्शी चित्रण उपस्थितांसमोर मांडले. त्यांनी विशेषतः विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, महापुरुषांना त्यांच्या जातीच्या चौकटीत न अडकवता त्यांच्या विचारांचा व समाजसुधारणेतील योगदानाचा शोध घेतला पाहिजे.

विद्यार्थी प्रतिनिधी भूजबळे यांनी बाबासाहेबांविषयी आपल्या मनोगतातून तरुण मनांतील प्रेरणा व्यक्त केली.

यावेळी महाविद्यालयातील डॉ सुभाष ठोंबरे, श्री.प्रवीण दंडे, श्री, देवीलाल पवार, श्री.बाबुराव खुडे, श्री सलीम शेख इतर अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ राहुल भालेराव यांनी केले तर डॉ सुभाष ठोंबरे यांनी मानले.कार्यक्रमात सर्वांचा उत्साही प्रतिसाद होता.