Friday, April 25, 2025

शेतीसाठी ज्ञान आणि पाणी महत्वाचे .... माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृवित जलसंपदा अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि जलसंपदा विभाग, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने "जल व्यवस्थापन कृति पंधरवडा २०२५" चे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान मराठवाड्यात विविध ठिकाणी राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत आधुनिक पिक पद्धती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि उस पिकासाठी जलव्यवस्थापनाच्या प्रभावी तंत्रांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी बैठक व कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत दिनांक २५ एप्रिल रोजी माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या सिम्पोजियम हॉल (हॉल क्र १८) मध्ये जलसंपदा अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शनात माननीय कुलगुरुनी शेतीसाठी ज्ञान आणि पाण्याचे महत्व अधोरेखित केले. जल संकलन, संवर्धन आणि साठवणूक यासाठी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करणे आवश्यक असून विद्यापीठ परिसरात नवीन चार मोठया क्षमतेची शेततळी निर्माण करण्‍यात आली असुन जुन्या मोठ्या शेततळयाची दुरूस्‍ती करण्‍यात आली आहेया माध्‍यमातुन ८ – ९ कोटी लिटर पाण्‍याची साठवण क्षमता शक्‍य होत आहे, असे सांगितले. विद्यापीठाने शेततळी विकासाच्या माध्यमातून जल संकलन आणि काटेकोर वापरासाठी प्रभावी उपयोजना राबविल्या आहेत, हे सर्व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. इ. म. चिश्ती, कार्यकारी अभियंता श्री. रु. प्र. गरूड  (गंगाखेड), श्री. प. ब. लांब (परभणी), श्री. सि. एन. ताटे, (परभणी) आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जलसंपदा अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षणाचे नियोजन विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश अहिरे यांनी केले. प्रशिक्षणात विद्यापीठातील विविध तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. यामध्ये एकात्मिक शेती पद्धतीचे  प्रभारी अधिकारी डॉ. ए. के. गोरे यांनी आधुनिक पीक पद्धती, नाहेप प्रकल्प प्रभारी अधिकारी डॉ. गोपाळ शिंदे यांनी एआय चा कृषि क्षेत्रात वापर, पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. हरीश अवारी ऊस पिकाचे पाणी व्यवस्थापन आणि कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र  व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे यांनी कापूस पिकाचे पाणी व्यवस्थापन या विषयावर सविस्तर प्रशिक्षण दिले. कार्यक्रमात परभणी येथील कृषि विज्ञान केंदाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत भोसले यांचीही उपस्थिती होती.

या प्रशिक्षणामुळे जलसंपदा अधिकाऱ्यांना आधुनिक शेती, तंत्रज्ञान वापर, आणि जलव्यवस्थापनाचे सखोल ज्ञान मिळाले असून, ते आपल्या कार्यात याचा प्रभावी वापर करू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.